आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २८ एप्रिल, २०२४

देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तपणे होणार साजरा ; विशेष योगदान दिलेल्या कर्तृत्ववान महिलांना लोकनिर्माण हिरकणी सन्मान २०२४ आणि कामगार क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार होणार प्रदान

मुंबई (शांताराम गुडेकर ) लोकनिर्माण वृत्तपत्राच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे जागतिक घडामोडींवर अनेक उपक्रम साजरे करण्यात येतात.गेली तीन वर्षे हे उपक्रम संयुक्तपणे साजरे केले गेले.याही वर्षी १ मे २०२४ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहर येथील पार्वती पॅलेस हाॅटेल सभागृहात सकाळी ११ वाजता जागतिक महिला दिन आणि कामगार दिन संयुक्तपणे साजरा करण्यात येणार आहे.‌या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.संजय मंगला गोपाळ (राष्ट्रीय समन्व्यक )जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्व्यय (N. A. P. M), पूर्व अध्यक्ष व विश्वस्त साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक तसेच साप्ताहिक लोकनिर्माण संपादक श्री. बाळकृष्ण कासार(अध्यक्ष -लोकनिर्माण प्रतिष्ठान )याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित रहाणार आहेत.या दिवशी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि राजकीय क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या कर्तृत्ववान महिलांना लोकनिर्माण हिरकणी सन्मान २०२४ आणि कामगार क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 
       विशेष म्हणजे २०२३ या वर्षी दीपावली निमित्ताने महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकनिर्माण न्युज चॅनल च्या माध्यमातून " दिवाळी आनंदाची, मेजवानी फराळाची" हे विषय घेऊन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांनी पाच ते दहा मिनिटात आणि दिलेल्या मुदतीत कृतीसह रेसीपीचे व्हिडिओ पाठविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला साथ देत अनेक महिलांनी नाव नोंदणी केली होती. यापैकी आठ महिलांनी दिलेल्या मुदतीत रेसिपी चे व्हिडिओ पाठवले होते. स्पर्धेचा निकाल हा ज्यांचे व्हुज आणि लाईक जास्त आले अशा तीन स्पर्धकांचे क्रमांक जाहीर करण्यात आले. त्यातील प्रथम क्रमांक सौ. साक्षी चव्हाण - राजापूर, द्वितीय क्रमांक सौ. मानसी चांदोरकर - चांदोर, तृतीय क्रमांक सौ. आदिती भावे - रत्नागिरी, आणि उत्तेजनार्थ सौ. रुता पंडित रत्नागिरी असून या पुरस्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि लोकनिर्माण चे सहसंपादक युयुत्सु आर्ते यांनी केले आहे.

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी

मुंबई (शांताराम गुडेकर) महाराष्ट्राला तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे. या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी जे. एन. पी. टी बंदर घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे .गावदेवीची यात्रा चैत्र शुद्ध कृष्ण पक्ष-१ बुधवार दि. २४ एप्रिल २०२४ रोजी संपन्न झाली. तर पालखी सोहळा गुरुवार दि. २५ एप्रिल २०२४ रोजी थाटामाटात पार पडला.अनेक गावामधील ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेतले व हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला . ग्रामस्थांनी जत्रेची विशेष तयारी केली होती.
            ग्रामसुधारक मंडळ न्हावे,कमिटी गजानन पांडुरंग म्हात्रे -अध्यक्ष,जयेंद्र जनार्दन पाटील -उपाध्यक्ष,निलेश हरिश्चंद्र भोईर -उपाध्यक्ष,प्रेमनाथ नामदेव म्हात्रे-उपाध्यक्ष,सतीश दत्ताराम भोईर -उपाध्यक्ष,विनोद एकनाथ पाटील -खजिनदार,अनंत लहु म्हात्रे -सहखजिनदार, सदानंद जगजीवन पाटील -सहखजिनदार,विशाल लक्ष्मण ठाकूर -सहखजिनदिर, विजेंद्र गणेश पाटील -सरपंच,राजेश गणेश म्हात्रे -उपसरपंच, हिरालाल हरी पाटील,सुहास पाटील, मनीष गणेश भोईर,अशोक दामू भोईर,आणि सदस्य, तसेच इत्यादी पदाधिकऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. तसेच पालखी सोहळ्यांसाठी मुंबई, ठाणे व पनवेल तसेच उरण तालुक्यातील आगरी-कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहीले होते. गावदेवीचे देऊळ गावकऱ्यांच्या सहभागाने बांधण्यात आले आहे. ही देवी नवसाला पावते म्हणून महाराष्ट्र व परराज्यातूनही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात. गावदेवीची प्रसन्न व लोभसवाने रुप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळे भरून पाहावे .सर्व भक्तांनी आरोग्य,सुख,शांती प्रदान करण्याची विनंती देवीला केली असे सदर गावचे सुपुत्र अशोक दामू भोईर यांनी बोलताना सांगितले.

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन ,महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र या संघटनेची मीटिंग संपन्न

मुंबई ( सतिश पाटील) नुकतीच दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र या  संघटनेची मीटिंग अत्यंत शिस्तबद्ध आणि महत्वपूर्ण रित्या पार पडली.
 
      या मीटिंग मध्ये  संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष आदरणीय. श्री राजेश भोसले सर, सन्माननीय श्री.धनंजय पवार सर, सन्माननीय. श्री.रामजीत गुप्ता सर, सन्माननीय.श्री.नरेश मोरे सर त्याच बरोबर उपस्थित स्थानिक पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन करून आपल्या संस्थेची उद्दिष्टे व संस्थेत काम करण्याची योग्य पद्धत समजावून सांगितली. त्याच बरोबर काम करत असताना काय करावे आणि काय करू नये ह्याची सविस्तर माहिती दिली. त्यामुळे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला सदर मिटींग चा नक्कीच फायदा होईल.या मिटींगमुळे  मुंबई आणि ठाणे टीम अत्यंत जोमाने काम करून महाराष्ट्रात अग्रेसर राहील अशी आशा आहे.