आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १४ मे, २०२६

खारेपाटाच्या पाणीप्रश्न सुटावा यासाठी अमर म्हात्रे यांचे सलग सहाव्या दिवशीही उपोषण सुरू !!

प्रतिनिधी : पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून सामाजिक कार्यकर्ते अमर बळीराम म्हात्रे यांच्या आमरण उपोषणाचा काल सहावा दिवस पूर्ण झाला. मात्र प्रशासन, पाणीपुरवठा विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधीं कडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या अनेक महिन्यां पासून विविध बैठका, आश्वासने आणि तांत्रिक उपायांच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात खारेपाटातील अनेक गावांना तीन ते पाच दिवस आड अपुऱ्या दाबाने पाणी मिळत असल्याची स्थिती आहे. कधी हेटवणे धरणावर अधिक क्षमतेचे पंप बसवण्याची घोषणा केली जाते, तर कधी CIDCO वॉशआऊट वरून जोडणी करण्याचा प्रस्ताव पुढे येतो, कधी बुस्टरपंप बसवण्याचा निर्णय होतो. त्यामुळे नेमकी अधिकृत आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य योजना कोणती, असा प्रश्न नागरिक आता विचारू लागले आहेत.
       दरम्यान, पाणीटंचाईचे खरे कारण “पाणी अपुरे असणे” नसून “दाबाने पाणी सोडल्यास पाईपलाईन फुटणे” हे असल्याचा गंभीर दावा स्थानिक नागरिकां कडून केला जात आहे. वाशीनाका ते वाशी बौद्धवाडा दरम्यान नव्याने टाकण्यात आलेली ३५५ मि.मी. HDPE पाईपलाईन तब्बल ५५ ते ६० वेळा फुटल्याचे बोलले जात असून, हे संभाव्य निकृष्ट काम, चुकीचे डिझाईन किंवा दर्जाहीन साहित्य वापराचे लक्षण असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे आज संपूर्ण खारेपाटासाठी कमी दाबाने पाणी सोडले जात असल्याने शेवटच्या गावांपर्यंत पुरेसा पुरवठा पोहोचत नसल्याची चर्चा आहे. “पाणी उपलब्ध असूनही योग्य दाबाने देता येत नाही” हेच खरे दुखणे असल्याचे आता अधिक स्पष्टपणे समोर येत आहे.
      मागील बैठकींमध्ये अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याचे निर्णय झाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र त्यावर अद्याप प्रभावी कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी केवळ आश्वासनां पुरते मर्यादित राहिले आहेत का?, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. रणरणत्या उन्हात एक सर्वसामान्य नागरिक जीवाची पर्वा न करता आमरण उपोषण करत असताना प्रशासन अजूनही बैठका आणि चर्चां या मध्येच अडकलेले दिसत असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता केवळ नवीन योजना जाहीर करण्या ऐवजी मूळ तांत्रिक दोष शोधून कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे.

[[ वाशी-शिर्की खारेपाटासाठी टाकण्यात आलेल्या ३५५ मि.मी. HDPE पाईपलाईनचे वारंवार फुटणे ही गंभीर बाब असून संपूर्ण लाईनचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट, Hydraulic Pressure Test आणि Material Quality Verification करण्यात यावे. तपासणी अहवाल सार्वजनिक करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी व आवश्यक असल्यास संपूर्ण नित्कृष्ट पाईपलाईन नव्याने बदलण्यात यावी.

 - राजेंद्र झेमसे, सामाजिक कार्यकर्ता]]
वाशी, ता. पेण, जि. रायगड.

बुधवार, १३ मे, २०२६

पत्रकारितेतील तळागाळातील शब्दांना सलाम ; ‘पत्रकार व संपादक सन्मान सोहळा 2026’ चे आयोजन

मुंबई: समाजातील प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आणि कोणत्याही परिस्थितीत सत्य मांडणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘आर्यारवी एंटरटेनमेंट ’तर्फे ‘पत्रकार व संपादक सन्मान सोहळा 2026* ’चे आयोजन करण्यात आले आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि पत्रकारिता क्षेत्रात 30 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारत आहे. ‘ आर्यारवी एंटरटेनमेंट ’ या संस्थेच्या माध्यमातून तेटांबे यांनी सलग चार वर्षे राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, राज्यस्तरीय कराओके गीत गायन स्पर्धा, सेलिब्रिटी क्रिकेट मॅच असे अनेक उपक्रम राबवून ते यशस्वीरीत्या पार पाडले आहेत. आता त्यांनी *‘आर्यारवी एंटरटेनमेंट* ’च्या माध्यमातून *‘पत्रकार, संपादक यांचा सन्मान सोहळा 2026’* हा उपक्रम हाती घेतला असून मुख्य प्रवाहातील माध्यमांसोबतच ग्रामीण भागातील मुक्त वार्ताहर, साप्ताहिक-पाक्षिकांचे प्रतिनिधी, डिजिटल न्यूज पोर्टल संपादक, तळागाळातील पत्रकार, संपादक आणि सोशल मीडिया माध्यमांतून कार्यरत पत्रकारांना या सोहळ्यात विशेष व्यासपीठ मिळणार आहे. तळागाळात काम करणाऱ्या पत्रकारांच्या योगदानाचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असून, पत्रकारितेतील निष्ठा, निर्भीडपणा आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे.
                                     या सन्मान सोहळ्यात ‘स्वाभिमान लेखणी सन्मान पुरस्कार* ’, ‘शब्दवेध गौरव सन्मान पुरस्कार’ , ‘अजेय लेखणी सन्मान पुरस्कार* ’, ‘कलम-रत्न सन्मान पुरस्कार’ आणि ‘ निर्भीड पत्रकारिता सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी इच्छुक पत्रकार, संपादक आणि डिजिटल मीडिया प्रतिनिधींनी आपली वैयक्तिक माहिती, कार्याचा संक्षिप्त परिचय आणि छायाचित्र दिनांक 15 जून, 2026 पर्यंत आर्यारवी एंटरटेनमेंट, 7/52, दिग्विजय मिल चाळ, दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी, मुंबई – 400033. भ्रमणध्वनी: 9082293867 / 8879810298. या संस्थेकडे पाठवावे, असे आवाहन संस्थापक महेश्वर तेटांबे यांनी केले आहे.
       सदर पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख व स्थळ याबाबतची माहिती कार्यक्रमाच्या पंधरा दिवस अगोदर कळविण्यात येणार असल्याची नोंद घ्यावी, असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.          अधिक माहितीसाठी खालील समन्वयक यांच्याकडे संपर्क साधावा.
श्री. गुरुनाथ तिरपणकर (पत्रकार) – 9323662619,श्री. राहुल खरात (पत्रकार) - 8308809754,श्री. केतन भोज (पत्रकार) - 8369554418, 8879544540

खारेपाटाच्या पाणीप्रश्न सुटावा यासाठी अमर म्हात्रे यांचे सलग सहाव्या दिवशीही उपोषण सुरू !!

प्रतिनिधी : पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून सामाजिक कार्यकर्ते अमर बळीराम म्ह...