आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १ जानेवारी, २०२२

निमित्त दुसऱ्या वर्धापनदिनाचे ....

 

 सर्व वाचकवर्ग ,लेखक मंडळी , दानशूर  जाहिरातदार , आमचे सहकारी पत्रकार बंधू या सर्वानी दाखवलेल्या विश्वासाने व केलेल्या सहकार्यामुळे सर्वसमावेशक , निःपक्ष व निर्भीड बाण्याचे पाक्षिक आदर्श वार्ताहर दोन वर्षे पूर्ण करून तिसऱ्या वर्षाकडे सरकले आहे. एका वृत्तपत्राने दोन वर्ष पूर्ण करण्याला मोठे कर्तृत्व म्हणता येत नाही. अनेक दैनिक , साप्ताहिके , पाक्षिक , मासिक , नियतकालिक आपले वर्धापन दिन  दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा करत  असतात. यामागे   समाजात सुरू असलेली  त्यांची विश्वासार्ह- पत्रकारिता , सांभाळलेला दर्जा ,वाचकांशी जोडलेलं अजोड नाते हि  मुख्य कारणे  म्हणता येतील  . मात्र त्याहीपलीकडे एक महत्वाची बाब असते ती म्हणजे त्यांच्याकड़े असेलेले आर्थिक पाठबळ हे होय. पत्रकारिता करताना  तुमच्याकडे धमक असेल , समाजहिताचा ध्यास असेल ,  नवीन विचार करण्याची  कुवत वा   बुद्धिमान वर्गाचा ताफा असेल मात्र  या सगळ्यांची पूर्तता करून प्रत्यक्षात  एखादे वृत्तपत्र छापण्यासाठी आर्थिक बाजूच कमकुवत असल्यास सगळंच व्यर्थ आहे.

     दोन वर्षाचा मागोवा घेतल्यास मधल्या काळात   वृत्तपत्र व्यवसाय किंवा पत्रकारितेवर सुद्धा अरिष्ट कोसळले. त्याला मुख्यतः कारणीभूत ठरला "कोरोना" नामक घातक विषाणू . त्याने जगासह संपूर्ण भारतात हाहाकार उडवून दिला होता. या विषाणूचा संसर्ग होऊन झपाट्याने रुग्णसंख्या वाढल्याने भारत सरकारने लागू केलेल्या लॉक डाऊन , संचारबंदी -जमावबंदी व इतर निर्बंध यामध्ये गरीब -श्रीमंत सारखेच भरडले.मात्र सर्वात जास्त झळ सर्वसामान्य मध्यमवर्गाला बसली. आप्तस्वकियांचे गमावणे , बेरोजगारीचा सामना , व्यवसायातील मंदी या कारणांमुळे  अनेकांना मोठा मोठा धक्का बसला , काहीजण सावरताना पुन्हा कोलमडले तर काहींजण निर्धाराने नवीन सुरवात करताना दिसताहेत .
      इतरांप्रमाणे  कोरोनाचा सामना करत असताना  पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेत जवळचे मित्र ,त्यांचे नातलग , आप्त स्वकीय गमावल्याचे दुःख सहन  करण्याचे प्रसंग  आमच्याही वाट्याला आले. मात्र वास्तव परिस्थिती स्वीकारून काळासोबत शेवटी सर्वांनाच चालायचे असते.कोरोनाचा भयपट प्रत्यक्ष बघून आपले  दैनंदिन व्यवहार सुरु ठेवणे आणि वेळच्यावेळी पाक्षिक अंक  प्रसिद्ध करताना पहिल्या वर्षाप्रमाणे यावेळी सुद्धा  आमची  कसोटी लागली. फक्त यावेळी  एक वर्षाचा  अनुभव व सहकाऱ्यांनी केलेली मदत सोबतीला होती.समाजहिताच्या बातम्यांना प्रसिद्धी  , दुर्लक्षित व्यक्तिमत्वांची दखल, प्रबोधनकारी लेख, महत्वाच्या व अन्यायकारी विषयांवर "संपादकीय" मधून शाब्दिक फटकारे  याला प्राधान्य देऊन आम्ही  पत्रकारिता सुरु ठेवली.  काही महिन्यांपूर्वी सुरु केलेले प्रा . सुरेश सुतार सरांचे "विचारवेध" सदर देखील अनेक वाचकांच्या पसंतीस उतरून तशा  प्रतिक्रिया आल्या आहेत.  यावर्षी विविध साहित्याचा समावेश असलेल्या   "दिवाळी विशेषांकाचे" सुद्धा कौतुक झाले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसचिव सौ चित्रा विजय बाविस्कर यांना आदर्श वार्ताहर  वर्तमानपत्राच्या वतीने “अष्टावधानी नारी २०२१” हा मानाचा सन्मान अष्टमी, १३ ऑक्टोबर रोजी (नवरात्रौत्सव दरम्यान ) सीवूड्‌स-नेरुळ येथील टिळक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ हीना सामानी यांच्या  शुभहस्ते देऊन गौरवण्यात आले. एकूणच या वर्षात  पत्रकारिता करताना  सामाजिक भान राखून नेहमीप्रमाणे पाक्षिकाचा दर्जा उंचावण्याचा व  तो अधिक वाढवत नेण्याचा  प्रामाणिक प्रयत्न केला . तेव्हा यापुढे देखील आमच्यावरील विश्वास असाच कायम ठेवून आमचे असंख्य वाचक , जाहिरातदार , कवी -लेखक , सहकारी पत्रकार यांनी पाठींबा देऊन पाक्षिकाचा पाया भक्कम करावा हि विनंती . सर्वाना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...