अलिबाग :- जिल्ह्यात काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण निश्चित झाले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू क्षेत्रातील पिकांवर व त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. पावसात पडलेला खंड व पाण्याच्या टंचाईमुळे पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी मागेल त्याला शेततळे योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.
शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने पर्जन्यावर आधारित शेतीसाठी जलसंवर्धन करून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
रायगड जिल्ह्यात सन 2017-18 ते 2020-21 या कालावधीत एकूण 648 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून सन 2017-18 मध्ये रु.102.25 लाख, सन 2018-19 मध्ये रु.89.37 लाख, सन-2019-20 मध्ये 59.69 लाख, सन 2020-21 मध्ये 15.50 लाख व सन 2021-22 मध्ये 33.41 लाख याप्रमाणे एकूण 300.22 लाख अनुदान वाटप करण्यात आले आहे. या शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी, मत्स्योत्पादन व पशुसंवर्धन इत्यादी शेती पूरक उद्योगासाठी फायदा झाला असून उत्पादनात काही प्रमाणात शाश्वतता आली आहे.
रायगड जिल्ह्यात शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. त्यामुळे शेततळे ही योजना शेतकऱ्यांस संजीवनी देणारी योजना ठरली आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व लेखी निधी मागणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा