आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव

मुंबई (शांताराम गुडेकर) स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या “कोकणरत्न” या मानाच्या पदवीसाठी यंदा उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक प्रबोधनासाठी कार्यरत असलेल्या विविध मान्यवरांचा गौरव करण्याचा हा उपक्रम असून यंदाच्या सोहळ्याला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले आहे.
                हा भव्य सन्मान सोहळा शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत, मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदानाजवळ, मुंबई येथे स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय कोकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.यावेळी “कोकणरत्न” पदवीचे वितरण अध्यक्ष श्री संजय कोकरे साहेब यांच्या हस्ते करण्यात येईल.
               कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार व संपादक श्री सचिन कळझुनकर सर उपस्थित राहणार आहेत.सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबई अध्यक्ष श्री धनंजय कुवेसकर, खजिनदार श्री राजेंद्र सुर्वे, नेते श्री सुभाष राणे आणि मुख्य सल्लागार श्री दिलीप लाड यांचे विशेष योगदान लाभले आहे.कार्यक्रमास विशेष सहकार्य युवा नेते सचिन गावडे,बापु परब आणि अजित गोरुले यांनी केले आहे.
              स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचा हा उपक्रम कोकणातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि जनकल्याणाच्या कार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

प्रदीप बडदे लिखित "माणुसकीची अंत्ययात्रा" कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नवी मुंबईत उत्साहात संपन्न

मुंबई (भूषण तांबे): कवी प्रदीप बडदे यांचा "माणुसकीची अंत्ययात्रा" या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी ज्ञानविकास कोपरखैरणे, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चंद्रकांत जोरकर आणि अजित हरवडे यांच्या शुभहस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. प्रदीप बडदे हे उत्तम कवी आणि लेखक असून त्यांना अनेक राज्यस्तरीय पारितोषिके मिळाली आहेत. पत्रकारितेमध्ये देखील त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. एवढेच नव्हे तर संगीत क्षेत्रात त्यांनी त्यांचे योगदान देऊन उत्कृष्ट गायक असल्याचा ठसा उमटवीला आहे. साहित्यिक क्षेत्रासमवेत भिन्न क्षेत्रात कार्यरत असलेल्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने समाजात एकमेव ओळख निर्माण केली आहे.
     सदर कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष नागेश हुलवळे आणि प्रमुख अतिथी चंद्रकांत जोरकर आणि अजित हरवडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाणे झाली. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या मनोगतानंतर प्रदीप बडदे लिखित "माणुसकीची अंत्ययात्रा" कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी कवी प्रदीप बडदे यांचे मनोगत सुद्धा झाले. त्यांनी त्यांच्या मनोगतात या संग्रहाबद्दलचे उद्धीष्टे आणि आठवणी संक्षिप्त स्वरूपात मांडल्या. उपस्थित सर्व मंडळींनी टाळ्यांच्या कडकडाटसह शुभेच्छांचा वर्षाव केला. या कार्यक्रमास अनेक दिग्गजांनी आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविली.
       या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून कल्पनाताई देशमुख होते. तर, ऋतुजा गवस हे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. तसेच मराठी साहित्यातील नामवंत साहित्यिक हर्षद पाटील, कल्पना म्हापुस्कर, जयेश मोरे, मनोज उपाध्याय, प्रकाश फर्डे, डॉ.स्नेहा राणे, किशोरी पाटील, उमा रावते, गोविंद पारकर, रश्मी राऊत, सुधाकर कांबळी, आनंद रांजणे, अनिल सोनवणे, महेश जरांडे अशा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुकूल माळी यांनी केले आणि सदर कार्यक्रमाची रंगत वाढवून त्याची उंची एका विशिष्ट स्तरावर नेली. शेवटी ऍड.शंकर बडदे यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या मान्यवरांचे सहकार्य लाभले त्यांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला असे जाहिर केले.

सत्यधर्म जगणारे डॅा. बाबा आढाव..

 सत्यशोधकीय विचारांचे, महात्मा फुलेंचे खरे वैचारिक व कृतीशील वारसदार डॅा. बाबा आढाव यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. १९३० ते २०२५ ही त्यांची कारकीर्द. स्वातंत्र्यापूर्वी १७ वर्ष आधी त्यांचा
जन्म. भाई वैद्य हे त्यांच्यापेक्षा २ वर्षांनी मोठे. पुण्यात राष्ट्र सेवा दलात दोघांचेही काम सुरु झाले. स्वातंत्र्यचळवळीत प्रत्यक्ष सहभागी असलेले भाई वैद्य, डॅा. बाबा आढाव व पन्नालाल सुराणा आत्ता आत्तापर्यंत आपण पाहिले, वाचले व ऐकले आहेत. पुढे हमीद दलवाई, कॅा. गोविंद पानसरे, डॅा. कलबुर्गी, गौरी लंकेश, डॅा. नरेंद्र दाभोळकर, विद्या बाळ, देवदत्त दाभोळकर, हरी नरके, प्रा. मा.म.देशमुख, डॅा. आ.ह. साळुंखे, डॅा. कुमार सप्तर्षी अशी कितीतरी मोठी नावे आपण पुरोगामी माणसे म्हणून घेतो. 
    महाराष्ट्र ही संतांची, सुधारकरांची, क्रांतीकारकांची भूमी, तिचा वारसा हा पुरोगामी. पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना मी पुरोगामी आहे, सत्यशोधकीय विचारांचा वारसा मी जपतो असे म्हणताना आत्मपरीक्षण करायची वेळ आज आली आहे. पुरोगामीचा कृतीशील अर्थ जगणारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललीय. डॅा. बाबा आढाव हा शेवटचा मणी त्यातला ठरू नये असा विचार आपण सर्वांनी करत सत्यशोधकीय विचार, पुरोगामी विचार फक्त विचार न राहाता तो आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृतीत कसा येईल याचा विचार आपण सर्वांनी करायची आज जबाबदारी आहे. 
    स्वार्थ, भीती, अनाठायी अंधभक्ती, कौटुंबिक जीवनात संस्कार व परंपरा या नावाखाली अनेक अनावश्यक गोष्टी करत रहाणे याचा थोडा सत्यशोधकीय पध्दतीने विचार करून आपण आपल्या जीवनात बदल करणे जास्त गरजेचे आहे. भयमुक्तीसाठी भटमुक्त होणे किती गरजेचे आहे हे आपल्याला आजचा समाज व समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते यांच्याकडे पाहून लक्षात येते. बाबा नेहमी म्हणत,’जोवर यांच्या हातात गंडेदोरे आहेत तोवर हे संविधान समजून घेणार नाहीत व संविधानाप्रमाणे वागणार पण नाहीत.’ पुरोगामी महाराष्ट्र हा फक्त नावाला राहिलाय अशी भीती सातत्याने व्यक्त केली जाते ती खरीही आहे हे वास्तव आपण नाकारू शकणार नाही. यासाठी सर्वधर्मसमभाव मानणारे व मांडणारांची जबाबदारी वाढते आहे. काही हेतू ठेवून स्वार्थाने चळवळीत आलेल्यांनीच चळवळीची जी शकलं केलीत ती समजून घेतली पाहिजेत. 
    समाजातील उपेक्षित, वंचित, कष्टकरी समाजाला मान सन्मान मिळवून शिक्षणाच्या वाटेकडे वळवणारा ‘बाबा’ पुन्हा होणे नाही. गेले २ दिवस बाबांचे कार्यकर्तृत्व सांगणारी वृत्तपत्राची पानेच्या पाने भरून वाहिली आहेत. स्वतःला पुरोगामी कार्यकर्ता समजणारांनी तरी किमान ती वाचावीत, समजून घ्यावीत. 
      त्यांच्या अंत्यदर्शनाला पुण्यातील रस्ते व वैकुंठ भूमी भरून वाहिली. ही गर्दी निमंत्रितांची किंवा पैसे देऊन आणलेली नव्हती तर ती कष्टकरी आपला रोज बंद ठेवून आलेले होते. 
कोणतेही धार्मिक विधी न करता विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार झाले व आज त्यांच्या अस्थी हमाल पंचायत समोर एक झाड लावून पत्नी व मुलांच्या हस्ते त्याखाली ठेवण्यात आल्या. त्या झाडाच्या रूपात बाबा हमाल पंचायतीवर लक्ष देऊन उभे आहेत ही भावना पुढील पिढीतही रूजेल. 
     महाराष्ट्र भूषण पुरस्कार नाकारणारे बाबा आज महाराष्ट्राच्या कष्टकरी जनतेच्या गळ्यातील ताईत होते. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ प्रमाणेच अशा समाजधुरिणांचा एक तरी गुण, एक तरी विचार माझ्या जीवनात मी अंगीकारावा व त्यादृष्टीने आपली वाटचाल ठरवावी हीच त्यांना आदरांजली ठरेल. बाबांनी दिलेल्या चाफ्याच्या फुलांचा सुगंध समाजात कायम दरवळत राहील. 

ॲड. शैलजा मोळक 
शिवस्फूर्ती प्रतिष्ठान, शिवस्पर्श प्रकाशन व जिजाऊ ग्रंथालय विश्रांतवाडी पुणे

बुधवार, १० डिसेंबर, २०२५

मानवी हक्क दिनानिमित्ताने चर्चासत्र

नवी मुंबई : तुर्भे पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १०/१२/२०२५ रोजी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १११, तुर्भे स्टोअर येथे विद्यार्थी/विद्यार्थिनी व शिक्षकांना मानवी हक्क दिनानिमित्त समाजातील तळागाळातील जनतेला मानवी हक्काचे ज्ञान माहिती होणे व त्याबाबत जनजागृती करिता कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर वेळी तुर्भे पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी खालील प्रमाणे माहिती देऊन मार्गदर्शन केले. मानवी हक्क, पोलीस दलाची माहिती, सायबर सुरक्षा व गुन्हे प्रतिबंध , व्यसन मुक्ती व अंमली पदार्थ प्रतिबंध , आर्थिक फसवणूक व प्रतिबंधक उपाय, जेष्ठ नागरिक सुरक्षा व काळजी , मुली, महिला व बालकाची सुरक्षा, महिलांच्या विरोधातील घटना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नवी मुंबई पोलीस व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करण्यास सांगितले व नागरिकांचे पोलीस मदतीसाठी डायल ११२ व सायबर फ्रॉड हेल्पलाईन १९३० क्रमांकाची माहिती देऊन त्याचा प्रसार नागरिकामध्ये करावा. यांसारख्या विषयांवर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. नमूद मानवी हक्क दिन कार्यक्रम आबासाहेब पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुर्भे पोलीस स्टेशन यांच्या आदेशाने सदर शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता. 
     कार्यक्रमास नमूद शाळेमधील सुमारे ९० विद्यार्थी, शिक्षक, तुर्भे पोलीस स्टेशन गोपनीय विभागाचे प्रताप दरगुडे हे सदर कार्यक्रमास उपस्थित होते अशी माहिती पोलीस अरुण थोरात यांनी दिली आहे.

डोंबिवली येथे आगरी युथ फोरम तर्फे 12 ते 19 डिसेंबर 2025 दरम्यान आगरी महोत्सव आयोजन

मुंबई (सतीश पाटील) : आतुरतेने वाट बघत असलेला आगरी युथ फोरम या सेवाभावी संस्थेचा आगरी महोत्सव डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिमाखात रंगणार आहे. गेली २० वर्ष आपली वेगळी छाप उमटवणारा आगरी महोत्सव यंदाही डोंबिवलीतील ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलनात १२ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुलाब वझे व यंदाच्या आगरी महोत्सवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष :शरद पाटील यांनी दिली.
आगरी समाज मुंबई-कर्जत-कसारा पासून थेट ठाणे रायगड जिल्ह्यात विखुरलेला असल्याने आगरी समाजाची संस्कृती परंपरा टिकविण्याचे कार्य आगरी युथ फोरम ही संस्था गेली दोन दशकांहून अधिक काळा पासून अविरत करीत आहेत. यंदाच्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघातील माजी कसोटी क्रिकेट पट्टू नीलेश कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते राम ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील, वनमंत्री गणेश नाईक, खासदार सुरेश म्हात्रे, संजय पाटील, श्रीकांत शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत. 
     आगरी महोत्सवात आगरी संस्कृती आणि परंपराचे दर्शन घडविले जाते. सांस्कृतिक कार्यक्रमांसह आगरी खाद्य पदार्थ्यांची मेजवानी असते. तसेच समाज प्रबोधनपर चर्चा सत्रे आणि व्याख्यानेंचे आयोजन केले जाते. नव कलाकरांना एक सांस्कृति व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाते अशी माहिती महाेत्सवाचे आगरी युथ फाेरमचे अध्यक्ष :गुलाब वझे यांनी दिली आहे. यंदा महोत्सवाचे अध्यक्षपद शरद पाटील यांना देण्यात आले आहे. हा आगरी महाेत्सव म्हणजे आगरी कोळी संस्कृतीचा मिलाप असतो. 
या महोत्सवात दि. बा. पाटील एक व्यक्तीमत्व या परिसंवादात दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील सहभागी हाेणार आहेत. भजन संध्या कार्यकर्म ही पार पडणार आहे. दत्ता पाटील सिद्ध हस्त गीतकार या कार्यक्रमातून दत्ता पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे. १५ डिसेंबर रोजी प्रगती कॉलेजमध्ये आगरी बोलीभाषा साहित्य संमेलन आयोजित केले आहे. त्याचबराेबर बाेलीभाषा साहित्य व समाज या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात डॉ. मिलिंद जोशी यांच्यासह डॉ.श्रीपाद जोशी, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. वर्षा तोडमल आदी सहभागी होणार आहेत. एआय या विषयावर डॉ.अच्युत गोडबोले हे मार्गदर्शन करणार आहेत. वयात येताना काय काळजी घ्यावी या विषयावर डॉ. गायत्री पाटील यांचे व्याख्यान होणार आहे .
     आगरी महोत्सवातून जमा होणारा निधी हा समाज कार्यासाठी खर्च केला जातो. एक लाखाहून अधिक निधी पुरस्कारावर खर्च केला जातो. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. समाजातील होतकरु गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये या प्रमाणे पाच लाखाचा निधी खर्च केला जातो.
       यासाठी संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव वझे, कार्याध्यक्ष जालिंदर पाटील, उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ, खजिनदार पांडुरंग म्हात्रे, शरद पाटील, विजय पाटील, नारायण महाये, कांता पाटील, अनंत पाटील, दीपक पवार, वासुदेव पाटील यांच्यासह सल्लागार आणि त्यांचे सर्व सहकारी महोत्सव सुनियोजन करून महोत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
       दररोज राजकिय, सामाजिक, साहित्यिक, कला-क्रिडा क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवर याच व्यासपीठावर गप्पागोष्टी साधणार आहेत. याशिवाय विविध गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रानिक वस्तू, आगरी समाज संस्कृतीचे दर्शन घडवणारे स्टाल, वैशिष्ठेपूर्ण सुकी मासळी बाजार, खवैय्यांसाठी स्वादिष्ट आगरी पद्धतीच्या व इतर खाद्य पदार्थांचे स्टॉल तसेच सामाजिक संस्थांचेही स्टॉल आहेत. सर्वांसाठी सर्वकाही, मनोरंजनासाठी आकाश पाळण्यासारखी अनेक साधने असणारा आगरी महोत्सव नव्या रंगात, नव्या ढंगात डोंबिवलीत धुमधडाक्यात 12 डिसेंबर मध्ये होत आहे. तरी सर्व समाज, संस्कृती,खवय्ये , संगीतप्रेमी, कलाप्रेमी,क्रीडा, साहित्यप्रेमी एकाच प्लॅटफॉर्मवर याचा मनमुराद अवश्य लाभ घ्यावा!

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव

मुंबई (शांताराम गुडेकर) स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या “कोकणरत्न” या मानाच्या पदवीसाठी यंदा उल्लेखनीय स...