भारताची सागरी खाद्य निर्यात ७२,००० कोटी रुपयांच्या पुढे, देशाच्या सागरी उत्पादनांच्या निर्यातीच्या इतिहासात गाठला सर्वकालीन उच्चांक !!
कोची : एमपीईडीएने (MPEDA) प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताची सागरी खाद्यपदार्थांची निर्यात १९.३२ लाख मेट्रिक टनांवर पोहोचल्याने, ती विक्रमी ७२,३२५.८२ कोटी (८.२८ अब्ज अमेरिकन डॉलर्स) रुपयांवर पोहोचली आहे.
गोठवलेली (फ्रोझन) कोळंबी ही वाढीचा प्रमुख घटक राहिली, जिने ४७,९७३.१३ कोटी (५.५१ अब्ज अमेरिकन डॉलर्स) रुपयांचे योगदान दिले, जे एकूण निर्यात उत्पन्नाच्या दोन-तृतीयांशपेक्षा जास्त आहे. कोळंबीच्या निर्यातीत परिमाणात ४.६०% आणि मूल्यात ६.३५% वाढ झाली, ज्यामुळे भारताच्या सागरी उत्पादनांच्या निर्यातीत तिचे वर्चस्व अधिक दृढ झाले.
२.३२ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या आयातीसह, अमेरिकेने सर्वात मोठे निर्यात स्थळ म्हणून आपले स्थान कायम राखले. तथापि, अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत परिमाणात १९.८० % आणि मूल्यात १४.५० % घट झाली, जे प्रामुख्याने परस्पर शुल्कांचा परिणाम दर्शवते. चीन, युरोपीय संघ आणि आग्नेय आशियाई देशांसारख्या पर्यायी बाजारपेठांमधील दमदार वाढीमुळे ही घट भरून निघाली.
दुसरे सर्वात मोठे निर्यात केंद्र असलेल्या चीनला होणाऱ्या निर्यातीत मूल्याच्या दृष्टीने २२.७०% आणि परिमाणाच्या दृष्टीने २०.१०% वाढ झाली. युरोपियन युनियनने जोरदार वाढ नोंदवली, निर्यात मूल्याच्या दृष्टीने ३७.९% आणि परिमाणाच्या दृष्टीने ३५.२० % वाढ झाली. आग्नेय आशियामध्येही लक्षणीय विस्तार नोंदवला गेला, जिथे मूल्य आणि परिमाणामध्ये अनुक्रमे ३६.१०% आणि २८.२०% पेक्षा जास्त वाढ झाली. जपानला होणाऱ्या निर्यात मूल्याच्या दृष्टीने ६.५५% वाढ झाली, तर, आर्थिक वर्षाच्या अखेरच्या काळात पश्चिम आशियात निर्माण झालेल्या अशांततेमुळे पश्चिम आशियाकडे होणाऱ्या व्यवहारांमध्ये ०.५५% ची किरकोळ घट दिसून आली.
अनेक स्वतंत्र बाजारपेठांमध्ये दमदार दुहेरी अंकी वाढ नोंदवली गेली, ज्यामुळे पारंपरिक बाजारपेठांमधील व्यापारविषयक प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविधीकरणाकडे होणारा स्पष्ट कल अधोरेखित झाला.
उत्पादनांच्या बाबतीत, गोठवलेले (फ्रोझन) मासे, स्क्विड, कटलफिश, सुके मत्स्य पदार्थ आणि जिवंत मत्स्य घटक यांच्या निर्यातीत सकारात्मक गती दिसून आली, तर चिल्ड उत्पादनाच्या निर्यातीत घट झाली. सुरिमी, फिशमील आणि फिश ऑइलच्या निर्यातीत सुधारित कामगिरी नोंदवली गेली.
लॉजिस्टिक्सच्या बाबतीत, विझाग, जेएनपीटी, कोची, कोलकाता आणि चेन्नई या शीर्ष पाच बंदरांचा एकूण निर्यात मूल्यात जवळपास ६४% वाटा होता, जे भारताच्या सागरी खाद्य निर्यात पुरवठा साखळीतील त्यांचे सातत्यपूर्ण महत्त्व अधोरेखित करते.