भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाल्याने भारतीय राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. प्रणव मुखर्जी भारतीय राजकारणातील एकमेव असे व्यक्ती होते की ज्यांच्याविषयी सर्वसामान्य नागरिकांपासून ते पंतप्रधानांपर्यंत आणि सताधारी पक्षापासून विरोधी पक्षांपर्यंत सर्वांनाच कमालीचा आदर होता. भारतीय राजकारणातील एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असलेले प्रणव मूखर्जी यांना भारतीय राजकारणातील भीष्म पितामह म्हणावे लागेल. कारण जवळपास पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय राजकारणात घालवले. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ चा. त्यांचे वडील स्वातंत्र्य सेनानी होते त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला त्यासाठी दहा वर्ष कारावासही सोसला. प्रणव मुखर्जी यांचे वडील काँग्रेस कमिटीचे सदस्य होते तसेच पश्चिम बंगाल विधान परिषदेचे अध्यक्ष होते त्यामुळे लहानपणीच त्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झाले. त्यांनी कोलकाता येथील विद्यासागर विद्यापीठातून एम ए आणि एल एल बी केली. राजकारणात येण्याआधी त्यांनी काहीकाळ प्राध्यापक म्हणून नोकरी केली तर काहीकाळ पत्रकारिता केली. पण लहानपणीच राजकारणाचे बाळकडू मिळाल्याने त्यांनी १९६९ साली राजकारणात प्रवेश केला आणि अल्पावधीतच आपल्या वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या जोरावर मंत्रीपदापर्यंत मजल मारली. आपल्या तल्लख बुद्धीने आणि दूरदृष्टीने त्या पदावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. नोयोजन आयोगाचे अध्यक्ष, राज्यसभेचे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री,विविध संसदीय समित्यांची अध्यक्षपदे अशी अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषवली या सर्व पदांवर त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. प्रणव मुखर्जी हे त्यांच्या विविध लोकाभिमुख निर्णयाने देशभर चर्चेत राहिले. राष्ट्रपतीपद ग्रहण करण्यापूर्वीपासूनच संसदीय लोकप्रणालीत अद्यावत माहिती ठेवणारे नेते म्हणून प्रणव मुखर्जी यांनी ख्याती होती.लोकसभेत विविध पद भूषविताना संसदेच्या आवारात अगदी विरोधी पक्षातील दिग्गज नेतेही त्यांच्याशी अनेक महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करताना आढळत. नव्या खासदारांसाठी त्यांचे भाषण, संसदेतील आयुधे वापरून प्रश्न उपस्थित करणे, हे प्रशिक्षणच होते. गृह, अर्थ आणि परराष्ट्र धोरण याबाबतचे ज्ञान चकीत करणारे होते. त्यामुळेच त्यांना भारतीय राजकारणात व ज्ञानी वर्तुळात संसदीय प्रणालीची एक चालती बोलती लायब्ररी संबोधले जायचे. म्हणूनच राष्ट्रपतीपदी त्यांची निवड झाल्यावर एका योग्य नेत्यांची योग्य पदी निवड झाली अशीच भावना संपूर्ण देशाची झाली होती. राष्ट्रपतीपद हे घटनेतील सर्वोच्च पद आहे या पदाला प्रतिष्ठा आहे, मान आहे, एक वेगळा शिष्टाचार असलेले हे पद आहे. राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी या पदाची प्रतिष्ठा वाढवण्याचेच काम केले. प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती पदाच्या पूर्वी लावल्या जणाऱ्या महामहिम हा शब्द न वापरण्याची प्रशासनाला सूचना केली. हे पद आणि त्याची समावेशकता वाढवण्याचा हा महत्वाचा निर्णय होता. भारताच्या लोकशाहीचा इतिहास जगाला सांगणारा, जगाची भाषा समजणारा एक ऋषितुल्य वक्ता या ठिकाणी विराजमान असल्याचे समाधान देशाला मिळाले. त्यांच्या निधनाने देशाची कधीही भरुन न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे. मा. प्रणव मुखर्जी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली!
-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा