मुंबई (रवींद्र मालुसरे ) : समाजातली एखादी गोष्ट चांगली असो वा वाईट हे दृष्टीस पडल्यानंतर वृत्तपत्रलेखक अधिक अस्वस्थ होतो. हातात लेखणी घेऊन ती घटना किंवा लोकांना भेडसावणारी समस्या तो लिहितो आणि एखाद्या दैनिकाकडे पाठवत नाही तोपर्यंत त्याला झोप येणार नाही. भले ती छापून येईल कि नाही याची पर्वा त्याला नसते परंतु समाजातल्या जागल्याची भूमिका घेत आपण व्यक्त होऊ शकलो याचे त्याला समाधान असते.मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ही संस्था महाराष्ट्रातील अशा हजारो जागल्याना एकत्र करून सातत्याने अनेक कार्यक्रम - उपक्रमांच्या माध्यमातून गेली ७५ वर्षेतून अधिक काळ चळवळीच्या रूपात कार्यरत आहे. समाजाच्यादृष्टीने हे काम फार महत्वाचे आहे असे उदगार पदमश्री उदय देशपांडे यांनी काढले.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे माजी अध्यक्ष मधू शिरोडकर यांच्या कालप्रवाह या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच दादर येथे नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत आणि माजी संपादक प्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
वृत्तपत्र लेखक आणि नवशक्तीचा जमका सदर याचे ऋणानुबंध प्रभाकर पाध्ये यांच्याकाळापासून गेली ७५ वर्षे आहेत. दररोज सर्वाधिक पत्रे नवशक्तीकडे येतात हे नाते जपण्यासाठीच त्यांना आमच्याकडून पूर्ण पानभर प्रसिद्धी दिली जाते. यापुढच्या काळात वृत्तपत्रलेखकांकडून अभ्यासपूर्ण परंतु परखडपणे लिहावे अशीही आमची इच्छा आहे असे आवाहन नवशक्तीचे संपादक प्रकाश कुलकर्णी याप्रसंगी काढले. मधू शिरोडकर यांचे पत्रलेखक आणि वृत्तपत्रलेखक संघासाठी किती महत्वाचे आहे याचे विवेचन नवशक्तीचे माजी संपादक प्रकाश कुलकर्णी केले. वाचकांची मते किती महत्वाची आहे हे स्पष्ट करताना जगभरातील वर्तमानपत्रांमध्ये संपादकीय पानावर अनेक सुप्रसिद्ध लोकांनी केले आहे, चर्चिल आणि ब्रिटिश साहित्यिकांचे दाखले त्यांनी यावेळी दिले. ज्येष्ठ साहित्त्यिक अशोक बेंडखळे यांनी संस्थेचा पत्रवृत्तान्त लिहिताना संस्थेची वाटचाल आणि इतिहास कसा प्रगल्भ आहे हे सांगितले.मधू शिरोडकर यांनी ५० वर्षांपूर्वीची संघाची वाटचाल आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी माजी उपमहापौर अरुण देव, संघांचे माजी अध्यक्ष विजय कदम, माजी प्रमुख कार्यवाह विश्वनाथ पंडित, नंदकुमार रोपळेकर आणि दत्ताराम घुगे यांचीही भाषणे झाली.
संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी प्रस्थाविक केले तर कार्यक्रम प्रमुख दिगंबर चव्हाण यांनी सूत्रसंचालन आणि माजी अध्यक्ष मनोहर साळवी यांनी आभार प्रदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य आणि मराठी माणसांचे मूलभूत प्रश्न सातत्याने सेवाभावीवृत्तीने व निर्भीडपणे आपल्या लेखणीतून सातत्याने पदरमोड करून जनजागृतीचे काम हे करीत आहेत अशा सर्वश्री विश्वनाथ पंडित, अरुण खटावकर, लीना वालावलकर श्रीनिवास डोंगरे, राजन देसाई, भाऊ सावंत, दीपक गुंडये, गुरुनाथ तिरपणकर, संजय साळगावकर, सूर्यकांत भोसले, अनंत दाभोळकर, नितीन कदम, दत्ता खंदारे,शिरीष बने, कमलाकर जाधव, पंकज पाटील, रामचंद्र जयस्वाल या पत्रलेखकांचा संघाच्या वतीने "निर्भीड जागल्या " पुरस्कार प्रदान करून यावेळी सन्मानित करण्यात आले. तर पत्रस्पर्धेतील यशस्वी ठरलेल्या विजय ना कदम, मधुकर कुबल, नीता शेरे, रामचंद्र मेस्त्री,प्रा. जयवंत पाटील यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा