सध्या केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांशी समन्वय साधत "कोरोनाला" रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. डॉक्टर ,नर्सेस ,पोलीस यंत्रणा ,सफाई कामगार ,बस कर्मचारी तसेच अन्य कर्मचारीवर्ग कोरोनाला न घाबरता,घरा- दाराचा विचार न करता आपले कर्तव्य पार पाडत आहेत.वास्तविक आपल्याकडे मानवसेवा हीच ईश्वर सेवा असे म्हटले जाते.मात्र कोरोनाने केलेल्या आक्रमण काळात सेवा बजावणाऱ्या वरील सर्व मंडळीना ईश्वरस्वरूपचं मानावे लागेल.तरी देखील त्यांची सेवा लक्षात न घेता त्यांच्यावर हल्ले होणे हि गोष्ट शरमेची बाब असून ती नक्कीच माणुसकीला धरून नाही.
आज या कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य अपेक्षित आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या सायबर शाखेने सोशल मीडियाच्या वापरासाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे. अशावेळी समाजातील उपद्रवशील -माथेफिरू मंडळींनी सोशल मीडियावर व्यक्त होताना तारतम्य बाळगायची गरज आहे .दुसरीकडे या भीषण परिस्थितीत संधी साधून घेताना काही विक्रेते खाण्या-पिण्याच्या व अन्य वस्तू दामदुपटीने विकताना दिसतात .त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी.या २१ दिवसाच्या लॉक डाऊन मध्ये अनेकांनी संचार बंदीचे उल्लंघन केले असतानाच १४ एप्रिल रोजी मुंबईत धक्कादायक घटना घडली .बांद्रा येथे हजारो मजूर लोक गावी जाण्यासाठी जमले होते .मुख्य म्हणजे सगळीकडे जमावबंदी ,पोलीस बंदोबस्त असताना हि गर्दी जमली होती. हि गर्दी प्रशासनावरचा ताण वाढवणारी -राज्य सरकारला अडचणीत आणणारी ठरली .मात्र त्यामागे कुणाचा हात होता किंवा कुणी राजकारण केले काय हे चौकशीतून पुढे यायला हवे.आता परराज्यातील या बेरोजगार -चिंताग्रस्त मजुरांची योग्य काळजी घेऊन सरकारला त्यांना एक विश्वास द्यावा लागेल.राहिला प्रश्न वाढीव लॉक डाऊनचा.सध्या राज्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारी नुसार रेड ,ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी केली आहे.त्यामुळे दिलासादायक बाब म्हणजे २० एप्रिल पासून राज्यातील निर्बंध शिथिल होणार आहेत. औषधे,वैद्यकीय उपकरणे, रुग्णवाहिका निर्मितीस मुभा मिळणार आहे. लहान सहान उद्योग धंदे ,महामार्गावरील छोटी हॉटेल ,धाबे ,गॅरेज ,टपाल -कुरिअर तसेच मालवाहू ट्रक ,आयटी सेवा ,डिजिटल व्यवहार सुरु होणार आहे .शेतीशी संबंधित साहित्य पुरवठा ,मत्स्य व्यवसाय ,ग्रामीण भागातील उद्योग ,रस्ते काम ,बांधकामे ,इलेक्ट्रिशियन ,रिपेअर कामे सुद्धा सुरु केली जातील.टप्प्याटप्प्याने अशा सर्व गोष्टी सुरु झाल्यावर अनेकांची रोजगाराची चिंता मिटून थांबलेला आर्थिक गाडा रुळावर होण्यास मदत होणार आहे.
तेव्हा सरकारी नियमांचे पालन करून ,स्वयं शिस्तीने सर्व व्यवहार करून कोरोनारूपी संकटावर लवकरात लवकर मात करण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा