आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३० जून, २०२५

छावा संस्थेकडून वृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम

पेण ( पी.डी.पाटील) सोमवार दि. ३० जून २०२५ रोजी  छावा क्रांतिवीर सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य संघटना यांच्याकडून खारेपाट भागातील 
जनवली,ठाकूर बेडी येथील रस्त्याच्या कडेला आंबा, जांभूळ, फणस, गोड चिंच, उंबर अशा फळं झाडांची लागवड करण्यात आली. या फळांचा आस्वाद वाटसरूंना मिळावा, त्यांना सावली मिळावी व निसर्गाचे संतुलन रहावे हे उद्दिष्ट ठेवून हा वृक्षारोपण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी  संस्था अध्यक्ष जितेंद्र ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभागी होऊन हा  उपक्रम यशस्वी केला. त्यांच्या या कार्याचे गावकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

जनचक्र वार्ता (न्यूज) चा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

पेण दि. २९ जुन :-जनचक्र वर्धापन दिन सोहळा महात्मा गांधी वाचनालय सभागृह पेण येथे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम मुख्य संपादक यांनी गणरायाच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन गणेश पूजन केले, नंतर मा. नगराध्यक्ष प्रितम ताई पाटील,ॲड. मंगेश नेने, संजय ठाकुर,यांनी दिपप्रज्वलन केले. संपादक दिनेश म्हात्रे यांनी मा. नगराध्यक्षा प्रितम ताई पाटील यांचे पुष्पगुच्छ,शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला. त्यानंतर संपादक यांनी प्रास्ताविक केले त्यांनी पत्रकारी क्षेत्रात वेळे प्रमाणे बदल घडवण्याचा आम्ही प्रयत्न करू, आजच्या जनरेशन ला जलद व कमी वेळेत बातमी कशी पोहचेल याचा आम्ही प्रयत्न करु असे सांगुन मान्यवर व श्रोतेगण यांचे आभार व्यक्त केले.त्यांनतर सन्मानमुर्तीचा सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी  प्रितम ताई यांनी शब्दावलोकन करताना प्रामाणिक व निःस्वार्थ हेतु असेल तर परमेश्वर यश नक्कीच देतो, तसेच नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत नक्की पोहचल्या पाहिजे.जनचक्र वृतपत्र साप्ताहिक, व जनचक्र न्युज चॅनेल चे वृत्तावलोकन प्रामाणिक असल्याचा दाखला देऊन शुभेच्छा व कौतुक केले. ॲड. मंगेश नेने यांनी ही कौतुक करून अगदी जलद बातमी देणारे वृत्तावलोकन  आहे असे सांगितले. त्यानंतर संजयजी ठाकुर (महाराष्ट्र विद्युत मंडळ ), यांनी शब्दावलोकन करून कौतुक केले. 
    त्यानंतर क्रमशा आई डे केअर च्या संस्थापिका, तसेच रोटरी क्लब ऑफ पेण च्या अध्यक्षा संयोगिता टेमघरे यांनी जनचक्र ने माझ्या कर्तृत्वाची प्रामाणिक दखल घेतली असुन माझ्या आयुष्यातील हा पुरस्कार आयुष्भर लक्षात राहील असे, सांगितले. त्यानंतर कलाकार, अँकर आदिती पाटील, व शालेय विद्यार्थी कु.नियती प्रवीण म्हात्रे, यांचा जनचक्र सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला, वासुदेव पाटील यांनी ही जनचक्र साप्तहिक चे कौतुक केले. त्यानंतर मुख्य संपादक दिनेश म्हात्रे व उप संपादक सचिन राजे शिर्के यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानुन व सर्व पाहुण्यांना अल्प उपहार देऊन कार्यक्रमांची सांगता केली या कार्यक्रमात, पत्रकार सुनील पाटील, समीर घायतले, संतोष पाटील (हमारापूर )निशिगंधा चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका निशिगंधाताई गुंड, शिवसेनेच्या नेत्या दीपाश्रीताई पोटफोडे, कोळी महासंघ संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षा अनुजा ताई पाटील, कामगार संघटनेचे वासुदेव पाटील, विजय पाटील, समाज सेवक अनिल दरेकर, जनचक्र चे सहकारी भरत साळवी,महेंद्र मोहिते, गिरीश शहा, मुकुंद टेमघरे, अशोक जैन,बल्लाळ ढवळे,महेश पाटील, डॉ मनोज जोशी, ॲड. डॉक्टर नीता कदम,अंकिता पोटे, वर्षा पाटील, नेहा म्हात्रे, ममता म्हात्रे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.निवृत्त मुख्याध्यापक शेखर पुंडे सर यांनी सुरेख निवेदन करून कार्यक्रमाला योग्य दिशा दिली.

कौतेय प्रतिष्ठान तर्फे दुभाषी मैदानात केली स्वछता

मुंबई (शांताराम गुडेकर)  विलेपार्ले पूर्व येथील वामन मंगेश दुभाषी मैदान येथे गेले अनेक शनिवार रविवार काही समाजकंटकांकडून मद्यसेवन केले जात असल्याचा तक्रारी नागरिकांकडून येत होत्या.आज त्याठिकाणी सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच सापडला. तेथील एकमेव सुरक्षारक्षक व महिला सफाई कर्मचारी ह्यांच्याकडून तिथे होत असलेल्या सर्व गैरप्रकाराची माहिती घेतली.त्यानंतर विलेपार्ले पोलीस ठाण्यात जाऊन सदर गोष्टीची लेखी तक्रार करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.पार्लेकर नागरिकांच्या सुरक्षेला ह्यामुळे धोका उत्पन्न होऊ शकतो हे सुद्धा निदर्शनास आणून देण्यात आले. ह्यावेळी अध्यक्ष कौतेय देशपांडे. सौ डॉली देढीया -देशपांडे, दुर्गेश कुलकर्णी, चंद्रेश परमार, भरत मौर्य, चंद्रकांत सोळंकी, विजय शर्मा सदस्य उपस्थित होते. पार्लेकर दक्षतेसाठी तेथे उपस्थित अनेक पारलेकरांनी कौतेय प्रतिष्ठानचे कौतुक करुन आभार मानले.

"इतिहास लिहीणाऱ्यांनी आपल्याच लोकांची सोय पाहिल्याने तो सत्यापासून दूर" -प्रा. रवींद्र पाटील

नवी मुंबई : शिवप्रभूंचा इतिहास असो की अन्य कोणता; जो समाज आधी शिक्षित होता त्या समाजाने अन्य अल्पशिक्षित समाजाच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन आपल्या लोकांच्या सोयीचा इतिहास लिहिला व सगळ्यांच्या माथी मारला. कृष्णाजी भास्कर व अन्य तत्कालिन मतलबी लोकांची आडनावे कुणी व का लपवली? असा सवाल शिवव्याख्याते प्रा. रवींद्र पाटील यांनी केला. ऐरोली येथील श्री संत सावता माळी समाज मंडळ आणि सिनियर सिटीझन हेल्थकेअर फाऊन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता जिजाई यांच्या स्मरणार्थ "शिवबा राजं छत्रपती झालं रं" या व्याख्यानांतर्गत ते २९ जून रोजी बोलत होते.
अनेक गोष्टी आपल्याला मूळ स्वरुपात सांगितल्याच गेल्या नाहीत. पण नंतर समाज शिकला, वाचू लागला, पुरावे धुंडाळू लागला व त्यांना वास्तव कळले असे सांगून प्रा. पाटील म्हणाले की विद्येचे माहेरघर मानल्या गेलेल्या पुण्याची विद्या आता नवी मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, जळगाव, विदर्भ, मराठवाडा येथेही गेली असल्याने सर्वांचे डोळे लख्ख उघडले आहेत. प्रा.पाटील यांनी नवतरुणांना आवाहन केले की कपाळावर चंद्रकोर कोरणाऱ्या मुलींनी आधी स्व-संरक्षणाची कला शिकून घ्यावी व अंगाशी येणाऱ्या बदमाशांना जागीच लोळवावे व ज्यांना अंगावर शिवप्रभूंचे टॅटू कोरायचे आहेत, बुलेट आणि कारवर शिवरायांची प्रतिमा कोरायची आहेत, त्यांनी ती जरुर कोरावी; पण मग त्या शरीराला कोणत्याही विडी, सिगरेट; दारुचा स्पर्श होऊ देता कामा नये. माता-भगिनींना त्यांच्यापासून अप्रत्यक्षरित्याही उपद्रव होणार नाही याची काळजी घेतली जावी. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री, झरेकर यांनी स्फुर्तीगीते; तर अर्जुन पाटील यांनी पोवाडे सादर करुन वातावरण निर्मिती केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगकर्मी रवींद्र औटी यांनी केले. श्री संत सावता माळी समाजाचे अध्यक्ष सुर्यकांत थोरात यांनी मंडळाच्या उपक्रमांची माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली. 
      सिनियर सिटीझन हेल्थकेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष बबनराव पाटणकर यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून सुमारे दीड हजार नागरिकांना हेल्थ कार्डचे वितरण करण्यात आले असून स्वच्छता, पर्यावरण अशा विविध बाबींवर संस्थेचे सदस्य सक्रीय असल्याचे सांगितले. याप्रसंगी अलीकडेच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेले पत्रकार राजेंद्र घरत तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र काेंडे, ज्येष्ठ रांगोळी कलावंत श्रीहरी पवळे यांचा सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सभागृहात भरगच्च हजेरी लावून या व्याख्यानातून शिवविचारांची धग अनुभवल्याचे पाहायला मिळाले

मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती -मुंबई कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी संजय बेंद्रे तर कार्याध्यक्षपदी अजित गोरुले (मारळ)आणि सचिव पदी योगेश घोलम यांची निवड

मुंबई (शांताराम गुडेकर) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेले मार्लेश्वर देवाच्या नावाने होतकरू, हौशी क्रिकेट युवकांनी मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती स्थापन केली असून या समिती तर्फे मुंबई विभागसाठी २०२५-२०२७ या कालावधीसाठी आपली कार्यकारणी नुकतीच जाहिर केली.मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती - मुंबई कार्यकारिणी कार्यकाल २०२५ ते २०२७ असून यामध्ये नवनियुक्त पदाधिकारी निवडीत अध्यक्ष म्हणून संजय बेंद्रे (निवधे), तर कार्याध्यक्ष म्हणून अजित गोरुले (मारळ), तसेच उपाध्यक्षपदी विशाल शिवगण (हातिव), महेश शिंदे (ओझरे),सचिव म्हणून योगेश घोलम (खडी कोळवण),सहसचिव पदी प्रणव रेवाळे(आंगवली),प्रभात गुरव (बामणोली), आणि खजिनदार म्हणून राजेश गुरव (निवधे),
सह-खजिनदार विठोबा घवाळी (निनावे),हिशोब तपासनीस पदी सुशील गुरव (ओझरे), तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून
प्रदीप तोरसकर (कासार कोळवण),शशांक हातिम (ओझरे)यांची निवड करण्यात आली.
          कार्यकारणी निवड झाल्यावर काही चर्चेतील ठळक मुद्दे व निर्णय ठरवण्यात आले. यामध्ये प्रत्येक गावातील संघाने मुंबईत किमान एक स्पर्धा आयोजित करावी.एकाच गावातील विविध संघांतील खेळाडूंना त्या गावाच्या इतर कोणत्याही संघात खेळण्यास मुभा.यासह अनेक महत्त्वाच्या बाबींवर एकमताने निर्णय घेण्यात आले. यनिमित्ताने एंजॉय आंगवली क्रिकेट संघाचे प्रतिनिधी म्हणून गावाहून उपस्थित राहिलेले ग्रामीण कमिटी सचिव श्री.रणजीत पवार यांचे मुंबई कमिटीच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.सभेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल योगेश सालप यांचे आणि मुंबईतील क्रिकेटप्रेमी रितूभाई चंदेलिया यांचे अध्यक्ष संजय बेंद्रे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
        अध्यक्षीय मार्गदर्शन मध्ये संजय बेंद्रे यांनी समितीच्या भविष्यातील उद्दिष्टांवर प्रकाश टाकला.तर सचिवीयांनी समारोप करताना सर्व नवनियुक्त पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांचे अभिनंदन करून पुढील क्रिकेट कार्यास शुभेच्छा दिल्या.योगेश घोलम यांनी सभेची सांगता करत सर्व उपस्थितांचे आभार मानले.ही सभा संपूर्णपणे मैत्रीपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली.मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती -मुंबई कार्यकारिणी जाहीर होऊन अध्यक्षपदी संजय बेंद्रे तर कार्याध्यक्षपदी अजित गोरुले (मारळ)आणि सचिव पदी योगेश घोलम यांची निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील सर्व क्रिकेट सामने आणि विविध उपक्रम यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रविवार, २९ जून, २०२५

शाखा प्रमुखांचे ग्रामीण भागात मोठे योगदान - भास्कर जाधव


उरण दि २९(विठ्ठल ममताबादे ) शिवसेना पक्षात सर्वात मोठे पद हे शिवसैनिक आहे.ग्रामीण भागात सर्वच नागरिकांसोबत संवाद साधण्याचा महत्त्वाचा दुवा शाखाप्रमुख आहे.शिवसेनेचे विचार व कार्य तळागाळात पोहोचवायचे असेल तर शाखाप्रमुखांनी मतदारांशी, नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संवाद साधून शिवसेना घराघरात पोहोचवली पाहिजे.त्यासाठी शाखाप्रमुख पद व त्याचे कार्य महत्त्वाचे आहे. मात्र कालांतराने शाखाप्रमुख हा काम करीत नसल्याने कमकुवत झाला.अनेक ठिकाणी शाखाप्रमुख काम करत नसल्याने त्या त्या भागातील नागरिकांशी मतदारांशी त्यांच्या संवाद तुटला आहे. मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरलो तिथे मात्र शाखाप्रमुख पाहिजे त्या पद्धतीने काम करताना दिसत नाहीत त्यामुळे पक्षाचे खूप मोठे नुकसान होत आहे.शाखा प्रमुखाचे ग्रामीण भागात खूप मोठे योगदान आहे हे कोणी विसरून चालणार नाही आता मात्र शाखाप्रमुखांना चार्ज करायची वेळ आली आहे.असे परखड व आक्रमक मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी उरण येथे मांडले.
     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या वतीने उरण विधानसभा मतदार संघातील निष्ठावंत शिवसैनिकांची संघटनात्मक मोट बांधण्यासाठी व पुढील आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी उरण तालुक्यातील मल्टीपर्पज हॉल टाऊनशिप येथे करण्यात आले होते. यावेळी भास्कर जाधव बोलत होते.भास्कर जाधव यांनी यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर, कोकण युवा सेना प्रमुख- शिरसाठ,जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील,उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर,उरण विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत, रायगड जिल्हा युवा अधिकारी पराग मोहिते, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर,जिल्हा निहाय वक्ता मनीषा ठाकूर,रायगड जिल्हा महिला संघटिका सुवर्णा जोशी,खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे,संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, मेघा मिस्त्री, ज्योती म्हात्रे- संघटिका,शिव विधी व न्याय सेवा उरण तालुका वर्षा पाठारे, उरण तालुका संघटक बी एन डाकी, पनवेल तालुका प्रमुख महेंद्र गायकर,उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर,माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, संपर्क प्रमुख दिपक भोईर,द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख जगजीवन भोईर,शहर संघटक महेश वर्तक,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका संघटक ओमकार घरत, उरण शहर संघटक संदीप जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.भास्कर जाधव यांनी यावेळी मार्गदर्शन करताना महायुतीच्या विविध योजना, निर्णयावर कडाडुन टीका केली. भाजपा ने राज्यात सुरू असलेल्या परिवहन सेवेच्या महामंडळाचे सरकारीकरण करण्याचे वचन दिले होते ते वचन पूर्ण केले नाही शिवाय कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे पगार थकविले आहे.कृषी कर्जमाफीचा आश्वासन दिले होते ते अजूनही पूर्ण झाले नाही योग्य वेळ आल्यावर कृषी कर्ज माफ करू असे सांगतात पण ते योग्य वेळ कधी येईल ? महिलांना महिन्याला २१०० रुपये देणार असे सांगितले तिथेही लाडक्या बहिणीची फसवणूक केली. निवडणुकीच्या तोंडावर ही अशी योजना त्याने सुरू केली. सरकारचे महिलांच्या मतावर डोळा आहे त्यामुळे योजना सुरू केली.शासनाला लाडक्या बहिणीशी काहीही देणे-घेणे नाही भाजपा सरकारने सर्वच समाजाला नवीन महामंडळ दिली.अगोदरच अनेक महामंडळ बंद केली मात्र ही नवीन महामंडळ कशासाठी स्थापन केली ? शासन आर्थिक तोट्यात असताना केवळ विविध जाती धर्माच्या लोकांना खुश करण्यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी ही प्रत्येक समाजासाठी नवीन महामंडळ स्थापन करण्यात आली. मराठा ओबीसी समाजात भांडण लावून समाजात फूट पाडले.नको ते आश्वासन देऊन जनतेची समाजाचे दिशाभूल केली. मराठा ओबीसी समाज एकमेकाविरोधात उभे केले. त्यामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान झाले. नोकर भरती न झाल्याने बेरोजगारी वाढली.रोजगार नसल्याने,नोकरी नसल्याने बेरोजगार तरुणांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे . मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले होते ते आश्वासन पूर्ण केले नाही उलट राज्यात वीज दरवाढीचे प्रयत्न सुरू आहेत जाती धर्मात भांडणे लावले त्यामुळे अशा जनतेची फसवणूक करणारा पक्षापासून सावध रहा असा सल्ला मार्गदर्शन प्रसंगी नेते भास्कर जाधव यांनी दिला.तसेच मी शिंदे गटाप्रमाणे सुरतला गेलो किंवा गुवाहाटीला गेलो तर राजकारणातुन निवृत्ती होईन.माझ्या विरोधात वेगवेगळे कट कारस्थान रचले जात आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.खोट्या पुरावाच्या आधारे जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र मी शिवसैनिक असल्याने खंबीर आहे.आयुष्यात कोणतेही चुकीचे काम केले नसल्याने मी अशा गोष्टींना घाबरत नाही. सर्वांना विनंती करतो की मराठी माणसांने वेळीच सावध व्हा अन्यथा आपले अस्तित्व संपण्यास वेळ लागणार नाही असे आवाहनही भास्कर जाधव यांनी केले.यावेळी भास्कर जाधव यांनी नवी मुंबई विमानतळ, मराठी भाषा, हिंदी भाषा सक्ती आदी विविध विषयावर मार्गदर्शन केले
     या मेळाव्याला उपस्थित असलेले शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरूरकर यांनी आपल्या ओघवती शैलीमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्याशी संवाद साधला.मार्गदर्शन करताना ते म्हणाले की शिवसैनिक हा निष्ठावंत आहे. गितेच्या तत्वा प्रमाणे काम करा.मतदाराची प्रत्येक यादी ही एक गीता आहे . तीचा चांगला व सखोल अभ्यास करा.ती आत्मसात करा.शिवसैनिक हा शिवसेनेचा आत्मा आहे. शिवसेनेचे विचार व कार्य अजराअमर आहेत कोणीही आले तरी शिवसेना संपणार नाही. ज्याने ज्याने शिवसेना सोडली त्यांनी ते स्वतःच्या स्वार्थासाठी सोडली. छगन भुजबळ,नारायण राणे यांनी स्वार्थासाठी शिवसेना सोडली. अशी चूक तुम्ही करू नका. टाळ्या वाजविणे किंवा घोषणा देणे सोप्पे असते पण प्रत्यक्ष काम करणे कठीण असते अगोदरच्या काळात निष्ठेला किंमत होती आता मात्र निष्ठेलाही किंमत नाही, शिवसेना पक्षात पद हे काम करण्यासाठी आहे पद हे मिरविण्यासाठी नाही. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुका जवळ आले आहेत आता सर्वांनी कामाला लागा. महाविकास आघाडी वर अवलंबून राहू नका कोणत्याही क्षणी शिवसेनेचाच पदाधिकारी निवडून येणार या आत्म विश्वासाने काम करा. कोरोना काळातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामामुळेच मुस्लिम समाज शिवसेनेच्या पाठीशी आहे. मुस्लिम समाजामुळे शिवसेनेचे अनेक नेते खासदार आमदार निवडून आले आहेत. आयुष्य भर ऍडजस्टमेंट केल्यानेच शेतकरी कामगार पक्ष संपला आहे.प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेता न आल्याने शेतकरी कामगार पक्ष संपल्यातच जमा आहे.आपल्याकडून गद्दारी होता कामा नये आम्ही दिलेल्या फॉरमॅटमध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काम करावे यश तुम्हालाच मिळेल. पैशाने लीडर लोक विकले जातात पण सर्व सामान्य मतदार कधीच विकला जाणार नाही.यामुळे सर्वांनी कामाला लागा असा आदेश विश्वनाथ नेरूरकर यांनी मार्गदर्शन करताना दिले. यावेळी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनीही पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.मला राजकारणाचा कोणताही गंध नव्हता तरी राजकारणात आलो. जनतेने मला २०१४ साली आमदार बनवले. त्यापूर्वी वेगवेगळे पदे भूषविली.निवडणुकीत झालेला पराभव हा माझा नाही.पैशांमुळे माझा पराभव झाला. येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद,नगर परिषद निवडणुका जिंकल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.सर्वांनी आतापासून तयारीला लागा असे आवाहन मनोहरशेठ भोईर यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी विविध मान्यवरांची भाषणे झाली.भाषणे संपताच महाराष्ट्र शासनाने हिंदी विषय सक्ती केल्याने शासनाचा निषेध करत त्या निर्णयाची होळी करण्यात आली. शासनाचा हिंदी सक्तीचा जी आर (शासन निर्णय )जाळण्यात आला.या मार्गदर्शन मेळाव्याला उरण पनवेल खालापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सभागृह शिवसैनिकांनी खचाखच भरला होता. महिला भगिनींचीही उपस्थिती लक्षणीय होती. अतिशय सुंदर व जोशपूर्ण असा हा मार्गदर्शन मेळावा होता.या मेळाव्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता. या मेळाव्याला शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्याचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. या मेळाव्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघ अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )
श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्था व शिवराज युवा प्रतिष्ठान उरण यांच्या संयुक्त विद्यमानाने उरण तालुक्यातील आदिवासी कातकरी पिरवाडी येथे जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.तसेच महिला व लहान मुलांचे चेकअप देखील करण्यात आले व मोफत औषधे वाटण्यात आली. ३८ जणांनी वैद्यकीय तपासणी चा लाभ घेतला.शिवराज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश भाई ठाकूर,समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था कार्याध्यक्ष संगीता ढेरे( रायगड भूषण ) कविता म्हात्रे ,पूजा प्रसादे, मीना रावल, विशाखा म्हात्रे,अनघा ठाकूर, रश्मी तांबे, सीमा निकम, सुमन ताई तोगरे, तृप्ती भोईर, श्रेया ठाकूर, योगेश म्हात्रे, उमेश वैवडे , सचिन ढेरे,केशव निकम, दिनेश हळदणकर,अमर ठाकूर, आनंद ठक्कर ,घनश्याम भोईर, सुभाष पाटील, संग्रामकाका तोगरे, दीपक प्रसादे या सर्वांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे.श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्था व शिवराज युवा प्रतिष्ठान उरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या उपक्रमाला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला असून या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

छावा संस्थेकडून वृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम

पेण ( पी.डी.पाटील) सोमवार दि. ३० जून २०२५ रोजी  छावा क्रांतिवीर सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य संघटना यांच्याकडून ...