मृत्यू हा जीवनाचा अटळ शेवट असला, तरी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्यातील जीवनदायी अंश इतरांच्या शरीरात धडधडत राहू शकतो, ही अवयवदानाची संकल्पना माणुसकीचा सर्वोच्च आविष्कार आहे. पुण्यातील कात्रज येथील गंगोत्री सोसायटीत राहण्राया सार्थक चुंबळकर या तरुणाच्या दुर्दैवी अपघाती निधनाने त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले; मात्र या असह्य दुःखाच्या क्षणी त्याचे पालक दीपक आणि ममता चुंबळकर यांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय केवळ कौतुकास्पद नाही, तर समाजाला दिशा देणारा आहे. एकुलत्या एक मुलाला गमावण्याचे दुःख कोणत्याही शब्दांत मावणारे नाही. तरीही त्या दुःखाला माणुसकीच्या सेवेत रूपांतरित करून त्यांनी सार्थकच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईतील दोन तसेच नाशिकमधील दोन अशा चार रुग्णांना नवजीवनाची आशा मिळाली. सार्थकच्या मृत्यूने एका कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला; पण त्याच्या अवयवदानाने चार कुटुंबांच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण उजळला.
सार्थक हरहुन्नरी, उत्साही आणि जगन्मित्र तरुण होता. सामाजिक कार्याची त्याला आवड होती. गणपती उत्सव, दहीहंडी, होळी, नवरात्र यांसारखे सण उत्साहाने साजरे करताना तो नेहमी पुढाकार घ्यायचा. व्हायोलिन वादनाची त्याला विशेष आवड होती आणि त्यासाठी तो विशारद परीक्षेचा अभ्यासही करीत होता. एका बाजूला कम्प्युटर सायन्सचे शिक्षण आणि दुस्रया बाजूला संगीताची साधना, तर त्याचवेळी स्वतच्या पायावर आर्थिकदृष्ट्या उभे राहण्याची धडपड; सार्थकच्या व्यक्तिमत्त्वातील जिद्द आणि स्वावलंबनाची हीच खरी ओळख होती. कोणावरही अवलंबून न राहता स्वतची कामे स्वत करण्याची त्याची वृत्ती होती. भविष्यात एमबीए करण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. लहान वयातच विविध क्षेत्रांतील अनेक व्यक्तींशी त्याने मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. म्हणूनच त्याचे जाणे ही केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर त्याला ओळखण्राया अनेकांची हानी आहे.
सार्थकचे आयुष्य अपघाताने थांबले असले, तरी त्याच्या अवयवदानामुळे त्याचे जीवन एका वेगळ्या अर्थाने पुढे सुरू राहिले आहे. मृत्यूनंतरही एखाद्याच्या हृदयाची धडधड, मूत्रपिंडाचे कार्य, यकृताचे जीवनदायी काम किंवा अन्य अवयव एखाद्या गरजू व्यक्तीला जगण्याची संधी देऊ शकतात, ही कल्पनाच माणुसकीला उंचावणारी आहे. अवयवदान म्हणजे केवळ शरीराचा एखादा भाग देणे नव्हे; ते म्हणजे एखाद्या अनोळखी व्यक्तीला उद्याचा दिवस देणे, त्याच्या कुटुंबाला पुन्हा आनंद देणे आणि मृत्यूच्या सावलीत उभ्या असलेल्या जीवनाला आशेचा हात देणे.
आजही आपल्या समाजात अवयवदानाबाबत अनेक गैरसमज, भीती आणि अज्ञान आहे. अवयवदानाची प्रक्रिया काय असते, कोणते अवयव दान करता येतात, मृत्यूनंतर अवयवांचे प्रत्यारोपण कसे केले जाते, याबाबत पुरेशी माहिती अनेकांना नसते. परिणामी, एका बाजूला प्रत्यारोपणाची गरज असलेले हजारो रुग्ण जीवन-मरणाच्या संघर्षात असतात आणि दुस्रया बाजूला संभाव्य दाते उपलब्ध असूनही जनजागृतीअभावी अनेक संधी वाया जातात. ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी समाजाची, वैद्यकीय क्षेत्राची, स्वयंसेवी संस्थांची आणि शासनाची आहे. अवयवदानाबाबत वैज्ञानिक माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. शाळा-महाविद्यालयांपासून सामाजिक संस्थांपर्यंत आणि माध्यमांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत अवयवदानाचा संदेश पोहोचवला पाहिजे.
सार्थकच्या पालकांनी घेतलेला निर्णय याच अर्थाने अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मुलाच्या निधनाचे दुःख मनात कायम असतानाही त्यांनी त्या दुःखाला समाजोपयोगी अर्थ दिला. आता त्यांनी भविष्यात अवयवदान आणि देहदान चळवळीत सक्रिय राहून जनजागृती करण्याचा निर्धार केला आहे, हीदेखील तितकीच प्रेरणादायी बाब आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती जपण्याचे अनेक मार्ग असतात; पण त्याच्या अवयवांमधून दुस्रया व्यक्तीचे आयुष्य वाचवणे हा त्यातील सर्वांत श्रेष्ठ मार्ग म्हणावा लागेल.
सार्थकचे जीवन अपूर्ण राहिले, पण त्याच्या अवयवदानाने चार जणांचे जीवन पुन्हा पूर्णत्वाकडे वाटचाल करू लागले. मृत्यूच्या क्षणीही माणूस दुस्रयाच्या जगण्याचे कारण ठरू शकतो, हे सार्थकच्या कुटुंबाने कृतीतून दाखवून दिले आहे. त्यामुळे सार्थकची कथा केवळ एका तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूची कथा म्हणून न पाहता, ती माणुसकीच्या विजयाची कथा म्हणून पाहिली पाहिजे. आज समाजानेही या घटनेतून धडा घ्यायला हवा. अवयवदानाबाबत प्रत्येक कुटुंबाने माहिती घ्यावी, गैरसमज दूर करावेत आणि शक्य असल्यास अवयवदानाची प्रतिज्ञा करावी. कारण संपत्ती, वस्तू किंवा पैसा दान केल्यानंतरही माणूस आठवणीत राहतो; पण अवयवदान केल्यावर एखाद्याच्या शरीरात जीवन बनून तो प्रत्यक्ष जगत राहतो.
म्हणूनच सार्थकच्या स्मृतीला खरी आदरांजली ही त्याच्या छायाचित्राला हार घालण्यात नाही, तर त्याने दिलेल्या जीवनसंदेशाला पुढे नेण्यात आहे. त्याच्या पालकांनी दुःखाच्या महासागरातून माणुसकीचा दीप प्रज्वलित केला आहे. त्या दीपातून समाजातील प्रत्येकाने प्रकाश घ्यावा. मृत्यू अटळ आहे; पण मृत्यूनंतरही कोणाच्या तरी श्वासाचे कारण होणे आपल्या हातात आहे. सार्थकने चार कुटुंबांना जीवनाची नवी उमेद दिली आहे. म्हणूनच त्याची कहाणी ' मरावे परी अवयवदानरूपी उरावे ' हा एकच संदेश देते..
गणेश हिरवे
(जोगेश्वरी पूर्व -मुंबई )
सार्थकचे मामा/अवयवदान देहदान कार्यकर्ते
मो.9920581878