कर्जत- राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती सुनिल तटकरे यांच्या पुढाकारातून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाशी सतत समन्वय साधून जिल्ह्यातील आदिम जमाती, आदिवासी बांधवांकरिता विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु आहेत.
या पार्श्वभूमीवर नुकतेच राज्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळा वसतिगृहांच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी विभागस्तरावरील गठीत समितीची बैठक आदिवासी विकास सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह अशा बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी निकष ठरवून निकष पूर्ण करणाऱ्या एकूण 26 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
यापैकी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाथरज येथील शासकीय आश्रमशाळेची शालेय इमारत या कामाकरिता एकूण रु.11 कोटी 34 लक्ष 27 हजार इतक्या तर याच तालुक्यातील पिंगळज येथील मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीसाठी रु.13 कोटी 19 लक्ष 36 हजार इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. या कामांची सुरुवात सन 2021- 22 या आर्थिक वर्षापासून सुरू होणार आहे.
आदिवासी जमातीची कुटुंबे अतिदुर्गम व अविकसित अशा सीमाभागात राहत असल्यामुळे या कुटुंबांना जीवनावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होणे कठीण असते. त्यांच्या मुलांना योग्य शिक्षण, आरोग्य तपासणी व उपचार, दैनंदिन आवश्यक अन्न किंवा वापर वस्तूंचा पुरवठा, मनोरंजन व करमणूक आणि त्यांच्या उपजीविकेवर आधारित व्यवस्था निर्माण होण्यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे या अहोरात्र प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पुढाकारातून आदिवासी बहुल भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांसाठी शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सुधागड-पाली तालुक्यातील मौजे जांभूळपाडा येथे आदिम जमाती (PVTG) (कातकरी) यांच्याकरिता बहुद्देशीय संकुल उभारण्यासाठी शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कु. आदिती तटकरे यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात तशी घोषणा करण्यात आली होती. पालकमंत्री कु.तटकरे या आदिवासी बांधवांकरिता करीत असलेल्या प्रयत्नांमुळे आदिवासी समाजाच्या प्रगतीस चालना मिळणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा