घरच्या हलाकीच्या परिस्थितिशी झुंज देत अथक परिश्रमातून पदव्युत्तर शिक्षणाबरोबर शिक्षणातील पदविही प्राप्त केली जेणेकरून आपले आपल्या कुटुंबाचे दिवस सुखा समाधानाचे येतील हे स्वप्न उराशी बाळगून. ज्याकडे प्रतिभा, साक्षात शारदेचा वरदहस्त आहे, ज्याच्या लेखणीतून कथा, कादंबर्या जन्माला येताहेत नव्हे ज्याच्या साहित्य कृतीला साहित्य अकादमी सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झालाय असा जत तालुक्यातील निगडी खुर्दचा उगवता युवा लेखक नवनाथ गोरे आज टिचभर पोटासाठी दुसर्यांच्या शेतात रोजंदारी करतोय ही बातमीच क्लेशदायक आहे नव्हे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
खर म्हणजे असे प्रतिभावंत हे समाजासाठी आदर्श ठरावेत, भावी पिठीसाठी अनुकरणीय व्हावेत, त्यांची यशवी जीवन गाथा समाजासाठी प्रेरणादाई व्हावी परंतु तेच तारे जगण्यासाठी धडपडताहेत हे चित्र काही भविष्यासाठी आशादाई नाही. युवा कलाकार, खेळाडू, लेखक, पदवीधर ही समाजाची संपत्ति असते, श्रीमंती असते. परंतु आजही अनेक प्रतिभावंत विशेषता ग्रामीण भागातुन आपल्या हलाकीच्या परिस्थितिशी, जगण्यासाठी झुंजत आहेत. ही रत्न समाजात मानाने जगली पाहिजेत, त्यांच्या ज्ञानाचा, कलेचा उपयोग समाजासाठी करून घेता आला पाहिजे भावी पिढीसाठी. त्यासाठी त्यांचं जीवनमान उंचावणे हे शासनाचे एक नैतिक कर्तव्य ठरते. आणि म्हणूनच गाव, जिल्हा, तालुका पातळीवरील स्थानिक प्रशासनाने अशा रत्नांचा शोध घेवून शासन दरबारी त्यांची शिफारस केली पाहिजे, शासनाच्या नजरेत आणून दिली पाहिजेत. शासनानेही अशांची प्राधान्याने दखल घेवून त्यांच्या पेशाप्रमाणे नोकरीत सामावून घेवून सुखी समाधानी जीवन देण्यास सहकार्य करावयास हवे म्हणजे ही माणस निराश होणार नाहीत, त्यांना पश्च्यातापाची पाळी येणार नाही तर त्यांचे योगदान आपल्या समाजाला भरभरून मिळेल मात्र अशा संपत्तीला संपन्न ठेवणे शासना बरोबरच समाजाचेही कर्तव्य ठरते.
-विश्वनाथ पंडित
जिजामाता मार्ग, ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा