आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२६

आगरी कवितांचे बादशाह पुंडलीक म्हात्रे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

नवी मुंबई : शिवतुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई संचलित, संवाद नात्यांचा ‘कविता डॉट कॉम' या साहित्य संस्थेचा ४था वर्धापन दिवस, कविता डॉट कॉमचा शंभरावा प्रयोग व जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, राबाडा येथे ६ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनवणे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठाचे प्रमुख लोकशाहीर प्रा.डॉ.गणेश चंदनशिवे उपस्थित होते. याप्रसंगी आगरी कवितांचे बादशहा पुंडलिक म्हात्रे यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
    लोकशाहीर चंदनशिवे यांनी लोकसाहित्य, लोकपरंपरा आणि आख्यान यांचे प्रकार सांगून, ”जांभूळ आख्यानाबाबत समर्पक शब्दामध्ये गुंफण करून, लोकगीतांमधूनदेखील आपणास समर्थपणे कसे सामर्थ्यशाली समाज स्वास्थ्य घडवता येते, यासाठी संत जनाबाई, संत एकनाथ महाराज संत तुकोबाराय यांनी जी मोठी परंपरा या महाराष्ट्राला दिली आहे, त्यातूनच फुले, शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार फार महत्वाचे आहेत असे प्रतिपादन केले. माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी खरे शिक्षण घडून येण्यासाठी सर्व समाजातील तळागाळातील लोकांनी शिक्षणाचे मूळ जाणून घ्यावे, मोल जाणून घ्यावे, खरा सत्कारणी पैसा लागावा, बुवाबाजीपासून लांब राहावे असे प्रतिपादन केले.
         शिवतुतारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये कुठल्यातरी एखाद्या परदेशातील चौकात कविता सादर करून परदेशवारी करण्यासाठी कविता डॉट कॉमला टेंभा मिरवायचा नसून, गावागावांत ”जॉनी जॉनी यस पप्पा ऐवजी”, ”आजोबा आजोबा कुठे गेले होते, कोकणात!” ही कविता तर, ”रेन रेन गो अवे” या कवितेऐवजी, ”येरे येरे पावसा” या कवितेची आस आणि कास असल्याचे नमूद केले. ऑनलाइनच्या जीवनातदेखील आम्हाला ऑफलाईनच जास्त कार्यक्रम करावेसे वाटतात. कारण माणसा माणसातला संवाद हा बोटांनी पाठवलेल्या संवेदनेवरती तोलू शकत नाही असेही ते म्हणाले. पुंडलिक म्हात्रे यांचे करून औक्षण करून त्यांना राजमुद्रेसह जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. म्हात्रे यांनी भाषणात आपली खदखद, व्यक्त करत असताना येणाऱ्या दिवसांमध्ये मराठी माणूस, मुंबईमध्ये उपरा होणार नाही ना, याची काळजी घ्या असा ज्येष्ठत्वाचा सल्ला दिला, आपली सुप्रसिद्ध आगरी कविता, ”हरकत काय हाय तुमची” सादर करून रसिकांची दाद मिळवली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कविता डॉट कॉमचे सर्व सदस्य आणि शिवतुतारी प्रतिष्ठान कार्यकारिणीने परिश्रम घेतले.

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

हिंदी विद्या प्रचार समितीचा ८८ वा स्थापना दिन उत्साहात संपन्न

मुंबई(शांताराम गुडेकर )  घाटकोपर (पश्चिम), मुंबई येथील हिंदी विद्या प्रचार समितीचा ८८ वा स्थापना दिन सोहळा श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी श्री वैजनाथ साबू सभागृहात उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विद्या प्रचार समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह होते. यावेळी घाटकोपर पश्चिमचे नगरसेवक धर्मेश गिरी आणि घाटकोपर पूर्वच्या नगरसेविका श्रीमती राखी जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी तसेच संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी हायस्कूल, घाटकोपरचे मुख्याध्यापक राजेंद्र डी. सिंह यांनी केले. 
       कार्यक्रमात डॉ. राजेंद्र सिंह, डॉ. उषा मुकुंदन, उमेश सिंह, डॉ. हिमांशु दावडा, राजेंद्र डी. सिंह, राजदीप वीरेंद्र सिंह, राजीव सिंह, आदित्य प्रकाश सेंगर, परिमल अरविंद सिंह, डॉ. मधुरा कलमकर, श्रीमती संगीता मेहरोत्रा, नवभारत पेपर चे संपादक ब्रजमोहन पांडे, नगरसेवक धर्मेश गिरी आणि श्रीमती राखी जाधव यांचे स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीतामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
              धर्मेश गिरी आणि श्रीमती राखी जाधव यांनी आपल्या मनोगतात हिंदी विद्या प्रचार समितीमार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांच्या योगदानाचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेंद्र सिंह यांनी हिंदी विद्या प्रचार समितीच्या प्रदीर्घ शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीचा आढावा घेतला. शिक्षण क्षेत्रातील संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे हिंदी विद्या प्रचार समितीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या हिंदी हायस्कूल, हिंदी प्राथमिक व माध्यमिक विभाग, श्री इंद्रदेव सिंह हिंदी हायस्कूल इंग्रजी माध्यम प्राथमिक व माध्यमिक विभाग, श्री इंद्रदेव सिंह इंटरनॅशनल स्कूल (CBSE), राम निरंजन झुनझुनवाला महाविद्यालय आणि HVPS लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम. यामध्ये गणेश वंदना, आरोहण, भारूड, वराहस्वरूपम्, ‘अटल भक्ती–अजय शक्ती’, ‘Say NO to Drugs’, ‘युग बदलले, सवाल वही, न्याय कहाँ?’ ही नाटिका, वारकरी वारी नृत्य तसेच ‘क्या से क्या हो गया’ यांसारख्या विविध कलाविष्कारांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणांना उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. शामल खानविलकर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या योगदानाचेही कौतुक करण्यात आले.शेवटी आरती आणि प्रसाद वितरणाने या ८८ व्या स्थापना दिन सोहळ्याची सांगता झाली.

आगरी कवितांचे बादशाह पुंडलीक म्हात्रे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

नवी मुंबई : शिवतुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई संचलित, संवाद नात्यांचा ‘कविता डॉट कॉम' या साहित्य संस्थेचा ४था वर्धापन दिवस, कविता डॉट कॉमचा...