मुंबई (रामदास धो. गमरे) तथागत गौतम बुद्धांच्या समता, शांती, मैत्री या संदेशाची जगातील सर्वच विद्वानांना जाणीव झाली म्हणूनच ब्रह्मदेशातील रंगून येथे १९५४ साली ६ व्या धम्मसंगतीचे आयोजन करण्यात आले होते या धम्मसंगती मध्ये बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होऊ लागली या धम्मसंगती साठी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद व पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी शुभेच्छा संदेश पाठवले होते या धम्म संगतीला भारतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित होते, त्यानंतर दोन वर्षांनी बाबासाहेबांनी नागाची नागभूमी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी पाच लाख लोकांना धम्म दीक्षा देऊन बुद्धाच्या ओटीत टाकले आणि धम्मचक्र फिरवले त्याठिकाणी झालेल्या ठरावानुसार बाबासाहेबांनी काही गाथांचे संकलन करून पुस्तिका बुद्ध पूजापाठ ही पुस्तिका सुद्धा प्रकाशित केली होती. बुद्ध पूजेत आठ गाथा येतात बाबासाहेब म्हणतात की बुद्धपूजा म्हणजे बुद्धांचा गौरव आणि त्यांच्या सन्मानप्रीत्यर्थ पाली वचनांच्या माध्यमातून पुष्पपूजा, दीपपूजा, सुगंधी द्रवपूजा म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा मार्ग होय, बुद्धपूजेत आपल्याला काही मिळाव हा उद्देश नसून ती बुद्धाची गौरवगाथा आहे" असे प्रतिपादन गुहागर तालुक्यातील उमराठ गावचे सुपुत्र प्रवचनकार सुगंध भिवा कदम यांनी धम्म प्रवचन मालिकेचे दुसरे पुष्प गुंफत असताना केले.
बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले, तद्नंतर नवीन बॅच च्या बौद्धाचार्या स्नेहा संतोष पवार यांनी आपल्या सुमधुर आवाजात धार्मिक विधी पठण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. संस्कार समितीचे चिटणीस मनोहर बा. मोरे यांनी आपल्या पहाडी व भारदस्त आवाजात लाघवी भाषाशैलीत सूत्रसंचालन केले तर अध्यक्ष मंगेश पवार यांनी प्रास्ताविक सादर करीत असताना कोणताही कार्यक्रम प्रसंगी ज्याने धम्माला धन आणि संतती अर्पण केली अशा सम्राट अशोक आणि बौद्धाचार्यांचे जनक सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी केला पाहिजे जेणेकरून सम्राट अशोक आणि भैय्यासाहेब घराघरात पोहोचतील अशी बौद्धचार्यांना सूचना दिली.
अध्यक्षीय भाषणात सभापती आनंदराज आंबेडकरांनी "बुद्ध पूजा का केली जाते यावर सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले तसेच प्रवचनकार सुगंध मोहिते यांनी प्रत्येक गाथेचा अर्थ स्पष्ट करून पाली भाषेचा मराठी अनुवाद सांगून प्रत्येक शब्दा शब्दाचा अर्थ मांडून ते सोप्या भाषेत सर्वांना कळेल असे मांडले याबद्दल त्यांचे कौतुक केले व अशा प्रवचनकार व बौद्धाचार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले पाहिजे" असे नमूद केले.
सदर प्रसंगी भगवान साळवी, राजेश गमरे, मंगेश जाधव, राजेश घाडगे आदींनी बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती, शिवडी विभाग यांच्या वतीने शिवडी विभाग गटक्रमांक १३ चे गटप्रतिनिधी, पत्रकार, विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास उपसभापती विनोद मोरे, सरचिटणीस राजेश घाडगे, अतिरिक्त चिटणीस श्रीधर साळवी, खजिनदार नागसेन गमरे, उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, एच. आर. पवार, चिटणीस तुकाराम घाडगे, श्रीधर जाधव, कांबळे, विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, महिला मंडळ, विविध उपसमित्या, मध्यवर्ती कार्यकारिणी मंडळ, विश्वस्त मंडळ, सर्व शाखा व त्यांचे कार्यकर्ते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून मनोहर बा. मोरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.