नवी मुंबई (सानपाडा):शिवसेना सानपाडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सार्वजनिक चैत्र नवरात्रोत्सव २०२६ यंदा अत्यंत भक्तीमय वातावरणात, उत्साहात आणि शिस्तबद्ध नियोजनासह संपन्न झाला. गुढीपाडवा ते रामनवमी या नऊ दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक,सांस्कृतिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.
उत्सवाच्या प्रारंभी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुढी उभारून आणि देवीची विधिवत स्थापना करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.त्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरती,पूजन, अभिषेक,मंत्रोच्चार यांसारखे धार्मिक विधी पार पडले.भक्तांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले व नवरात्रोत्सवाचा आनंद लुटला.
उत्सवाच्या प्रत्येक दिवशी विविध विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.स्वामी समर्थ महाराज आणि श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन, भजन-कीर्तन,प्रवचन, हळदी-कुंकू समारंभ,गोंधळ, होमहवन,संगीत कार्यक्रम,ब्रास बँड, कन्या पूजन,माता की चौकी, रासगरबा,महिला मेळावे तसेच सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारे उपक्रम यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले.काही दिवशी सामूहिक जपयज्ञ,प्रार्थना यज्ञ तसेच आध्यात्मिक मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करण्यात आले. दररोजच्या आरतीचा मान विविध मान्यवर,ज्येष्ठ नागरिक संघटना, महिला संघटना यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.यामुळे कार्यक्रमाला भक्तिभावासोबतच सामाजिक एकतेची सुंदर जोड लाभली.
याशिवाय नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रमात महिलांचा,युवकांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.या उत्सवकाळात सानपाडाकरांसाठी कोकणी बाजारपेठ देखील उपलब्ध केली होती.त्यालाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रामनवमीला विशेष पूजा, आरती,भजन व महाप्रसादाने उत्सवाची भक्तिमय सांगता करण्यात आली.संपूर्ण नवरात्र काळात सानपाडा परिसरात धार्मिकतेसह सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन घडले. या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना सानपाडा विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी परिश्रम घेतले.सर्वांनी मिळून हा उत्सव यशस्वी केल्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले. या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आमचा केवळ धार्मिक परंपरेचे जतनच नाही तर,सामाजिक बांधिलकी, एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा नेहमीच प्रयत्न असतो असं मंडळाचे अध्यक्ष श्री.अजित सावंत यांनी सांगितले.