मुंबई :(विशेष प्रतिनिधी )
गलिच्छ वस्ती तसेच झोपडपट्टी विभागातील घाण , कचरा स्वच्छ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून दत्तक वस्ती योजना मुंबई शहर उपनगरात सुरु करण्यात आली विभागातील लोकसंख्येनुसार सदर दत्तक वस्ती योजना तिथले मंडळ, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून चालवली जात असते . दत्तक वस्ती योजने अंतर्गत परिसरातील कचरा वेळच्या वेळी उचलला जात असल्याने ही योजना प्रभावशाली ठरून जनतेला सुद्धा सोयीची वाटू लागली होती
मात्र मध्यंतरी योजनेचे प्रत्यक्ष काम , नेमलेले तेच तेच ठेकेदार, लोकप्रतिनिधी हस्तक्षेप ह्या गोष्टींबद्दलचे गैरप्रकार उघडकीस आले होते. यासंदर्भात संबंधितांवर कारवाई देखील करण्यात आली होती. परंतु सध्याच्या स्थितीमध्येसुद्धा या दत्तक वस्ती योजनेत पारदर्शी कारभाराची वानवा दिसते . तसेच ही योजना राबवणाऱ्यांकडून परिसर स्वच्छ करण्याबाबत समन्वयाचा अभाव दिसून येत आहे
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे .विविध ठिकाणचा रुग्णालय परिसर , रस्ते, नगरे , गल्ल्या -मोहल्ले साफ ठेवण्यात सफाई कामगार महत्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र दुसरीकडे लॉक डाऊन असल्यामुळे तसेच कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्याने घरातील कचरा नेण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत दत्तक वस्ती योजनेतील कामगार मात्र कामचुकारपणा दाखवत आहेत.
कांजुरमार्ग (पूर्वेतील )मिराशी नगर, शास्त्री नगर, राम नगर, इंदिरा नगर, अशोक नगर व इतर चाळवजा नगरांमध्ये हा कचरा रोज उचलून घेऊन जाण्यासाठी कामगार प्रतिसाद देत नसल्याचे एका राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर वार्ताहर शी बोलताना सांगितले. योजना राबवणारे संबंधित व्यक्ती आणि कर्मचारी वर्ग यांच्यात समन्वय -सहकार्य नसल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
त्याचबरोबर त्यांनी आणखीन एका गोष्टीचा गौप्यस्फोट केला . प्रत्यक्षात कमी मात्र कागदोपत्री जास्त कामगार दाखवून महापालिकेला लुबाडण्याचे काम सुरु असल्याचे म्हणाले . शेवटी त्यांनी ही योजना राबवणाऱ्यांकडून स्थानिक लोकप्रतिनिधी पैसे घेत असल्याची धक्कादायक बाब उघड केली.
एकंदरीत स्वच्छतेसाठी राबवली जाणारी दत्तक वस्ती योजना आतून बाहेरून अधिक स्वच्छ कशी दिसेल याकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा