आदर्श वार्ताहर वृत्तसेवा, रायगड :- गणेशोत्सवात सामाजिक जाणीव जागृतीची व प्रबोधनाची श्रेष्ठ परंपरा पुढे नेण्याच्या दृष्टीने कोविड काळात नियम पाळून सामाजिक भावनेने रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत “निर्मल गणेशोत्सव स्पर्धेचे ” आयोजन दि.9 सप्टेंबर 2021 ते 21 सप्टेंबर 2021 या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळे,सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक स्तरांवरील नागरिकांनी मोठया प्रमाणवर सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.
या स्पर्धेचा उद्देश हा पर्यावरण रक्षण ,निसर्ग संवर्धन , परिसर स्वच्छता व आरोग्याप्रती चांगल्या सवयी लावून गावपातळीवर जास्तीत जास्त लोकसहभाग घेऊन निर्मल वातावरणात पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करणे, हा आहे.या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी सहभाग घेण्याकरिता http://bit.ly/raigadganesh या गुगल लिंकवर दि.21 सप्टेंबर 2021 पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता सर्व स्पर्धकांनी नियम व अटींच्या अधीन राहून ऑनलाईन नोंदणी करावी.
या स्पर्धेकरिता पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बसविणाऱ्या सार्वजनिक मंडळे,विविध सामाजिक संस्था तसेच मंडळाचा गणपती नसल्यास गावात घरगुती पातळीवरील गणपती उत्सवात सहभागी होऊन या स्पर्धेत मंडळे सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत सहभागाकरिता गणेश पूजनाचे दैनंदिन निर्माल्य गोळा करून ते निर्माल्य कलश,पोते,गोणी यात संकलन करावे व त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी कंपोस्टिंगसाठी पाठविणे/सेंद्रीय खत यासाठी वापरणे, गणपतींच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारे आरास,मखर,पूजेतील प्लास्टिक वेस्टन असलेले साहित्य गोळा करून ग्रामपंचायतीच्या संकलन केंद्रात जमा करणे, पर्यावरण पूरक शाडूच्या मूर्तीचा वापर, मूर्ती विर्सजनाकरिता बनविलेल्या कृत्रिम तलावाचा वापर इत्यादी पर्यावरणपूरक विविध जनजागृतीपर उपक्रम स्लोगन,पोस्टर, बॅनर,जिंगल्स,व्हिडिओ,भजन यांच्या माध्यमातून राबवावयाचे आहेत.
संपूर्ण जिल्हयातून प्रथम,व्दितीय व तृतीय असे तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ क्रमांक जिल्हा स्तरावरून निवडून त्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.तसेच सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.
तरी रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे,सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक स्तरावरील नागरिकांनी निर्मल गणेशोत्सव स्पर्धेत मोठया संख्येने सहभागी होऊन आपला गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्यास हातभार लावावा, असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा