लोकशाहीर चंदनशिवे यांनी लोकसाहित्य, लोकपरंपरा आणि आख्यान यांचे प्रकार सांगून, ”जांभूळ आख्यानाबाबत समर्पक शब्दामध्ये गुंफण करून, लोकगीतांमधूनदेखील आपणास समर्थपणे कसे सामर्थ्यशाली समाज स्वास्थ्य घडवता येते, यासाठी संत जनाबाई, संत एकनाथ महाराज संत तुकोबाराय यांनी जी मोठी परंपरा या महाराष्ट्राला दिली आहे, त्यातूनच फुले, शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार फार महत्वाचे आहेत असे प्रतिपादन केले. माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी खरे शिक्षण घडून येण्यासाठी सर्व समाजातील तळागाळातील लोकांनी शिक्षणाचे मूळ जाणून घ्यावे, मोल जाणून घ्यावे, खरा सत्कारणी पैसा लागावा, बुवाबाजीपासून लांब राहावे असे प्रतिपादन केले.
शिवतुतारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये कुठल्यातरी एखाद्या परदेशातील चौकात कविता सादर करून परदेशवारी करण्यासाठी कविता डॉट कॉमला टेंभा मिरवायचा नसून, गावागावांत ”जॉनी जॉनी यस पप्पा ऐवजी”, ”आजोबा आजोबा कुठे गेले होते, कोकणात!” ही कविता तर, ”रेन रेन गो अवे” या कवितेऐवजी, ”येरे येरे पावसा” या कवितेची आस आणि कास असल्याचे नमूद केले. ऑनलाइनच्या जीवनातदेखील आम्हाला ऑफलाईनच जास्त कार्यक्रम करावेसे वाटतात. कारण माणसा माणसातला संवाद हा बोटांनी पाठवलेल्या संवेदनेवरती तोलू शकत नाही असेही ते म्हणाले. पुंडलिक म्हात्रे यांचे करून औक्षण करून त्यांना राजमुद्रेसह जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. म्हात्रे यांनी भाषणात आपली खदखद, व्यक्त करत असताना येणाऱ्या दिवसांमध्ये मराठी माणूस, मुंबईमध्ये उपरा होणार नाही ना, याची काळजी घ्या असा ज्येष्ठत्वाचा सल्ला दिला, आपली सुप्रसिद्ध आगरी कविता, ”हरकत काय हाय तुमची” सादर करून रसिकांची दाद मिळवली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कविता डॉट कॉमचे सर्व सदस्य आणि शिवतुतारी प्रतिष्ठान कार्यकारिणीने परिश्रम घेतले.