नवी मुंबई: नेरुळ येथील गीत गजानन भजनी मंडळ आणि यूथकौन्सिल नेरुळ या सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुक्यातील चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रमातील विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे औचित्य साधून दिनांक १२.१०.२५ रोजी दिवाळी फराळाचे वाटप व इतर खाऊचे वाटप करुन येणारी दिवाळी गोड केली. वसतीगृहात एकूण ३९ विद्यार्थी वास्तव्यास आहेत. मंडळाच्या श्रीमती शैलजाताई केळकर यांनी लाडू आणि चिवडा स्वतः घरी बनवून आणला होता. याप्रसंगी मंडळाच्या, संगीत क्षेत्रातील नामांकित तज्ञ शिक्षक श्रीमती अपर्णाताई दाबके, श्रीमती रेखाताई वाळवेकर, श्रीमती स्वातीताई पालकर तसेच यूथकौन्सिलचे पदाधिकारी सुभाष हांडे देशमुख, दत्ताराम आंब्रे, दिलीप चिंचोळे , सूर्यकांत गावडे, रवींद्र कांबळे अंकुश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमांतर्गत पर्यावरणाचे भान राखून आश्रमाच्या परिसरात फणस व जांभूळ या फळझाडांचे रोपण करण्यात आले.
वसतीगृहातील विद्यार्थ्यांची व्यवस्था पाहणारा अमित भुरबुडा यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या दिनक्रमाची माहिती सविस्तरपणे सर्वांना दिली. मुलांनी स्वागत गीत, देशभक्तीपर गीते सादर करुन तसेच विविध प्राण्यांचा आवाज काढून दाखवून आपापल्या कला सादर केल्या. संस्थेतील संपूर्ण वातावरण, शिस्त, मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून उपस्थित पाहुणेमंडळींनी समाधान व्यक्त केले. भजनी मंडळाच्या श्रीमती अपर्णाताई दाबके यांनी मुलांना "हीच आमुची प्रार्थना" हे गीत शिकवले आणि त्यांच्याकडून सामूहिकरित्या वदवूनही घेतले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष हांडे देशमुख यांनी केले तर शेवटी श्रीमती रेखाताई वाळवेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा