आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १४ जून, २०२६

'शिक्कामोर्तब' नाटकाच्या माध्यमातून लोकप्रिय अभिनेते 'कांचन पगारे' मजनू या 'बंगाली' भूमिकेतून उडवणार हास्याचे फवारे!

मुंबई (प्रतिनिधी-महेश्वर भिकाजी तेटांबे)
हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वात, तसेच छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अष्टपैलू अभिनेते कांचन पगारे आता एका नव्या दमाने रंगभूमीवर परतले आहेत. 'तरंगिणी एंटरटेनमेंट' आणि 'नवनीत' निर्मित, तसेच प्रमोद शेलार लिखित व दिग्दर्शित 'शिक्कामोर्तब' या नव्याकोऱ्या नाटकातून ते रसिक प्रेक्षकांना आपल्या प्रतिभेची एक वेगळीच जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. नाटक ही कलाकाराच्या अभिनय क्षमतेची खरी कसोटी मानली जाते. प्रसिद्धीपेक्षा कलेवरील निष्ठा आणि अभिनयातील प्रामाणिकपणा जपत, रंगभूमीशी पुन्हा घट्ट नाते जोडण्याचा कांचन पगारे यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.
       'शिक्कामोर्तब' या नाटकात त्यांनी एका मजनू ह्या 'बंगाली' माणसाची अत्यंत अफलातून आणि आव्हानात्मक भूमिका लीलया साकारली आहे. बंगाली धाटणीच्या मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आणि त्या भूमिकेची योग्य पकड घेण्यासाठी त्यांनी घेतलेली अपार मेहनत नाटकाच्या सादरीकरणात स्पष्टपणे दिसून येते. मजनू या पात्रात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन ते जिवंत करण्याची त्यांची शैली वाखाणण्याजोगी आहे. विनोदी प्रसंग असोत किंवा भावूक क्षण, त्यांच्या अभिनयातील नैसर्गिकपणा प्रेक्षकांना भारावून टाकतो. या नाटकात कांचन पगारे यांच्यासह सागर कारंडे, स्नेहा पराडकर आणि भक्ती रत्नपारखी या दिग्गज कलाकारांची दमदार फळी आहे. विशेषतः रंगमंचावर सागर कारंडे आणि कांचन पगारे यांची अभिनयातील 'केमिस्ट्री' आणि जुगलबंदी संपूर्ण नाटकात भाव खाऊन जाते. त्यांना स्नेहा पराडकर यांच्या करारी 'वकिली'ची आणि भक्ती रत्नपारखी यांच्या 'लैला' या पात्राची उत्तम साथ लाभली आहे.
एका जोडप्याच्या आयुष्यात अचानक आलेल्या दुसऱ्या जोडप्यामुळे निर्माण होणारा गोंधळ आणि त्यातून नात्यांवर अधिकृतरीत्या 'शिक्कामोर्तब' करणे किती गरजेचे असते, हा विषय अत्यंत खुमासदार विनोदी शैलीत मांडून प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत. कांचन पगारे आणि इतर कलाकारांच्या दमदार अभिनयाला तांत्रिक बाजूची उत्तम जोड मिळाली आहे. नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी उभारलेले आलिशान घर, शीतल तळपदे यांची मोहवून टाकणारी प्रकाशयोजना आणि अभिजित पेंढारकर यांच्या सुमधुर संगीतामुळे नाटकाची रंगत अधिकच खुलते. नाटकाचे निर्मिती प्रमुख म्हणून महेंद्र खराडे उत्तम जबाबदारी सांभाळत आहेत. अभिनयाचा हा निखळ आनंद अनुभवण्यासाठी आणि कांचन पगारे यांच्या या नव्या व प्रेरणादायी नाट्यप्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी रसिक नक्कीच आतुर असतील. या नवीन नाट्यकृतीसाठी कांचन पगारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा. ही कलाकृती नक्कीच यशाची शिखरे गाठेल आणि रसिक प्रेक्षक आपल्या प्रेमाचा 'शिक्का' या नाटकावर नक्कीच उमटवतील, अशी नटेश्वर चरणी प्रार्थना!

मंगळवार, ९ जून, २०२६

संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, भांडुप स्टेशन परिसर होणार मोकळा, बेस्ट चौकीच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन संपन्न

मुंबई (प्रतिनिधी): भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय व वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. स्टेशन रोडच्या मध्यभागी असलेली बेस्ट बस चौकी आता पर्यायी जागेवर हलविण्यात येत असून तिच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. या निर्णयामुळे भांडुप स्टेशन परिसर अधिक प्रशस्त, सुरक्षित व नागरिकांसाठी सुलभ होणार आहे.
भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील बेस्ट बस चौकीमुळे अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. याशिवाय या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला होता. गतवर्षी झालेल्या भीषण अपघातात चार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार संजय दिना पाटील यांनी प्रशासन, पालिका व बेस्ट अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून चौकीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली होती. डीपीडीसीच्या बैठकीपासून प्रत्यक्ष पाहणीपर्यंत प्रत्येक स्तरावर पाठपुरावा करत त्यांनी प्रशासनाला या प्रश्नाच्या कायमस्वरूपी समाधानासाठी भाग पाडले. त्यांच्या पुढाकारामुळे पालिकेने नवीन जागेची निवड करून ती बेस्ट चौकीसाठी उपलब्ध करून दिली असून खासदार निधीतून या चौकीची उभारणी करण्यात येणार आहे.
        नवीन चौकीचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी असलेली विद्यमान बेस्ट चौकी हटविण्यात येणार आहे. त्यामुळे स्टेशन परिसरातील अडथळे दूर होऊन नागरिकांना ये-जा करण्यासाठी अधिक मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी असलेली पोलीस बीट चौकीदेखील लवकरच पर्यायी जागेवर हलविण्यात येणार असल्याची माहिती खासदार संजय दिना पाटील यांनी दिली. त्यामुळे संपूर्ण स्टेशन परिसर मोकळा होऊन पादचारी व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विकासकामाच्या भूमिपूजन सोहळ्यास शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख रमेश कोरगावकर, नगरसेवक सुरेशजी शिंदे, नगरसेविका दिपमाला बडे, राजोल संजय पाटील, भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण , विक्रोळी बेस्ट आगाराचे व्यवस्थापकीय प्रमुख अर्जुन मांजरेकर तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. स्टेशन परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी खासदार संजय दिना पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले असून, त्यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे भांडुपकरांच्या दैनंदिन प्रवासातील मोठा अडथळा दूर होत असल्याची भावना व्यक्त केली.

'शिक्कामोर्तब' नाटकाच्या माध्यमातून लोकप्रिय अभिनेते 'कांचन पगारे' मजनू या 'बंगाली' भूमिकेतून उडवणार हास्याचे फवारे!

मुंबई (प्रतिनिधी-महेश्वर भिकाजी तेटांबे) हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वात, तसेच छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या सहजसुंदर अभि...