लॉक डाऊन वाढवित जाणे केवळ अर्थव्यवस्थेसाठी घातक नाही तर त्यामुळे आरोग्याचे इतर प्रश्न निर्माण होतात, असे जेष्ठ उद्योजक आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे. लाॅकडाऊनमुळे निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीचा विचार करता उद्योजक आनंद महिंद्रा यांचे विधान रास्तच आहे. लॉक डाऊन वाढविल्यामुळे कोरोना विषाणूला काही प्रमाणात आळा बसेल. परंतु, पूर्णपणे निर्मूलन होईल ह्याची काही शाश्वती देता येत नाही. त्यासाठी खात्रीलायक रामबाण उपाय अद्याप मिळालेला नाही. प्रदिर्घ लॉक डाऊनुळे मानसिक आरोग्याचे इतर मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर करोना व्यतिरिक्त इतर रोगाच्या उपचाराकडे इतका काळ दूर्लक्ष कल्यास ते महागात पडू शकते अशा प्रकारचा एक अहवाल जारी झाल्याचे वृत्त आहे. आगामी काळातही करोनाचे रुग्ण वाढत राहणार आहेत. त्यासाठी उपचाराच्या सुविधा विस्तारीत करण्याची गरज आहे. सरकारने अनेकदा लॉक डाऊनचा कालवधी वाढविला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. परीस्थिती खूप भयानक होत चालली आहे. कामधंदा बंद आहे. जे रोजंदारीवर काम करतात त्यांची कामे बंद असल्याने पैसे नाहीत अशा लोकांची अन्न पाण्यावाचून उपासमार होत आहे. भाड्याने राहतात ते भाडे सुद्धा भरू शकत नाहीत. आगामी महिन्याचे विजबिल, पाणी पट्टी तसेच निवासी जागेचा कर व केबल वगैरे इतर देणी सुद्धा भरू शकणार नाहीत. विचार करू शकत नाही अशी भयंकर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यांना घरातील कुणाचा आधार किंवा मदत आहे तेच कसंतरी पोट भरत आहेत.
बाकी ज्यांना कोणाचाच आधार किंवा मदत नाही त्यांच्यापुढे प्रत्येक दिवस कसा जगायचा असा प्रश्न समोर आहे. तरी केंद्र व राज्य सरकारने कोरोनाला आळा घालण्यासाठी अन्य पर्याय निवडावा. कारण सर्वसामान्य जनतेसाठी लाॅकडाऊन कोरोना पेक्षाही महाभयंकर ठरण्याची वेळ आता समीप आली आहे.
- सुधीर कनगुटकर
१/९, संतोष भगत चाळ,
बी. आर. नगर,
दिवा (पूर्व), ४०० ६१२.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा