आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १४ जुलै, २०२६

मुंबईकरांच्या पाण्यासाठी जागतिक दर्जाचे अभयारण्य उध्वस्त करू नका : शिवक्रांतीचे अध्यक्ष शरद पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

ठाणे :  पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधे मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी गारगाई धरण बांधण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर वेग घेत आहेत. मात्र हे धरण बांधताना तानसा अभयारण्यच नष्ट होणार असून ३ लाख १० हजार १४० पेक्षा कितीतरी अधिक झाडे तोडली जाणार आहेत. तेवढीच झाडे धरणाच्या प्रभावक्षेत्राखाली येणार आहेत. ही सर्व झाडे तोडण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवला आहे. 
       या घनदाट अभयारण्यातील लाखो झाडे एकाचवेळी तोडल्यानंतर त्याचा पर्यावरणावर, वन्यजीवांवर व जैवविविधतेवर गंभीर परीणाम होणार आहेत, याचा गांभीर्याने विचार करून हे अभयारण्य उध्वस्त होण्यापासून वाचवावे, अशी मागणी शिवक्रांती सामाजीक संस्थेचे अध्यक्ष शरद यशवंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन पाठवून केली आहे. 
       धरण बांधताना तानसा अभयारण्यातील ६५२.१९ हेक्टर क्षेत्र व जव्हार वनविभागातील ५.७४ हेक्टर क्षेत्र असे एकूण ६५७.९५९ हेक्टर वनक्षेत्र प्रभावित होणार आहे तर १८६.९२ हेक्टर क्षेत्र सरकारी व खाजगी हेही प्रभावित होणार आहे. धरण परीसरातील ६ गावांचे पुनर्वसन हेही वन विकास महामंडळाच्या ४०० हेक्टर जागेमधेच करण्याचा विचार आहे. त्या जागेवरही जंगल आहे. तेथेही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार आहे. त्यामुळे वाडा तालुक्यातील एक अभयारण्य व एक मोठे जंगल अक्षरशः उध्वस्त केले जाणार आहे, याचे गंभीर परीणाम तालुक्यासह ठाणे व पालघर जिल्ह्यांना भोगावे लागणार आहेत. याचा विचार करून ही जंगलतोड थांबवावी, अशी विनंती शरद पाटील यांनी आपल्या निवेदनामधे केले आहे.
       १९७० मधे घोषीत केलेले तानसा हे अभयारण्य युनोस्कोने गौरविलेले जागतिक वारसा स्थळ आहे. ते उध्वस्त करून धरण बांधणे हे इकोलॉजीकल डिझास्टर (पारीस्तीक आपत्ती ) आहे. या अभयारण्यामधे नामशेष झालेले अनेक पशु - पक्षी आढळतात. १९८० पर्यंत या भागामधे वाघांचे अस्तीत्व होते. हे धरण बांधताना फक्त झाडेच तुटतील असे नाही तर पशु - पक्षांचा संपूर्ण अधिवासच नष्ट होईल. लाखो वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक व सूक्ष्मजीवांचे परस्परावलंबी जीवनचक्रच उध्वस्त होईल. गारगाई नदीची नैसर्गिक परीसंस्था मृत होईल. घनदाट जंगलातील जैवविविधता, कार्बन सिंक व जंगलसंपत्ती नष्ट होईल. म्हणूनच पर्यावरणाचा ऱ्हास करून अनेक संकटांना निमंत्रण देऊ नये. असेही शरद पाटील यांनी आपल्या निवेदनामधे म्हटले आहे. 
       तानसा अभयारण्य उध्वस्त होऊ नये, यासाठी एक चळवळ उभी राहत असून पश्चिम घाट क्षेत्रातील वनराई वाचवण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी संघटित होत आहेत.

इच्छा माझी 'पुरी' करा! बेस्ट चालकाने शेवपुरीसाठी बेस्ट बस रस्त्यात 20 मिनिटं थांबवली!!

मुलुंडमध्ये वाहतुकीचे तीनतेरा
मुंबई (सतिश पाटील ): बेस्ट बस चालकाने केवळ शेवपुरी पार्सल घेण्यासाठी आपली बस २० मिनिटांहून अधिक वेळ भररस्त्यात थांबवून ठेवल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली
      मुलुंड पश्चिम स्थानकाजवळील अत्यंत गजबजलेल्या एम. जी. रोडवर एका बेस्ट बस चालकाने केवळ शेवपुरी पार्सल घेण्यासाठी आपली बस २० मिनिटांहून अधिक वेळ थांबवून ठेवली. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. अन्य वाहन चालकांनी याचा जाब विचारताच, बस चालकाने गैरवर्तन केले. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यामुळे बेस्टच्या संबंधित आगारप्रमुखांना मुजोर चालकाच्या विरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

गजबजलेल्या रस्त्यात शेवपुरीसाठी बस थांबवली
बेस्ट बस चालकाने मुलुंड एम. जी. रोडवर शेवपुरी पार्सल घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी भररस्त्यात बस थांबवली. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. खाद्यपदार्थ हातात मिळेपर्यंत बस उभीच राहिल्याने मागे उभे असलेल्या अन्य वाहन चालकांनी हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. तसेच, या बेजबाबदार वर्तनाबद्दल जाब विचारला असता, बेस्ट बस चालकाने अपशब्द वापरल्याचा त्यांचा आरोप आहे. हा सर्व प्रकार एका वाहन चालकाने मोबाइलमध्ये कैद केला.

मुलंडमधील अत्यंत गजबजलेला 'एमजी रोड' हा रस्ता प्रवाशांना रेल्वे स्थानक आणि परिसरातील व्यावसायिक क्षेत्रांशी जोडणारा एक मुख्य मार्ग आहे. त्यामुळे साहजिकच बसमुळे या भागात मोठा ट्राफिक जाम झाला. हा प्रकार घडला, त्यावेळी बस रिकामी होती, त्यात कोणतेही प्रवासी नव्हते. त्यामुळेच चालक-वाहकावर कुठला दबाव नव्हता.

जाब विचारताच बस चालकाची मुजोरी
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बसमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे वाहन चालक अडकून पडले आणि शेकडो प्रवाशांची गैरसोय झाली. जेव्हा नागरिकांनी चालकाला त्याच्या वागणुकीबद्दल आणि वाहतुकीत निर्माण झालेल्या अडथळ्याबद्दल जाब विचारला, तेव्हा त्याने आक्रमक पवित्रा घेत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

नागरिकांचा संताप
"केवळ 'शेवपुरी' खाण्यासारख्या क्षुल्लक गोष्टीसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा थांबवली जाऊ शकते, हे पाहून लोकांना धक्काच बसला. बस जवळपास २० मिनिटे जागची हलली नाही, ज्यामुळे आधीच गजबजलेल्या रस्त्यावर विनाकारण वाहतूक कोंडी झाली," असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.

सोशल मीडियावर हा मुद्दा मांडणाऱ्या एका जागरुक नागरिकाने सांगितले की, कामावरून घरी परतत असताना त्यांना ती बस रस्त्याच्या एका बाजूला बराच वेळ उभी असलेली दिसली आणि त्यामुळे तिच्यामागील वाहतुकीवर परिणाम झाला होता.
   तक्रारीची गंभीर दखल
दरम्यान, या घटनेच्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. मात्र, संगणक प्रणालीमधील नोंदीनुसार बस दोन ते तीन मिनिटे उभी असल्याचे दिसून येत असल्याचे मुलुंड आगार व्यवस्थापकांनी म्हटले आहे.
   बस चालकाच्या वर्तनामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीबाबत तुम्हाला काय प्रतिक्रिया आहे? अशा प्रकरणांमध्ये प्रशासनाने कसे कारवाई केली पाहिजे!

मुंबईकरांच्या पाण्यासाठी जागतिक दर्जाचे अभयारण्य उध्वस्त करू नका : शिवक्रांतीचे अध्यक्ष शरद पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

ठाणे :  पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधे मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी गारगाई धरण बांधण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर वेग घे...