वासिंद/आसनगाव (हर्षल शेलवले):मध्यरेल्वेच्या रेल्वेस्थानकांपैकी  महत्त्वाचे रेल्वेस्थानक अशी ओळख असलेल्या आसनगाव रेल्वेस्थानकावरील प्रवासी वर्गात सद्या भीतीचे वातावरण पहावयास मिळत आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील लाखो कामगार वर्ग व विद्यार्थी वर्ग आसनगाव रेल्वे स्थानकावरून दैनंदिन मुंबई कडे प्रवास करत असतो.मात्र या रेल्वेस्थानकावर सद्या भटक्या कुत्र्यांच्या वावराने प्रवासी वर्गात विशेषतः महिला व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पहावयास मिळत आहे.
त्याचप्रमाणे हे भटके कुत्रे  रेल्वेस्थानकावर असलेले कचऱ्याचे डब्बे पाडत आहेत त्यामुळे पसरलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरते. परिणामी प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. याबाबत प्रवासी प्रवीण बोधक सर यांच्याशी चर्चा केली असता कुत्र्यांच्या टोळ्या प्रवाशांवर प्राणघातक हल्ला करू शकतात असे चिन्ह आहे.त्याचप्रमाणे ट्रेन खाली जाऊन मरणाऱ्या कुत्र्यांची संख्याही दिवसेंदिवस येथे वाढत आहे.यामुळे दुर्गंधी वाढत असल्याचे मत त्यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केले.
       स्वच्छ व सुंदर अशी ओळख असलेल्या आसनगाव रेल्वेस्थानकावर सद्या मात्र ही गंभीर स्थिती असल्याने संबंधित प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व आरोग्यासाठी रेल्वेस्थानकावर येणाऱ्या या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी चर्चा प्रवासीवर्गातून व्यक्त होत आहे.
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा