आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १६ मे, २०२६

मराठी लेखक, नाटककार व मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे दुख:द निधन

कल्याण :( सुनील इंगळे )
डॉ. आनंद नाडकर्णी यांचा अल्पपरिचय : जन्म २२ डिसेंबर १९५८जरी व्यवसायानं डॉ.आनंद नाडकर्णी हे मानसोपचारतज्ञ असले तरी मानसोपचार करणं हा निव्वळ त्यांचा व्यवसाय नसून ती त्यांची सामाजिक बांधिलकी, कर्तव्य आहेअसं ते समजत. त्यांच्या वडिलांनी दिलेल्या सेवाव्रती वारसा ते आपल्या क्षेत्रातून पुढे नेण्याचा प्रयत्न करत राहिले.याच बरोबर ते लेखक,नाटककार राहिले आहेत. डॉ.आनंद नाडकर्णी यांनी १९८०साली एम.बी.बी.एस आणि १९८४ साली मनोविकारशास्त्रामध्ये एम.डी हे शिक्षण घेतले. मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींविरुद्ध 'चळवळ' उभारण्यासाठी एक संस्था स्थापन करायची कल्पना डॉ. नाडकर्णी यांच्या मनात मनोविकारशास्त्राचे शिक्षण घेताना आली,आणि त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवलीही. त्याप्रमाणे २३ मार्च १९९० रोजी ठाणे शहरात आयपीएच अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेची त्यांनी स्थापना केली.तीव्र मानसिक आजारांवर उपचार एवढ्यापुरतेच ठाण्यातील त्यांच्या या संस्थेचे काम मर्यादित नाही.उपचारांसाठी येणारा मनोरुग्ण, त्याचे कुटुंबीय, दैनंदिन जीवनातील प्रश्नांमुळे गांजलेली व्यक्ती, कोणतीही समस्या नाही परंतु मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग स्व-विकासासाठी करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, अशा सर्वांसाठी ही संस्था आहे. क्लिनिकल उपचार, समुपदेशन अशा रूढ मार्गांबरोबरच साहित्य, संगीत, नाट्य, चित्र, संवाद अशा आनंददायी साधनांचा कल्प्कतेने वापर केला जातो.आज नाडकर्णींच्या ह्या संस्थेमध्ये साठ मनोविकारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, पंचवीस आधार सदस्य आणि विविध सेवाभावी प्रकल्पांवर काम करणारे तीनशे प्रशिक्षित स्वयंसेवक कार्यरत आहेत. संस्थेचा स्वतःचा मनोआरोग्य प्रशिक्षण विभाग आहे. स्वतंत्र माध्यम विभाग, औद्योगिक प्रशिक्षण विभाग, क्रीडा मानसशास्त्र विभाग, संशोधन विभाग असे विविध गट कार्यरत आहेत. शिवाय एकाच वेळी अनेक वयोगटांसाठी अनेक सेवा, उपक्रम, प्रकल्प यांचे एक जाळे विणलेले आहे. कोणत्याही सरकारी किंवा परदेशी मदतीशिवाय ही संस्था काम करते, आणि तरीही संस्थेचं सेवाशुल्क नाममात्र आहे. डॉ. शुभा थत्ते, डॉ. अनुराधा सोवनी या मानसशास्त्रज्ञांबरोबरच विविध क्षेत्रातल्या अनेकांनी या संस्थेच्या वाटचालीत मोलाची साथ दिली आहे. डॉ.आनंद नाडकर्णी हे पुणे येथील 'मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रांचे'ही संस्थापक सदस्य होते.
डॉ.आनंद नाडकर्णी यांनी मानसशास्त्राव्यतिरिक्त अन्य विषयांवरही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या 'गद्धेपंचविशी' आणि 'विषादयोग' या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.आनंद नाडकर्णी यांनी 'रंग माझा वेगळा' व 'असेच आम्ही सारे' ही व्यावसायिक नाटके लिहिली आहेत. त्यांच्या 'मयसभा' या नाटकाला लेखन पुरस्कार मिळालेला आहे. ‘मिफ्ता’च्या नाट्य विभागासाठी आनंद नाडकर्णी यांची कथा संकल्पना असलेल्या ’गेट वेल सून’ या नाटकाची त्यावेळी १० सर्वोत्कृष्ट नाटकांत निवड करण्यात आली होती. .वयम् आणि Institute For Psychological Health(IPH) चे कार्यकारी विश्वस्त डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने 'बहुरंगी बहर' ही स्पर्धा इयत्ता सातवी ते नववीच्या मुलांसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येते.
डॉ.आनंद नाडकर्णी यांना त्यांच्याकार्याबद्दल “इंडियन मर्चंटचेंबर” प्लॅटिनम ज्युबली पुरस्कार, डॉ. अरुण लिमये स्मृती पुरस्कार, शतायुषी पुरस्कार, आय.एम.ए. चा “डॉक्टर ऑफ द इयर” १९९३, आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होते.
डॉ.आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
डॉ.आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके
असेच आम्ही सारे (नाटक), आम्ही जगतो बेफाम (नाटक), आरोग्याचा अर्थ, एका सायकिॲट्रिस्टची डायरी, कर्मधर्मसंयोग - मर्म सात्त्विक जीवनविकासाचे, किंचित,गद्धेपंचविशी, गेट वेल सून (नाटक, कथा संकल्पना आनंड नाडकर्णींची; नाट्यलेखन प्रशांत दळवी यांचे), जन्मरहस्य (स्किझोफ्रेनियावरील नाटक), Dialogue To Wellness (मूळ मराठी -मुक्तिपत्रे; इंग्रजी भाषांतरकार - सतीश बापट), त्या तिघांची गोष्ट (या नाटकाला महाराष्ट्र सरकारचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.), देवराईच्या सावलीत, Nature 'N' Signature (मूळ मराठी स्वभाव-विभाव, इंग्रजी भाषांतरकार - सतीश बापट), मनोगती, मनोविकास, मयसभा (या नाटकाला लेखन पुरस्कार मिळाला आहे), माझं प्रिस्क्रिप्शन, मितुले आणि रसाळ, मुक्तिपत्रे, रंग माझा वेगळा (नाटक), विषादयोग - ताण तणावांचे नियोजन, वैद्यकसत्ता, शहाण्यांचा सायकिअॅ ट्रिस्ट (आत्मचरित्रपर), स्वभाव-विभाव, हेही दिवस जातील!( संकलन :सुनील इंगळे )

गुरुवार, १४ मे, २०२६

खारेपाटाच्या पाणीप्रश्न सुटावा यासाठी अमर म्हात्रे यांचे सलग सहाव्या दिवशीही उपोषण सुरू !!

प्रतिनिधी : पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून सामाजिक कार्यकर्ते अमर बळीराम म्हात्रे यांच्या आमरण उपोषणाचा काल सहावा दिवस पूर्ण झाला. मात्र प्रशासन, पाणीपुरवठा विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधीं कडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या अनेक महिन्यां पासून विविध बैठका, आश्वासने आणि तांत्रिक उपायांच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात खारेपाटातील अनेक गावांना तीन ते पाच दिवस आड अपुऱ्या दाबाने पाणी मिळत असल्याची स्थिती आहे. कधी हेटवणे धरणावर अधिक क्षमतेचे पंप बसवण्याची घोषणा केली जाते, तर कधी CIDCO वॉशआऊट वरून जोडणी करण्याचा प्रस्ताव पुढे येतो, कधी बुस्टरपंप बसवण्याचा निर्णय होतो. त्यामुळे नेमकी अधिकृत आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य योजना कोणती, असा प्रश्न नागरिक आता विचारू लागले आहेत.
       दरम्यान, पाणीटंचाईचे खरे कारण “पाणी अपुरे असणे” नसून “दाबाने पाणी सोडल्यास पाईपलाईन फुटणे” हे असल्याचा गंभीर दावा स्थानिक नागरिकां कडून केला जात आहे. वाशीनाका ते वाशी बौद्धवाडा दरम्यान नव्याने टाकण्यात आलेली ३५५ मि.मी. HDPE पाईपलाईन तब्बल ५५ ते ६० वेळा फुटल्याचे बोलले जात असून, हे संभाव्य निकृष्ट काम, चुकीचे डिझाईन किंवा दर्जाहीन साहित्य वापराचे लक्षण असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे आज संपूर्ण खारेपाटासाठी कमी दाबाने पाणी सोडले जात असल्याने शेवटच्या गावांपर्यंत पुरेसा पुरवठा पोहोचत नसल्याची चर्चा आहे. “पाणी उपलब्ध असूनही योग्य दाबाने देता येत नाही” हेच खरे दुखणे असल्याचे आता अधिक स्पष्टपणे समोर येत आहे.
      मागील बैठकींमध्ये अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याचे निर्णय झाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र त्यावर अद्याप प्रभावी कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी केवळ आश्वासनां पुरते मर्यादित राहिले आहेत का?, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. रणरणत्या उन्हात एक सर्वसामान्य नागरिक जीवाची पर्वा न करता आमरण उपोषण करत असताना प्रशासन अजूनही बैठका आणि चर्चां या मध्येच अडकलेले दिसत असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता केवळ नवीन योजना जाहीर करण्या ऐवजी मूळ तांत्रिक दोष शोधून कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे.

[[ वाशी-शिर्की खारेपाटासाठी टाकण्यात आलेल्या ३५५ मि.मी. HDPE पाईपलाईनचे वारंवार फुटणे ही गंभीर बाब असून संपूर्ण लाईनचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट, Hydraulic Pressure Test आणि Material Quality Verification करण्यात यावे. तपासणी अहवाल सार्वजनिक करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी व आवश्यक असल्यास संपूर्ण नित्कृष्ट पाईपलाईन नव्याने बदलण्यात यावी.

 - राजेंद्र झेमसे, सामाजिक कार्यकर्ता]]
वाशी, ता. पेण, जि. रायगड.

मराठी लेखक, नाटककार व मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे दुख:द निधन

कल्याण :( सुनील इंगळे ) डॉ. आनंद नाडकर्णी यांचा अल्पपरिचय : जन्म २२ डिसेंबर १९५८जरी व्यवसायानं डॉ.आनंद नाडकर्णी हे मानसोपचारतज्...