मुंबई : ( महेश्वर तेटांबे) मंत्रालयातील धावपळ, फाईलींचा ढीग आणि बैठकांच्या व्यस्ततेतही सामान्य माणसाच्या दुःखाशी आणि आपल्या मुळ गावातील मातीशी नातं घट्ट ठेवणारा एक अत्यंत संवेदनशील चेहरा म्हणजे श्री. निलेश जाधव. गेल्या जवळपास १७ वर्षांपासून मंत्रालयीन सेवेत कार्यरत असलेले श्री. निलेश जाधव सध्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा. गिरीश महाजन साहेब यांचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून अत्यंत जबाबदारीने काम पाहत आहेत. रोजच्या कामाच्या व्यापात मंत्रालयात दूरवरून येणाऱ्या शेकडो नागरिकांशी त्यांचा दैनंदिन संपर्क येतो. मात्र, आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे केवळ ‘काम’ म्हणून न पाहता, त्याची अडचण स्वतःची मानून तत्परतेने मदत करणे, योग्य मार्ग दाखवणे आणि सहकार्याची भावना ठेवणे ही त्यांची वेगळी कार्यशैली बनली आहे. बंजारा समाज असो वा इतर कोणताही घटक, मदतीसाठी आलेल्या प्रत्येक सामान्य माणसाला त्यांनी नेहमीच आत्मीयतेने आधार दिला आहे.
मुंबईसारख्या महानगरात मोठ्या पदावर कार्यरत असूनही त्यांनी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आपले मुळगाव 'चेलका तांडा' आणि तेथील शेतीशी असलेलं नातं कधीच तुटू दिलं नाही. सवड मिळताच गावी धाव घेऊन शेतात फेरफटका मारणे, पिकांची पहाणी करणे आणि शेतकऱ्यांच्या बांधावर बसून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे यातच त्यांना खरा आनंद मिळतो. ‘पद कितीही मोठे झाले तरी आपल्या मातीशी आणि माणसांशी असलेले नातं त्याहून मोठे असले पाहिजे’ हा वस्तुपाठ श्री. निलेश जाधव यांच्या जीवनप्रवासातून मिळतो. मंत्रालयात जबाबदारीने काम करणारा अधिकारी आणि गावात आल्यावर मातीत रमणारा आपला माणूस—हीच त्यांची खरी ओळख ठरत आहे.
"पदाचा रुबाब नडला नाही कधी साधेपणाच्या वृत्तीला, मंत्रालयात दिला आधार माणसाला, अन जपले निष्ठेने मातीला!"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा