जगात, भारतात, महाराष्ट्रात वाढत चाललेला कोरोना कोविड - १९ ची संख्या पाहता अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. या कोरोना कोविड - १९ च्या युद्धात उतरलेले आपले सैनिक यांचे आभार स्वतः हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्तिगत पत्राद्वारे लिहून मानले आहे.
परिचारिका, फार्मासिस्ट, डॉक्टर, सामान्य स्वंयसेवक, सामाजिक कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, पॅरामेडिक, इतर वैद्यकीय व्यावसायिक, माहिती तंत्रज्ञानक्षेत्र, शिक्षक, संरक्षण सेवा, सुरक्षा रक्षक, सैन्य वैद्यकीय संस्थेतील लोक अशा विविध क्षेत्रातून मुंबईसह महाराष्ट्रात २१ हजार ७५२ लोकांनी "कोविड योद्धे" होण्यासाठी अर्ज केलेले आहेत. यात वैद्यकीय क्षेत्रातील योद्ध्यांची संख्या १२ हजार १०३ आहे तर इतर क्षेत्रातील ९ हजार ६४९. तसेच ३ हजार ७१६ कोविड योद्ध्यांनी रेड झोनमध्ये काम करण्याची तयारी सुद्धा दर्शविली आहे.
महाराष्ट्रात कोविड योद्धा साठी प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये ३ हजार ७६६ अर्ज मुंबईसाठी आहेत. या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी 'प्रिय कोविड योद्धा' म्हणून केलेला आहे. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अर्जांची संख्या १ हजार ७८५ आहे. तर इतर क्षेत्रासाठी १ हजार ९८१ अर्ज आले आहेत. मुंबईमध्ये उपचारासाठी ज्या जम्बो सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. त्यात काम करण्यासाठी तयारी दर्शविलेल्या सर्व 'कोविड योद्धांना' बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नियुक्तीपत्र देण्याची कार्यवाही सुद्धा सुरु आहे.
आपणास व्यक्तिगत पत्र लिहताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची व मराठी मातीची महान परंपरा. संकटकाळात तो मागे हटत नाही. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याप्रमाणे कणखर होतो. आज आपण कोरोनाच्या भीषण संकटाशी युद्ध करत आहोत. हे युद्ध साधे नाही. या युद्ध संकटात एक 'सैनिक' बनून आपण 'कोविड योद्धा' म्हणून मैदानात उतरला आहात. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झाला आहात. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले मत या पत्रात व्यक्त केले आहेत.
त्यावर त्यांनी हे ही स्पष्ट केले की, हे युद्ध सुद्धा सीमेवरील सैनिकांप्रमाणे लढावे लागेल. महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक जणू आज एक सैनिक बनुनच संकटाचा मुकाबला करताना दिसून येत आहे. आपणासारखे 'कोविड योद्धा' आता युद्धात उतरल्याने मला मुख्यमंत्री म्हणून मोठे बळ मिळाले आहे. ही एक प्रकारे देश आणि देवपूजाच आहे. हीच आपली संस्कृती आहे. शस्त्रांपेक्षा ही मोहीम आपल्याला सेवेने जिंकायची आहे. थोडक्यात सेवा हेच आपले शस्त्र राहील. हा महाराष्ट्र, महाराष्ट्रीय जनता आपल्या रक्ताची, नात्याचीच आहे. महाराष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद देत आपण पराक्रमाच्या परंपरेस जपत आहात. आपले आभार तरी कसे मानावेत? ही सेवा महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या चरणी रुजू झाल्याशिवाय राहणार नाही.
अशा स्वरूपात 'कोविड योद्धांना' भावनिक पत्र लिहून त्यांचे आभार मानून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले विचार ही मांडले आहेत. हे पत्र मेलद्वारे पाठविण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा