नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : आजची वृक्ष लागवड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी श्वासांची शाश्वती या उदात्त भावनेतून समिकरण चारिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या विद्यमाने जेष्ठ नागरिक संघ नेरुळ चे उपाध्यक्ष व रुग्ण सेवा केंद्राचे चेअरमन रणजीत दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पुढाकाराने दिनांक २२.८.२०२६ रोजी नेरुळ येथील सरदार वल्लभभाई पटेल उद्यानाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सदाफुली, निर्गुडी, बदाम अदि विविध प्रकारची सुमारे ६० झाडे लावण्यात आली. प्रसंगी समिकरण चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मोहित मोरे, उपाध्यक्षा शिवानी मोरे, सचिव कल्पेश मोहिते, सल्लागार शिवराज सोनवणे, निलेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांशी संवाद साधताना रणजीत दीक्षित म्हणाले की, वाढते शहरीकरण आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता झाडे लावणे, ती जगवणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवे आणि निरोगी वातावरण निर्माण करणे हे गरजेचे झालेले आहे. या उद्देशानेच ही चारीटेबल ट्रस्ट सातत्याने काम करते आहे ही कौतुकाची बाब आहे, असं सांगून त्यांनी वृक्षांचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि झाडांची योग्य निगा कशी राखावी याबाबत मार्गदर्शन केले.
मोहित मोरे यांनी या वृक्षारोपण कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितले की, समिकरण चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था शिक्षण, आरोग्य, अन्नदान, महिला सक्षमीकरण, आपत्ती निवारण, गरजू व वंचित घटकांना मदत आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रात समाजाप्रमुख असे काम करणारी सेवाभावी संस्था आहे.
या उपक्रमास नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ. मीराताई पाटील, शनैश्वर मंदिर ट्रस्टचे सदस्य आदींचे अमोल असे सहकार्य लाभले.
------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा