आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १९ एप्रिल, २०२६

मैत्रीचा सुवर्ण महोत्सव !! ५० वर्ष आयुष्य घडवणारी मैत्री..

     आज अक्षय्य तृतीया. स्वयंसिद्ध मुहूर्त मानल्या गेलेल्या या दिवसाचे महत्त्व मानवी जीवनाच्या प्रवासात खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असेही म्हणतात. आणि या दिवशी दोन व्यक्तींमध्ये मैत्री जोडली गेली तर तीही अक्षय्य राहते, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे माझी व श्री. बलवबीर अधिकारी यांच्याशी झालेली मैत्री. आज गेली पन्नास वर्षे ती अक्षय्य आहे.
      खरे तर! आज ते ८७ वर्षांचे होत आहेत; तर मी ७२ वर्षे पूर्ण करत आहे. तब्बल १५ वर्षांचा वयात फरक. पण आजही तेच प्रेम, भावना, तीच एकमेकां विषयी ओढ, आपुलकी, श्रद्धा अशा सर्व स्तरावर मैत्री टिकून आहे. खरे तर, माझे पालक व गुरु या नात्याने त्यांनी माझ्या जीवनात फार महत्त्वाची आणि मोठी भूमिका बजावली. आणि माझा व्यक्तिमत्व विकास सर्व अंगाने घडवून आणला. कधी आपुलकीच्या प्रेमाने तर कधी रागावून, पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन मला त्यांनी घडवले हे मात्र अगदी खरे.
     असं मानलं जातं की जीवनात अशी काही नाती जुळून येतात जी रक्ताच्या नात्या पेक्षा अधिक घट्ट, अधिक अर्थपूर्ण आणि अधिक टिकाऊ ठरतात. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड या उपक्रमात काम करताना माझ्या आयुष्यात बालबीर अधिकारी यांच्याशी जुळून आलेले नाते म्हणजे माझ्या दृष्टीने अपूर्व गोष्ट ठरली. श्री. बलबीर अधिकारी यांच्याशी जोडली गेलेली मैत्री माझ्या जीवनाचा आधारस्तंभ ठरली.
     मी ग्रामीण भागातून मुंबईत आरसीएफ लि. मध्ये नोकरीच्या निमित्ताने आलो, तेव्हा माझ्यासाठी सर्व काही नवीन, अनोळखी आणि आव्हानात्मक होते. अशावेळी श्री. बलबीर अधिकारी यांच्या सहवासात मी आलो ते केवळ त्यांच्या विचार बांधिलकीमुळे. ते एक व्यक्ती नव्हते तर एक विचार होते. संस्कारक्षम युवा पिढी घडविण्याचा त्यांचा संकल्प होता.. सेवाभावाचा, समाजासाठी झिजण्याचा आणि माणूस घडविण्याचा.. बुद्धिवान व्यक्ती तयार करण्याऐवजी चांगला नागरिक बनविण्याचा.
     श्री. बलबीर अधिकारी हे आरसीएफ मधील युथ कौन्सिल या सेवाभावी संस्थेच्या संस्थापकांपैकी एक होते. ग्रामीण भागातून कंपनीत नोकरीच्या निमित्ताने आलेल्या युवकांना नोकरी सांभाळून विधायक कार्यात त्यांना सामावून घेणे हे संस्थेचे ध्येय होते. युथ कौन्सिलच्या माध्यमातून विविध स्तरावर त्यांनी समाजहितासाठी जे जे उपक्रम राबविले होते, राबवत होते त्याचा प्रभाव माझ्यावरही खोलवर झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी केवळ काम शिकलो नाही तर मला जीवन जगण्याची दिशा मिळाली. व्यक्तिमत्व विकास, श्रमदान, शिस्त, कष्ट, पडेल ते काम करण्याची तयारी आणि समाजाप्रती बांधिलकी या सगळ्या मूल्यांची जाणीव त्यांनी माझ्या मनात रुजवली. वर सांगितल्याप्रमाणे आज मी ७२ वर्षांचा आहे आणि ते ८६ वर्षांचे आहेत. पण आमच्या मैत्रीतील उब तेवढीच ताजी आहे. अगदी कौटुंबिक स्तरावरही ती आबादीत आहे. आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखात आम्ही एकमेकांसोबत उभे राहिलो. काळ बदलला, परिस्थिती बदलली, वास्तव्याची जागा बदलली, सेवानिवृत्त झालो पण आमच्या मैत्रीची नाळ कधीच तुटली नाही. पन्नास वर्षे ही केवळ एक संख्या नाही... ती एक प्रवास आहे.. आठवणींचा, संघर्षाचा, शिकण्याचा आणि एकमेकांना समजून घेण्याचा. माझ्या जीवनात अनेक कटू प्रसंगही आले. खूप संघर्ष आला पण या जीवनाच्या प्रवासात, कठीण प्रसंगी श्री. अधिकारी माझ्या मागे पहाडासारखे उभे राहिले. त्यांनी मला उभे केले आणि जीवनाचा खरा अर्थ समजावून दिला.
     आज या सुवर्णक्षणी मनात एकच भावना दाटून येते... कृतज्ञतेची. मुंबई सारख्या मोहमयी महानगरीत आल्यावर अशा मित्राची साथ लाभणे हे माझे भाग्यच आहे. नोकरीत असताना आणि आत्ताही त्यांच्या सहवासात घालवलेले व घालवले जात असलेले क्षण माझ्यासाठी अमूल्य आहेत. म्हणूनच गेली पन्नास वर्षे सर्वार्थाने, एवढ्या आपुलकीने टिकलेली मैत्री दुर्मिळच... असं म्हटलं तर वावगं ठरु नये. आरसीएफ परिवार माझा आहे आणि मी आरसीएफ परिवाराचा एक भाग आहे. माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत या परिवाराचाही वाटा आहे. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने हे आपल्याशी शेअर करावसं वाटलं...
धन्यवाद.

सुभाष हांडे देशमुख
एक सेवानिवृत्त कर्मचारी आरसीएफ.

महाराष्ट्र प्रदेश रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघाचे ५५ वे अधिवेशन उत्साहात संपन्न

मुंबई : दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी चार ते नऊ या वेळेत मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर गावस्कर सभागृह येथे रात्र शाळा मुख्याध्यापक संघाचे अधिवेशन संपन्न झाले. प्रथम आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे आणि कार्यवाह शिवाजी खैरमोडे यांच्या शुभहस्ते हस्ते सन्मान करण्यात आले. 
      कार्यक्रमाची सुरुवात या वर्षी निधन पावलेल्या आजी-माजी मुख्याध्यापक संघाचे सदस्य आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहून झाली.
तदनंतर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यांनी सांगितलं की ते विद्यार्थी दिवसा कष्टाचे काम करून रात्रीच्या वेळी तीन तासात शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्र शाळा वरदान ठरतात.गरीब व गरजू कष्टकरी विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने 1855 साली महात्मा ज्योतीबा फुले यांची पुणे येथे आणि 1866 साली भिकोबा चव्हाण यांनी प्रथम मुंबईत रात्र शाळा सुरू केली. औद्योगिक शहरात दिवसाच्या शाळेला जोडून रात्र शाळा सुरू करण्यात आल्या.
नंतर 1947 ते 1953 दरम्यान पुणे, नागपूर,मुंबई, कोल्हापूर, या शहरात रात्रशाळा सुरू करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन रात्र कनिष्ठ महाविद्यालय रात्र महाविद्यालय सुरू करण्यात आली. रात्री शाळांच्या कार्याची सूत्रता आणण्यासाठी सन 1951 रोजी मुख्याध्यापक संघाची स्थापना करण्यात आली 1990 साली पब्लिक ट्रस्ट अॅक्ट नुसार संस्था रजिस्टर करण्यात आली. त्यानंतर वेगवेगळ्या शहरात हे अधिवेशन घेण्यात येत आहे.
रात्र शाळा शिक्षक विद्यार्थी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून समन्वयाने मार्ग काढण्याचे काम संघटना गेली साठ वर्ष करत आहे शिक्षकांचे प्रबोधन उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांच्या व रात्र शाळांचा गौरव विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी संघटनेमार्फत केला जातो शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यामार्फत शिक्षकांचे व विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोन सहानुभूती आहे.आता रात्र शाळांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत रात्र शाळा टिकायला पाहिजे असं त्यांनी सांगितले. रात्र शाळा बंद होता कामा नये असे त्यांनी सूचित केले.
       तदनंतर शिक्षक भारतीचे कार्यवाह श्री सुभाष मोरे यांनी सविस्तरपणे रात्र शाळांचे प्रश्न मांडले रात्र शाळांमध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत शून्य संच मान्यता विद्यार्थी असताना का देतात? अनेक प्रश्न रात्रशाळांचे अनेक प्रश्न शासन दरबारी रखडले आहेत रात्र शाळांचे धोरण निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली होती त्याचा अहवाल अजून दिला नाही. शिक्षक काम करत आहेत पण वेळेवर पगार मिळत नाही.
      आदरणीय शिक्षक भारतीचे अध्यक्ष श्री बेलसरे सर यांनी संपूर्ण रात्रशाळांचा इतिहास सांगितला पूर्वी रात्र शाळांची परिस्थिती काय होती आणि आता काय आहे शासनाने जर मदत केली तर सगळं सोपस्कार होईल. श्री सातपुते सर यांनी रात्र शाळेमध्ये विद्यार्थी कसे वाढवायचे हे सांगितले आणि रात्र शाळांना शासनातर्फे संध्याकाळी मोफत आहार मिळतो काही ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे ज्या शिक्षकांना नेमणूका चुकीच्या दिलेल्या आहेत असे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट सांगितले. आदरणीय माजी आमदार कपिल पाटील साहेब यांनी रात्र शाळा तुम्हाला जर टिकवायच्या असतील तर तुम्हाला प्रथम विद्यार्थी वाढवावे लागतील ज्या शासनाने रात्र शाळा बंद केलेल्या आहेत त्या सर्व रात्र शाळा आपण पूर्ववत सुरू करू आणि आणखी नवीन रात्रशाळा आपण निर्माण करू म्हणजे नवीन सुरु करु असे त्यांनी ग्वाही दिली. आणि रात्र शाळांची लढाई अधिक जोमाने चालू ठेवायला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक संघातर्फे दरवर्षी दिले जाणारे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार आदरणीय माजी आमदार कपिल पाटील साहेब आणि अशोक बेलसरे सर यांच्या हस्ते शाल, बुके देऊन पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकांना गौरविण्यात आले
शेवटी मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह श्री शिवाजी खैरमोडे यांनी आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाले असे जाहीर केले. 
      या कार्यक्रमासाठी माजी आमदार कपिल पाटील शिक्षक भारती अध्यक्ष अशोक बेलसर सर, मुख्याध्यापक संघ सल्लागार आदरणीय दिनेश कुमार त्रिवेदी सर,शिक्षक भारती कार्यवाह सुभाष मोरे, सर. शिक्षक भारती साहित्य संमेलन अध्यक्ष जयवंत पाटील सर, शिक्षक भारती प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर , शिक्षक भारती प्राथमिक विभाग अध्यक्ष नवनाथ गेंड सर, शिक्षक भारती ज्यूनियर कॉलेज अध्यक्ष शरद गिरमकर सर, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे मुंबई अध्यक्ष देविदास पडांगळे मधुकर कांबळे,कोकीतकर सर, 
पुण्याचे सातपुते, कुलाल सर, श्री रवी कांबळे, अजित वाघमारे, नवनाथ जाडकर छात्र भारती कार्यवाह सचिन काकड,
ह्या सर्वाच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीयुत दत्तात्रेय सोनवणे सर यांनी केले. 

मैत्रीचा सुवर्ण महोत्सव !! ५० वर्ष आयुष्य घडवणारी मैत्री..

     आज अक्षय्य तृतीया. स्वयंसिद्ध मुहूर्त मानल्या गेलेल्या या दिवसाचे महत्त्व मानवी जीवनाच्या प्रवासात खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. धार्म...