नवी मुंबई : नेरुळ येथील युथ कौन्सिल नेरुळ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रमातील निवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, दररोजच्या वापरातील गरजेच्या वस्तू तसेच आश्रमासाठी अन्नधान्य आदी वस्तूंचे वितरण रविवार दिनांक २८ जून २०२६ रोजी करण्यात आले. नेरुळ येथील गीत गजानन भजनी मंडळ तसेच समाजसेवक आर. डी. गायकवाड, सिने कलावंत रवींद्र गुरव, प्रकाश वामनराव पवार, चंद्रकांत रामभाऊ राणे आदींचा सक्रिय सहभाग या उपक्रमास मिळाला. त्यामुळे कार्यक्रम अधिक भरीव आणि भारदस्त झाला. याप्रसंगी मंचावर गीत गजानन भजनी मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती अपर्णा दाबके, श्रीमती आशा बर्वे, डॉक्टर धनश्री शिंदे, आर. डी. गायकवाड, रवींद्र गुरव, रमेश सुर्वे आदी मांन्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध शालेय व इतर वस्तू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. आश्रमात ३९ विद्यार्थी वास्तव्यास आहेत.
आश्रमातील मुलांच्या छानशा स्वागत गीताने सुरु झालेल्या या कार्यक्रमात दंतचिकित्सक डॉक्टर धनश्री शिंदे यांनी प्रात्यक्षिकासह दातांविषयी सखोल माहिती देऊन विद्यार्थ्यांना दातांची योग्य निगा कशी राखावी, तोंडाचे आरोग्य कसे जपावे आणि निरोगी सवयी कशा अंगीकाराव्यात याविषयी मुलांना सविस्तर मार्गदर्शन केले. मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधून, मुलांच्या अडचणी विषयी सखोल माहिती घेऊन मुलांच्या समस्यांचे समाधान केले. श्रीमती अपर्णा दाबके यांनी मुलांबरोबर विविध विषयावर चर्चा करुन त्यांच्याकडून भक्ती गीत वदवून घेतले. श्रीमती आशा बर्वे यांनीही मुलांना जीवनाविषयी, त्यांच्या भविष्याविषयी प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. प्रसंगी रवींद्र गुरव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
वयाची ७५ वर्षे पूर्ण होत असताना आपला अमृत महोत्सवी वाढदिवस या वनवासी कल्याण आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करुन समाजसेवेचा आदर्श घालून देणारे आर. डी. गायकवाड तसेच आश्रमात मुलांसाठी आहोरात्र योगदान देणारे आश्रमाचे व्यवस्थापक दिलीप बरफ, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेतून वृत्तपत्र विद्या पदविका उत्तीर्ण झाल्याबद्दल भालचंद्र माने यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
गेली ३९ वर्षे आदिवासी कल्याण योजनांमध्ये सहभाग घेत कार्यरत असलेल्या युथकौन्सिल संस्थेच्या कार्याचा आढावा घेत, संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी सुसूत्रपणे केले. सर्वश्री जी. आर. पाटील, दत्ताराम आंब्रे, दिलीप चिंचोळे, मच्छिंद्रनाथ बोरगे, गोपाळ शिंदे, रवींद्र कांबळे, एस. बी. सिंग, चंद्रसेन कांबळे, अशोकराव महाजन तसेच गीत गजानन भजन मंडळाच्या सदस्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा