आ.वा वृत्तसेवा,रायगड :- जुलै, 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील 7 जिल्हयांमध्ये पूर परिस्थिती उद्भवली आहे. या पूर परिस्थितीमुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करून त्यांच्यासाठी मदत छावण्या सुरू करणे व त्यांना अन्न, पाणी, वैद्यकीय सुविधा देणे आवश्यक आहे. तसेच पूरस्थिती आटोक्यात आल्यानंतर व पूराचे पाणी ओसरल्यानंतर रोगराई पसरू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणचा कचरा हटविणे, मृतदेहांची विल्हेवाट लावणे, पूरग्रस्त क्षेत्रातून पाण्याचा निचरा करणे, याकरिता विभागीय आयुक्तांमार्फत संबंधित जिल्हयांना आगाऊ स्वरुपात निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
याबाबींकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण रुपये सहा कोटी पन्नास लक्ष इतका निधी विभागीय आयुक्त, कोकण व पुणे यांच्यामार्फत संबंधित जिल्हयांना आगाऊ स्वरूपात वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील जमा झालेला कचरा व ढिगारे उचलण्यासाठी व मदत छावण्यांकरिता प्रत्येकी रुपये 1 कोटी असे एकूण 2 कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे, असे शासनाच्या दि.23 जुलै 2021 च्या शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा सांकेतांक क्रमांक 202107231833243319 हा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा