आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली मुंबई विभाग कार्यकारिणी बिनविरोध घोषित

मुंबई  (रामदास धो. गमरे):  बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या समितीच्या मुंबई विभाग सभासद आणि रहिवाशांची सर्वसाधारण सभा रविवार दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५:०० वाजता माजी चिटणीस गजानन तांबे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई - १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
    सदर सभेचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी गायक सुधाकर मर्चंडे यांनी आपल्या भारदस्त आणि पहाडी आवाजात केले तर सुनील पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करीत असताना बौद्धजन पंचायत समिती संघटनेची गाव खेड्यात असलेली गरज व समाजाच्या विकासासाठी असलेली पुढील वाटचाल, उपाययोजना यावर आपले विचार मांडीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
      सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नात्याने उपस्थित असणाऱ्या बौद्धजन पंचायत समितीचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी आपल्या भाषणात "बौद्धजन पंचायत समितीची स्थापना ही शैक्षणिक, सामाजिक कार्याच्या उद्देशाने झाली असून या मूलभूत ध्येयाला केंद्रस्थानी ठेवून समिती आजवर अश्ववेगाने आपल्या कार्याचा विस्तार करीत समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने आणि प्रभावीपणे कार्यरत आहे. समितीच्या वार्षिक बजेट मध्ये सर्वात जास्त भर आणि खर्च हा शैक्षणिक प्रकल्पांवर केला जातो परंतु ग्रामीण, खेड्यापाड्यात अजूनही गरजू मुलांना त्याचा फायदा होत नाही म्हणून ग्रामीण, दुर्गम खेड्यापाड्यात बौद्धजन पंचायत समितीचा विस्तार होऊन सर्व फायदे तेथील सभासदांना, त्यांच्या मुलांना, परिवाराला मिळाले पाहिजेत याकरता जिल्हा, तालुका व ग्रामीण पातळीवर बौद्धजन पंचायत समितीचे संघटन होणे गरजेचे आहे" असे नमूद करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सदर सभेत सर्वानुमते मंजूर आणि पारित झालेल्या ठरावानुसार अध्यक्षपदी अतिश जाधव, उपाध्यक्ष सुधारक मर्चंडे, चिटणीस सुनील पवार, सरचिटणीस सुजित कासारे, खजिनदार स्वप्नील जाधव, हिशेब तपासनीस कमलेश पवार, संपर्क प्रमुख रणजीत महाडिक, अंकुश गमरे, सल्लागार गजानन तांबे यांची निवड करण्यात आली. सदर सर्वानुमते मंजूर करण्यात आलेल्या कार्यकारिणीची नावे जाहीर करताच सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले, सदर मुंबई विभागातील सभासदांचा मेळावा आणि सभा आयोजित करून ती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे सुधाकर मर्चंडे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा; देशभक्तीपर गीतांतून हुतात्म्यांना मानवंदना

मुंबई/परेल (विशेष प्रतिनिधी:महेश्वर भिकाजी तेटांबे) "भारतमातेचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येक भारतीयाने जात-धर्म विसरून एकत्र येणे हीच काळाची गरज आहे," असा संदेश देत, भारतीय स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 'लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओ'च्या वतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओचे संचालक सन्माननीय श्री. रामजी दादा डोडीया, सौ. लक्ष्मी डोडीया, काफिल अन्सारी, रुची पाटील, सचिन परब, अँड.विजय सातपुते आणि डॉ. मंगेश पेडामकर यांनी केले होते.       
         कार्यक्रमाची सुरुवात केक कापून आणि तिरंग्याला वंदन करून झाली. उपस्थितांनी देशासाठी बलिदान दिलेल्या अमर हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून भावपूर्ण मानवंदना अर्पण केली. या सोहळ्यात स्टुडिओमधील गायक आणि गायिकांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांची मैफल सजवली. या गीतांनी वातावरणात देशप्रेमाचा संचार केला आणि उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या मनात देशाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली. या विशेष प्रसंगी गायक-गायिकांसह अनेक मान्यवर अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आवर्जून उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या या उत्सवामागील मुख्य उद्देश स्पष्ट करताना आयोजकांनी सांगितले की, "आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे. त्या हुतात्म्यांचे स्मरण करून, प्रत्येक भारतीयामध्ये राष्ट्रप्रेम जागृत ठेवणे आणि भारतमातेच्या ऋणात राहून तिची सेवा करणे, हाच आमचा मूळ हेतू आहे." देशभक्तीच्या या चैतन्यमय वातावरणात आणि कलाकारांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला.

बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली मुंबई विभाग कार्यकारिणी बिनविरोध घोषित

मुंबई  (रामदास धो. गमरे):  बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या समितीच्या मुंबई विभाग सभासद आणि रहिवाशांची सर्वसाधारण सभा ...