आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६

लहान मुलांमध्ये रमणारे आनंद दिघे साहेब...

ठाणे (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)_प्रत्येक व्यक्तीला कामाच्या रहाटगाडग्यातून मन रमण्यासाठी काहीतरी वेगळेपण हवे असते... मग त्यासाठी तो वेगवेगळे छंद जोपासत असतो... आनंद दिघेसाहेब आणि लहान मुले हे एक वेगळंच Combination होते... ते लहान मुलांमध्ये इतके रमत की, ते एखाद्या ठिकाणी, कार्यक्रमात किंवा शाळेत गेले तर तेथील लहान लहान मुलांमध्ये अगदी रममाण होऊन पुढील एखाद्या ठिकाणी जाण्यास विसरत... मग त्या मुलांना खाऊ, भेटवस्तू देऊन अगदी त्यांच्यामध्ये आणि त्यांच्यातीलच ते होऊन जात असंत.!_*
        *_दीपावलीच्या सुट्ट्या शाळांत जाहीर झाल्या की, साहेब संपूर्ण ठाणे जिल्यातील लहान मुलांना क्रिकेटचं साहित्य देत असंत... अगदी सकाळीच लहान लहान मुले एका पानावर संबंधित संघाचे नाव, संघातील सर्व खेळाडूंची नावे लिहून आणीत... लहान मुलांचा टेंभी नाक्यावरील गोंधळ, गोंगाट, रांगा लावण्यावरून त्यांची आपसांत होणारी लुटुपुटीची भांडणे साहेबांना खूप आवडत असंत.! मग आम्ही कुणीतरी त्या सर्व संघातील सदस्यांची हजेरी घेऊन तिच सर्व मुले आलेली आहेत का.? त्याचबरोबर त्यांची नावे यादीतील नावाप्रमाणे तपासून खात्री करून अंतिम यादी साहेबांकडे देत असू... मग साहेब तो क्रिकेटचा तयार संच भेटण्यास आलेल्या कोणत्याही व्यक्ती, कार्यकर्त्याच्या हस्ते त्या संघाला सुपूर्द करीत असंत... आणि मग ते साहित्य मिळाल्यावर लहान मुलांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद, तो जल्लोष साहेब मिश्किलपणे हसत तो आनंद टिपत असंत, त्यांना त्यामध्ये एक वेगळाच आनंद प्राप्त होत असे... आमच्यापैकीच कोणीतरी संबंधित क्रिकेटचं साहित्य पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्याला लाखोंच्या बिलांचे धनादेश घेऊन जायचो... परंतू सदर साहित्य वाटत असतांना कोणीही फोटो काढून त्याची कोठेही प्रसिद्धी केलेली त्यांना अजिबात आवडत नसे... तोच नियम जून, जुलै, ऑगस्ट असे ३/४ महिने सलग शाळांतील विद्यार्थ्यांना सरसकट वह्या वाटपाच्या कार्यक्रमाबाबत.! तिथे तो विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे की सधन घरातील, हा भेदभाव नसे... आणि संबंधित साहित्य वाटतानाही फोटो, प्रसिद्धी या प्रकाराला त्यांचा तीव्र विरोध असे, त्यांचे म्हणणे असे की लोक आपल्याकडे मदतीला गंमत म्हणून येत नाहीत, ती त्यांची मजबुरी असते, आणि आपण जर असे काही उद्योग केले तर उद्या आपल्याकडे या मदतीसाठी कुणीही येणार नाही... त्यामागे त्यांची किती संवेदनशीलता, किती उदात्त विचार होते.? जिल्ह्याच्या ग्रामीणच नव्हे तर काही शहरी भागांतही या वह्या किंवा शालोपयोगी साहित्य ट्रक/टेम्पो भरभरून ३/४ महिने जात असंत...
       नोव्हेंबर, डिसेंबर महिना सुरू झाला की लहान मुलांना घेऊन पालक शाळांच्या प्रवेशासाठी आनंदाश्रमात (कार्यालयात) यायचे... कार्यकर्त्यांची लगबग व्हायची... ठाणे जिल्यातील शाळांच्या नावांचे वेगवेगळे फोल्डर्स बनवून त्या त्या फोल्डर्समध्ये त्या त्या विद्यार्थ्यांची नावे, पत्ते, संपर्क दूरध्वनी नोंदण्याची जबाबदारी एखाद्या कार्यकर्त्यावर दिली जायची... (बहुदा ते रजिस्टर तयार करण्याची जबाबदारी आमच्यावरच असायची)... त्या सर्व विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाचा हा अखंड यज्ञ जून/ जुलै/ऑगस्ट ते अगदी सप्टेंबर पर्यंतही सुरू असायचा... या शालेय प्रवेशांसाठी साहेब सर्व महत्त्वाची कामे बाजूला सारून पुनःपुन्हा शाळेत चकरा मारत पण त्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान ते होऊन देत नसत...
        आनंदाश्रमातील त्यांच्या टेबलवर सतत मिठाई, पेढ्यांचे बॉक्सेस असंत... कोणीही लहान मुले आली की त्यांना ते ती मिठाई देत असत, ऐनवेळी अगदी काही नसले तरी चॉकलेटचा डबा आतमधून आणून त्यांना चॉकलेट तरी ते देत असंत, पण त्या लहान बालकाला ते विन्मुख पाठवत नसत, कामाच्या धबडग्यातही त्या मुलाला ते उचलून घ्यायचे, त्या लहान शिशूला त्याच्या कोमल गालावर हात फिरवून शब्द दिला जायचा "बेटा, मी तुला हवे तिथे तुझं ऍडमिशन करून देईन" मुले खुश होऊन नाचायला लागली की, त्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद साहेबांना फारच समाधान देऊन जात असे...
      येत्या २६ ऑगस्ट २०२६ रोजी साहेबांना परलोकवासी होऊन २५ वर्षे होतील, परंतु प्रत्येक ठाणेकरांच्या हृदयात साहेबांनी असे काही स्थान प्राप्त केलेय की सहजासहजी लोक साहेबांना विसरू शकत नाहीत, नव्हे नव्हे ठाण्यात एक पिढीच साहेबांनी घडवलेली होती...
        कितीही कातडे पांघरा, असे साहेब होणे नाही, साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.!!
     २६  ऑगस्ट ठाण्याचे अनभिषिक्त राजे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची पुण्यतिथी, त्यांना विनम्र आदरांजली!!

-विजय चव्हाण...

नारळी पौर्णिमेच्या जल्लोषात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर?

उत्सव मोठा; मग सुविधा कुठे?
खाडी-समुद्रकिनाऱ्यांवर प्रशासनाच्या उपाययोजना किती प्रभावी ? आगरी-कोळी बांधवांचा सवाल?
मुंबई : नारळी पौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी आणि खाडीपट्ट्यातील आगरी-कोळी समाजाच्या जीवनाशी, परंपरेशी आणि मासेमारी व्यवसायाशी जोडलेला महत्त्वाचा सांस्कृतिक उत्सव आहे. मुंबईपासून ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि कोकणातील विविध कोळीवाड्यांमध्ये या दिवशी दर्याराजाची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे.
मात्र, ज्या खाड्या आणि समुद्रकिनाऱ्यांवर नारळी पौर्णिमेनिमित्त मोठ्या संख्येने नागरिक, महिला, मुले आणि समाजबांधव एकत्र येतात, त्या ठिकाणी प्रशासनाकडून पुरेशा सुरक्षा उपाययोजना केल्या जातात का? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
       नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर गर्दी वाढते. अनेक ठिकाणी पारंपरिक मिरवणुका, पूजा, नारळ अर्पण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, बॅरिकेडिंग, प्रकाशव्यवस्था, स्वच्छता, प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका तसेच आपत्कालीन परिस्थितीत बचाव पथकांची उपलब्धता या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
केवळ प्रमुख समुद्रकिनाऱ्यांपुरतीच सुरक्षा नको
मुंबईतील प्रमुख समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रशासनाकडून सुरक्षेची व्यवस्था केली जाते. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर लाईफगार्डची संख्या वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला असून १३७ सुरक्षा रक्षक तैनात करण्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, मोठ्या शहरांतील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांप्रमाणेच छोट्या खाड्या, कोळीवाडे आणि स्थानिक पातळीवरील नारळी पौर्णिमा उत्सवाच्या ठिकाणीही समान सुरक्षाव्यवस्था असणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिकांकडून होऊ शकते.
    विशेषतः खाडीकिनारी काही ठिकाणी खोल पाणी, चिखल, घसरडे काठ, भरती-ओहोटी आणि अपुरी प्रकाशव्यवस्था यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. अशा ठिकाणी गर्दी नियंत्रणासाठी बॅरिकेडिंग आणि प्रशिक्षित बचाव पथकांची उपस्थिती महत्त्वाची ठरते.
     नारळी पौर्णिमा हा आगरी-कोळी समाजाच्या अस्मितेचा आणि परंपरेचा सण आहे. नवी मुंबईसारख्या खाडीकिनारी भागातही या सणाला विशेष महत्त्व आहे. मात्र, खाडीतील प्रदूषण आणि मासेमारीसमोरील अडचणी याबाबतही स्थानिक समाजाने यापूर्वी चिंता व्यक्त केली आहे.
       त्यामुळे प्रशासनाने केवळ उत्सवाच्या दिवशी बंदोबस्त न करता खाडी आणि समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षितता, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था आणि पर्यावरण संरक्षण याकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
प्रशासनासमोर काही महत्त्वाचे प्रश्न
- नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक प्रमुख खाडी व समुद्रकिनाऱ्यावर प्रशिक्षित लाईफगार्ड उपलब्ध आहेत का?
- धोकादायक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे का?
- आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका आणि प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था आहे का?
- भरती-ओहोटीची माहिती नागरिकांना देण्यासाठी सूचना फलक लावले आहेत का?
- रात्रीच्या कार्यक्रमांसाठी पुरेशी प्रकाशव्यवस्था आहे का?
- गर्दी वाढणाऱ्या कोळीवाड्यांमध्ये पोलीस आणि वाहतूक पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त आहे का?
- खाडीकिनारी कचरा आणि प्लास्टिक रोखण्यासाठी विशेष स्वच्छता पथक तैनात केले आहे का?
परंपरेचा उत्सव सुरक्षित वातावरणात व्हावा
       नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीचा हंगाम सुरू होतो आणि कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून सुरक्षित मासेमारीसाठी दर्याराजाकडे प्रार्थना करतात. रायगडमध्ये यंदाच्या नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी हंगामाला सुरुवात झाली असून हजारो कामगार या व्यवसायाशी जोडले जाणार असल्याचे वृत्त आहे.
      परंपरा जपताना सुरक्षिततेशी तडजोड होऊ नये, हीच अपेक्षा आहे. नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यासाठी प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक आगरी-कोळी मंडळांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.
उत्सवाच्या दिवशी प्रशासनाची उपस्थिती केवळ बंदोबस्तापुरती न राहता, नागरिकांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी घेणारी असावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

लहान मुलांमध्ये रमणारे आनंद दिघे साहेब...

ठाणे (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)_प्रत्येक व्यक्तीला कामाच्या रहाटगाडग्यातून मन रमण्यासाठी काहीतरी वेगळेपण हवे असते... मग त्यासाठी तो वेगव...