आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

मान्सूनचा सुखद सांगावा

मागील काही वर्षात दुष्काळाने पिचलेल्या महाराष्ट्राला भारतीय हवामान खात्याने सुखद धक्का दिला आहे. भारतीय हवामान खात्याने यावर्षी पडणाऱ्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज बळीराजासाठी सुखावणारा आहे कारण यावर्षी सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी देशाच्या उत्तर भारतात काही ठिकाणी, तसेच ईशान्य भारतात  कमी पाऊस पडेल पण देशाच्या इतर भागात मात्र सरासरी इतका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याआधी स्काय मेट या संस्थेनेही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता हा अंदाज बळीराजासाठी जितका सुखावणारा आहे तितकाच तो उद्योग जगतासाठी देखील सुखावणारा आहे कारण कोरोनामुळे गेले वर्षभर उद्योग जगताचे चाक अडकून पडले आहे. भारताची अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे शेती हाच भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आजही देशाची  ६० टक्के लोकसंख्या ही शेतीवरच अवलंबून आहे त्यामुळे तिच्या स्थैर्यासाठी आणि विकासासाठी शेतीचे विशेष महत्व आहे. मागील काही वर्षात देशात दुष्काळ पडला होता त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला होता. मागील वर्षी चांगला पाऊस झाला पण  कोरोनामुळे देशभर लॉक डाऊन लागल्याने देशातील उद्योगधंदे ठप्प झाले त्यामुळे जीडीपी घसरला अशा वेळी शेती क्षेत्राने देशाला वाचवले. यावर्षीही कोरोनाची दुसरी लाट आल्याने देशावर पुन्हा लॉक डाऊनचे संकट ओढवले आहे राज्यात तर कडक निर्बंध लागू झाले असून लवकरच पूर्ण लॉक डाऊन होण्याची शक्यता आहे अशा वेळी देशाची अर्थव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी पुन्हा एकदा शेती क्षेत्रावर आली आहे त्यामुळेच हवामान खात्याच्या पावसाच्या अंदाजाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यावर्षी सरासरी एव्हढा पाऊस पडणार असल्याने भरघोस पीक येऊन रान आबादानी होणार आहे. महाराष्ट्रात लागू झालेल्या संचारबंदीतुन आणि कठोर निर्बंधातून शेती क्षेत्राला वगळले आहे याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानावे लागेल. कारण शेतीच्या कामासाठी हा काळ खूप महत्वाचा आहे. शेतीचे सर्व कामे वेळेतच करावे लागतात. खते, बी बियाणे, कर्जपुरवठा, पीक विमा यासारख्या कामात कोरोनामुळे खंड पडणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी. हवामान खात्याने जाहीर केलेल्या अंदाजानुसार  जर पाऊस पडला तर कोरोनाच्या महामारीच्या दुसऱ्या लाटेतूनही भारतीय अर्थव्यवस्था तग धरेल.

-श्याम ठाणेदार,दौंड जिल्हा पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: