आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १० मार्च, २०२६

अ. भा.मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन 18,19 एप्रिल रोजी उदगीर येथे होणार !!

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभणार तर 
बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष..
 मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन 18 आणि 19 एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यात उदगीर येथे होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी आज येथे केली.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत असून बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे राजे भोसले अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असतील..
पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणारया आणि 87 वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचं दर दोन वर्षांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात राष्ट्रीय अधिवेशन होते.. यापुर्वी रोहा, पिंपरी-चिंचवड, शेगाव, नांदेड येथे परिषदेची अधिवेशनं झाली.. यावेळेस उदगीर येथे अधिवेशन होत असून अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे..
परिषदेच्या एका शिष्टमंडळाने अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, स्थानिक आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली.. मुख्यमंत्र्यांनी परिषदेची विनंती मान्य केली असून "मी नक्की येतो" असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.. मुख्यमंत्र्यांना आज भेटलेल्या शिष्टमंडळात परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, परिषदेचे मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, परिषदेचे लातूर विभागीय सचिव तथा अधिवेशनाचे प्रमुख संयोजक सचिन शिवशेट्टे, सातारा जिल्हा अध्यक्ष हरिष पाटणे, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे, संयोजन समितीचे युवराज धोतरे आदि होते..
     यंदाचं अधिवेशन हटके होणार आहे.. देशभरातील मान्यवर पत्रकारांना सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे..यंदाच्या अधिवेशनास देशभरातून 3000 पत्रकार येतील असा अंदाज असून त्यादृष्टीने व्यवस्था करण्यात येत आहे.. अधिवेशनाच्या उदगीर येथील कार्यालयाचे उद्घाटन देखील नुकतेच एस.एम.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले .. मराठी पत्रकारांच्या दृष्टीने गौरवाचा सोहळा असलेल्या परिषदेच्या अधिवेशनास मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, लातूर विभागीय सचिव तथा प्रमुख संयोजक सचिन शिवशेट्टे, संभाजीनगर विभागीय सचिव रवी उबाळे, संयोजन समितीचे श्री. युवराज धोतरे आदिंनी केले आहे..

महामंडळ म्हणजे पत्रकारांसाठी चॉकलेट : त्यापेक्षा प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या धर्तीवर व्यवस्था निर्माण करा : एस.एम.देशमुख यांची मागणी

मुंबई : पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करून पत्रकारांचे कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत, त्यापेक्षा "प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया" च्या धर्तीवर महाराष्ट्रात एक सक्षम वैधानिक व्यवस्था निर्माण करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे..
      मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती.. तेव्हाच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेसारखया काही संघटना आणि मान्यवर ज्येष्ठ पत्रकारांनी त्यास विरोध केला होता.. त्यामुळे तो विषय तेथेच थांबला .. मात्र काल पुन्हा विधिमंडळात हा विषय उपस्थित झाला. त्यात पत्रकारांसाठी महामंडळ लवकरच स्थापन करण्यात येईल अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली आहे..
महाराष्ट्रात अगोदरच जवळपास 70 आर्थिक विकास महामंडळं आहेत, ही महामंडळं म्हणजे पांढरे हत्ती आहेत. या महामंडळाच्या माध्यमातून एकाही समाजघटकाचा विकास झालेला नाही.. निधीचा अभाव आणि सरकारची उदासिनता यामुळे बहुतेक महामंडळं मृत्यूशय्येवर असल्याने ही व्यवस्था कुचकामी ठरली आहे.. अशा स्थितीत पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करून पत्रकारांचे कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत असे स्पष्ट मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे.. काही पत्रकारांची सोय लावण्यासाठीच या महामंडळाचा आग्रह धरला जात असल्याची टीकाही एस.एम.देशमुख यांनी केली आहे.
पत्रकारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी देशपातळीवर सुप्रिम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही वैधानिक व्यवस्था कार्यरत आहे.. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक सक्षम वैधानिक व्यवस्था उभी केली जावी अशी मागणीही एस.एम.देशमुख यांनी केली आहे..
सरकारची इच्छाशक्ती असेल तर पत्रकार पेन्शन, पत्रकार आरोग्य, गृहनिर्माण, पत्रकार संरक्षण कायदा , अधिस्विकृतीचे प्रश्न, वेतन आयोगाची अंमलबजावणी हे सारे विषय एका बैठकीत मार्गी लागू शकतात, त्यासाठी महामंडळाची गरज नाही.. मात्र पत्रकारांचे प्रश्न सुटावेत असे सरकारलाच वाटत नाही..बघा, पत्रकार पेन्शन योजनेसाठी जी समिती आहे, त्याची बैठक दीड वर्षांपासून झालेलीच नाही, पत्रकार संरक्षण कायदा झाला पण पण 8 वर्षांपासून त्याचे नोटिफिकेशन काढले गेले नसल्याने कायदयाची राज्यात अंमलबजावणी होत नाही, पत्रकारासाठीच्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करा असा सुप्रिम कोर्टाचा आदेश असतानाही सरकार काही करीत नाही, केवळ महामंडळ स्थापन करून सरकारच्या भूमिकेत फार फरक पडेल असे वाटत नाही, फक्त काही पत्रकारांची सोय लावण्यासाठी सरकारने महामंडळाचे चॉकलेट पत्रकारांना देऊ केले आहे असा आरोपही एस.एम.देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केला आहे..
      या संदर्भात प्रमुख दैनिकाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, प्रमुख पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करूनच सरकारने या संदर्भात निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणीही एस.एम.देशमुख यांनी केली आहे..

अ. भा.मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन 18,19 एप्रिल रोजी उदगीर येथे होणार !!

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभणार तर  बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष..  मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार पर...