२९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. जागतिक स्तरावर वाघांचे संरक्षण व संवर्धन व्हावे म्हणून सेंट पिटर्सबर्ग येथे झालेल्या व्याघ्र परिषदेत २९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. वाघ हा जंगलाचा राजा आहे. जंगलातील त्याची निर्धास्त चाल आणि गगनभेदी डरकाळी या त्याच्या वैशिष्ट्यांमुळे वाघ हा सर्वांना आकर्षित करणारा प्राणी आहे. जगभरातल्या कोणत्याही अभयारण्यात जंगलातील सफारीवर गेलेल्या पर्यटकांचे पहिले आकर्षण वाघ दिसण्याचे असते. भारतीय संस्कृतीत तर वाघाला आदरयुक्त भीतीचे स्थान आहे. वाघाला जंगलाचा राजा असे संबोधले जाते. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून जनमानसात शौर्य, राजबिंडेपणा, सौंदर्याचे राकटतेचे प्रतीक आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत वाघाला पार्वतीचा अवतार असलेली देवी महिषासुर मर्दिनीचे व तिच्या अनेक रुपांचे वाहन बनवले आहे.वाघ आणि आदिवासी जमातींचा हजारो वर्षांच्या संबंध आहे. वाघांचा कोप होऊ नये म्हणून ते वाघाला देव मानून त्याची पूजा करतात. वाघांच्या अनेक जाती आहेत. भारतीय पट्टेरी वाघ जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. भारत हे वाघांचे माहेरघर मानले जाते. भारताप्रमाणेच आफ्रिका आणि आशिया खंडातील इतर देशांतही वाघांचे आस्तित्व आढळते. पूर्वी वाघांची संख्या खूप होती परंतु खेळ, मनोरंजन, वाढत्या लोकसंख्येमुळे वाघांच्या आधीवासावर होणारे मानवी अतिक्रमण तसेच वाघांच्या अवयवांची तस्करी करण्यासाठी वाघांची मोठ्या प्रमाणावर केली जाणारी शिकार यामुळे दिवसेंदिवस वाघांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. वाघांचे प्रमाण इतके कमी झाले की एकेदिवशी वाघांची डरकाळी लुप्त होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. ही भीती अनाठायी नाही कारण गेल्या काही वर्षात वाघांच्या शिकारीच्या अनेक घटना आपल्या देशात घडल्या आहेत. अवनी वाघिणीची शिकार कोण विसरेल? अवनी प्रमाणेच गोव्यातही दोन वाघांची शिकार करण्यात आली. गेल्या दोन वर्षात अनेक वाघांचे मृतदेह वनविभागाला आढळून आले आहेत. वाघ कमी होणे ही धोकादायक बाब आहे कारण जंगलात वाघ असणे हे समृद्ध जंगलाचे लक्षण समजले जाते. जंगलात असलेल्या अन्न साखळीत वाघ हा प्रमुख घटक समजला जातो. वाघांमुळे जंगलातील तृणभक्षी प्राणी व वनस्पतींमध्ये समतोल राखला जातो. वाघ नसतील तर तृणभक्षी प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल परिणामी निसर्गचक्रच बिघडून जाईल. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. वाघ असलेल्या जंगलात साधे लाकुडतोड व जंगलावर अवलंबून असणारे लोक भीतीपोटी जंगलात जात नाही त्यामुळे जंगल सुरक्षित राहते. वाघ नाहीसे झाल्यास जंगलेही नाहीसे होतील आणि जंगल नाहीसे झाल्यास निसर्गचक्रच बिघडून जाईल आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण मानवजातीला भोगावे लागतील तसे होऊ द्यायचे नसेल तर वाघांचे आस्तित्व टिकवले पाहिजे. आज या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या दिवशी प्रत्येकाने वाघांचे आस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घ्यायला हवी.
-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा