अलिबाग : पुढील काही दिवसांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या लाटेची गरोदर स्त्रिया व लहान मुलांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोस्तवात नागरिकांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेल्या तोंडाला मास्क बांधणे, वेळोवेळी सॅनिटायझरने हात साफ करणे, सोशल डिस्टसिंग या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. तसेच ताप, सर्दी, खोकला आजार असलेल्या रुग्णाने शासकीय रुग्णालयात अॅटींजन व आर.टी.सी.पी.आर. चाचणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे. मात्र तरीही दिवसभरात जिल्ह्यात १००हून अधिक कोरोना रुग्ण सोडत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यातच पुढील काही दिवसांमध्ये गणेशोस्तव सुरू होणार आहे. जिल्ह्यात घराघरात गणेशोस्तव मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी साजरा करण्यात येतो. मात्र सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता उत्सवादरम्यान नागरिकांनी गर्दी करू नये, तसेच शासनाने सुचविलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही डॉ. किरण पाटील यांनी सांगितले आहे.
ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, चव नसणे, वास न येणे ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. ही लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी त्वरित अँटींजन व आर.टी.सी.पी.आर. चाचणी करणे गरजेचे आहे. ताप, सर्दी, खोकला किंवा इतर कोरोनाची लक्षणे असणारा एखादा रुग्ण एखाद्या खासगी डॉक्टरांकडे तपासणी करण्यासाठी जातात. अशावेळी खासगी डॉक्टरांनी रुग्णाला त्वरित अँटींजन व आर.टी.सी.पी.आर. चाचणी करण्याचा सल्ला देणे गरजेचे आहे. कोरोना आजाराला रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्क वापरावा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, सॅनिटायजरचा वापर करावा, असे आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
..............