या घनदाट अभयारण्यातील लाखो झाडे एकाचवेळी तोडल्यानंतर त्याचा पर्यावरणावर, वन्यजीवांवर व जैवविविधतेवर गंभीर परीणाम होणार आहेत, याचा गांभीर्याने विचार करून हे अभयारण्य उध्वस्त होण्यापासून वाचवावे, अशी मागणी शिवक्रांती सामाजीक संस्थेचे अध्यक्ष शरद यशवंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन पाठवून केली आहे.
धरण बांधताना तानसा अभयारण्यातील ६५२.१९ हेक्टर क्षेत्र व जव्हार वनविभागातील ५.७४ हेक्टर क्षेत्र असे एकूण ६५७.९५९ हेक्टर वनक्षेत्र प्रभावित होणार आहे तर १८६.९२ हेक्टर क्षेत्र सरकारी व खाजगी हेही प्रभावित होणार आहे. धरण परीसरातील ६ गावांचे पुनर्वसन हेही वन विकास महामंडळाच्या ४०० हेक्टर जागेमधेच करण्याचा विचार आहे. त्या जागेवरही जंगल आहे. तेथेही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार आहे. त्यामुळे वाडा तालुक्यातील एक अभयारण्य व एक मोठे जंगल अक्षरशः उध्वस्त केले जाणार आहे, याचे गंभीर परीणाम तालुक्यासह ठाणे व पालघर जिल्ह्यांना भोगावे लागणार आहेत. याचा विचार करून ही जंगलतोड थांबवावी, अशी विनंती शरद पाटील यांनी आपल्या निवेदनामधे केले आहे.
१९७० मधे घोषीत केलेले तानसा हे अभयारण्य युनोस्कोने गौरविलेले जागतिक वारसा स्थळ आहे. ते उध्वस्त करून धरण बांधणे हे इकोलॉजीकल डिझास्टर (पारीस्तीक आपत्ती ) आहे. या अभयारण्यामधे नामशेष झालेले अनेक पशु - पक्षी आढळतात. १९८० पर्यंत या भागामधे वाघांचे अस्तीत्व होते. हे धरण बांधताना फक्त झाडेच तुटतील असे नाही तर पशु - पक्षांचा संपूर्ण अधिवासच नष्ट होईल. लाखो वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक व सूक्ष्मजीवांचे परस्परावलंबी जीवनचक्रच उध्वस्त होईल. गारगाई नदीची नैसर्गिक परीसंस्था मृत होईल. घनदाट जंगलातील जैवविविधता, कार्बन सिंक व जंगलसंपत्ती नष्ट होईल. म्हणूनच पर्यावरणाचा ऱ्हास करून अनेक संकटांना निमंत्रण देऊ नये. असेही शरद पाटील यांनी आपल्या निवेदनामधे म्हटले आहे.
तानसा अभयारण्य उध्वस्त होऊ नये, यासाठी एक चळवळ उभी राहत असून पश्चिम घाट क्षेत्रातील वनराई वाचवण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी संघटित होत आहेत.