हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणामागे एक विशेष अर्थ आणि परंपरा दडलेली असते. त्यापैकीच एक अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस म्हणजे अक्षय तृतीया.
वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जाणारा हा सण यंदा रविवार, दि. १९ एप्रिल रोजी आहे. “अक्षय” या शब्दाचा अर्थ कधीही न संपणारे, सदैव टिकणारे असा होतो. या दिवशी केलेले पुण्य, दान, जप-तप हे अक्षय म्हणजेच अखंड राहते, अशी श्रद्धा आहे.
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते. नवीन व्यवसायाची सुरुवात, घर खरेदी, सोने-चांदी खरेदी, विवाह ठरविणे अशा अनेक शुभ कार्यांची सुरुवात या दिवशी केली जाते.
पौराणिक कथांनुसार, या दिवशी भगवान विष्णू यांचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्म झाला. त्यामुळे हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही साजरा केला जातो. तसेच महाभारत काळात पांडवांना मिळालेले “अक्षय पात्र” याच दिवशी प्राप्त झाले, अशीही कथा सांगितली जाते. या पात्रामुळे पांडवांना अन्न कधीही कमी पडत नव्हते.
अक्षय तृतीया हा दानधर्मासाठी विशेष महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी अन्नदान, जलदान, वस्त्रदान केल्यास त्याचे फळ अनेकपटीने वाढते, असे मानले जाते. गरजू आणि गरीबांना मदत करण्याची ही एक संधी असते. समाजात परस्पर सहकार्य आणि दयाभाव वाढवण्याचा संदेश हा सण देतो.
आजच्या आधुनिक काळातही अक्षय तृतीयेचे महत्त्व कमी झालेले नाही. लोक या दिवशी सोने खरेदी करून संपन्नतेचे प्रतीक मानतात. परंतु खऱ्या अर्थाने “अक्षय” संपत्ती म्हणजे चांगले संस्कार, परोपकार आणि सकारात्मक विचार हेच होय.
अक्षय तृतीया हा केवळ धार्मिक सण नसून, जीवनात चांगल्या गोष्टींची अखंड सुरुवात करण्याचा दिवस आहे. या दिवशी आपण सर्वांनी सद्भावना, दया आणि सहकार्याची भावना जपून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा संकल्प करावा, हीच 'अक्षय तृतीया' या सणाची खरी शिकवण आहे.
बाळ पंडित,
ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक /पत्रकार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा