चिपळूण : ( दिपक कारकर )
सह्याद्री समाचार वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त यंदा समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘सह्याद्री राज्यस्तरीय पुरस्कार–२०२६’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. यापूर्वी सहा वेळा राज्यस्तरीय जागर साहित्य संमेलनाचे आयोजन करून महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांना व्यासपीठ देण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता विभागीय वन अधिकारी कार्यालय, चिपळूण येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी सह्याद्री जीवन गौरव, समाजरत्न, लोककलारत्न, महेशकुमार स्मृती, युवती प्रेरणा, आदर्श पत्रकार, अध्यात्म तपस्वी, नारीशक्ती, बालगंधर्व, लोककला वैभव आणि सामाजिक प्रेरणा अशा विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे.
पुरस्कारार्थींमध्ये अनंतराव पालांडे, प्रा. डॉ. गुलाबराव राजे, माधवजी कांबळे, डॉ. अब्बास जबले, शाहीर संदीप सावंत, शाहीर राजेश निकम, सागर डावल, अभिनेता सचिन काळे, कु. मेहक मुराद अडरेकर, राजेंद्रकुमार शिंदे, महेंद्र कासेकर, प्रवीण घाटविलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. तसेच नारीशक्ती पुरस्काराने सौ. संगीता लोटे, सौ. अमिना मुहम्मद हुसैन मुसा, सौ. रेहाना बिजले व सौ. रंजिता ओतारी यांचा गौरव होणार आहे. कुणाल पाटील (रत्नागिरी), शिवभक्त नमन मंडळ (मुंबई), सुसंगत नवतरुण संगीत जलसा मंडळ (तुरंबव) आणि दिव्यांग सेवा संस्था,चिपळूण यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन पत्रकार दीपक कारकर करणार असून सह्याद्री समाचारचे संपादक शाहीर शाहिद खेरटकर यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा