आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३० मार्च, २०२६

सानपाडा येथे चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; विविध धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन

नवी मुंबई (सानपाडा):शिवसेना सानपाडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सार्वजनिक चैत्र नवरात्रोत्सव २०२६ यंदा अत्यंत भक्तीमय वातावरणात, उत्साहात आणि शिस्तबद्ध नियोजनासह संपन्न झाला. गुढीपाडवा ते रामनवमी या नऊ दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक,सांस्कृतिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.
             उत्सवाच्या प्रारंभी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुढी उभारून आणि देवीची विधिवत स्थापना करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.त्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरती,पूजन, अभिषेक,मंत्रोच्चार यांसारखे धार्मिक विधी पार पडले.भक्तांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले व नवरात्रोत्सवाचा आनंद लुटला.
             उत्सवाच्या प्रत्येक दिवशी विविध विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.स्वामी समर्थ महाराज आणि श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन, भजन-कीर्तन,प्रवचन, हळदी-कुंकू समारंभ,गोंधळ, होमहवन,संगीत कार्यक्रम,ब्रास बँड, कन्या पूजन,माता की चौकी, रासगरबा,महिला मेळावे तसेच सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारे उपक्रम यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले.काही दिवशी सामूहिक जपयज्ञ,प्रार्थना यज्ञ तसेच आध्यात्मिक मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करण्यात आले. दररोजच्या आरतीचा मान विविध मान्यवर,ज्येष्ठ नागरिक संघटना, महिला संघटना यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.यामुळे कार्यक्रमाला भक्तिभावासोबतच सामाजिक एकतेची सुंदर जोड लाभली.
             याशिवाय नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रमात महिलांचा,युवकांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.या उत्सवकाळात सानपाडाकरांसाठी कोकणी बाजारपेठ देखील उपलब्ध केली होती.त्यालाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 
      उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रामनवमीला विशेष पूजा, आरती,भजन व महाप्रसादाने उत्सवाची भक्तिमय सांगता करण्यात आली.संपूर्ण नवरात्र काळात सानपाडा परिसरात धार्मिकतेसह सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन घडले.  या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना सानपाडा विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी परिश्रम घेतले.सर्वांनी मिळून हा उत्सव यशस्वी केल्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले. या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आमचा केवळ धार्मिक परंपरेचे जतनच नाही तर,सामाजिक बांधिलकी, एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा नेहमीच प्रयत्न असतो असं मंडळाचे अध्यक्ष श्री.अजित सावंत यांनी सांगितले.

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा ३ आणि ४ एप्रिलला

गावक-यांकडून जय्यत तयारी;यात्रेचा लाभ घेण्याचे अशोक भोईर यांचे आवाहन
मुंबई(शांत्ताराम गुडेकर ) देवाप्रति श्रद्धा ज्यांच्या मनात वास्तव्य करते अशा व्यक्तीना आपण आस्तिक म्हणून ओळखतो,खरे पाहिले तर मनात भाव व देवापरी भक्ती मनापासून जोपासली तर मनुष्याच्या ह्दयातच देवाचे स्थान आहे.असे म्हटले जाते.या बाबी श्रद्धाळू माणसांना पटण्याजोगा नसतात.म्हणूनच ते जेथे देवाचे मंदिर आहे तेथेच देव दर्शनाला जातात.देशभरात अनेक तीर्थक्षेत्र आहेत.त्यातही महाराष्ट्रात तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे.या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी जे.एन.पी.टी बंदर घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा नावाचे गाव आहे.न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे.
           या गावाधील गावदेवीची यात्रा चैत्र कृष्ण पक्ष-१ दि.३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.तसेच पालखी सोहळा दि.४ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.गावामधील ग्रामस्थांनी जत्रेची विशेष तयारी झाली आहे.ग्रामसुधारक मंडळ न्हावे कमिटीचे अध्यक्ष राजेश काळूराम घरत,उपाध्यक्ष जयेंद्र जनार्दन पाटील,नितीन भरत भोईर, सतीष दत्ताराम भोईर,सुशांत बांद्रे,खजिनदार निलेश हरिश्चंद्ध भोईर,सहखजिनदार अनंत लहु म्हात्रे,चेतन लक्ष्मण कडू,समाधान सदानंद म्हात्रे ,सरपंच विजेद्र गणेश पाटील,उपसरपंच शैलेश विठ्ठल पाटील आणि सदस्य, सभासद तसेच संबंधित अन्य पदाधिकऱ्यांनी यांनी विशेष मेहनत घेतली आहे.तसेच पालखी सोहळ्यांसाठी मुंबई,ठाणे व पनवेल तसेच उरण तालुक्यातील आगरी-कोळी बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.गावदेवीचे देऊळ गावकऱ्यांच्या सहभागाने बांधण्यात आले आहे.ही देवी नवसाला पावते म्हणून महाराष्ट्र व परराज्यातूनही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात.गावदेवीची प्रसन्न व लोभसवाने रुप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळे भरून पहावे.असे आवाहन पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक दामू भोईर यांनी केले आहे.

सानपाडा येथे चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; विविध धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन

नवी मुंबई (सानपाडा):शिवसेना सानपाडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सार्वजनिक चैत्र नवरात्रोत्सव २०२६ यंदा अत्यंत भक्तीमय वातावरणात, उ...