मुलुंड /शेखर भोसले -कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी पालिकेच्या टी वॉर्डने रस्त्याच्या कडेने बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करून रस्त्यावर बसण्यास मनाई केली त्यामुळे गेल्या ५ महिन्यांपासून बरेचसे फेरीवाले अजुनही घरीच बसुन आहे. काहींनी थोडा फार प्रमाणात आपला धंदा सुरु केला आहे परंतु पालिकेची अतिक्रमण विरोधी गाडी येऊन त्यांचा धंदा उचलून नेत आहे तसेच मुळ फेरीवाले बाजारात दिसत नसुन, या मूळ फेरीवाल्यांच्या जागी नवीन फेरीवाले येऊन बसल्याने मूळ फेरीवाल्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याअनुषंगाने फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींनी शिवसेना मुलुंड विधानसभेचे उपविभाग प्रमुख सुनिल गारे यांना साकडे घालून हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. त्याला अनुसरून सुनिल गारे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मूळ फेरीवाल्यांना न्याय मिळावा आणि त्यांना आपल्या जागी धंदा करण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी टी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांना मंगळवार दि २५ ऑगस्ट रोजी भेटून फेरीवाल्यांच्या मागणीचे एक निवेदन सादर केले.
यावेळी सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांच्याशी चर्चा करताना गेल्या ५ महिन्यांपासून मूळ फेरीवाले घरी बसल्यामुळे, कित्येक फेरीवाल्यांना घर, कुटुंब चालवणेही कठीण होऊन बसले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच मुलांच्या शाळेचा खर्च व इतर दैनंदिन खर्च करताना नाकीनऊ येत असल्याचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांच्या लक्षात आणून दिले तसेच मूळ फेरीवाल्यांच्या जागी नवीन फेरीवाले येऊन बसत आहेत त्यामुळे मूळ फेरीवाल्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे देखील त्यांना सांगून लवकरात लवकर मूळ फेरीवाल्यांना धंदा करण्याची परवानगी देण्याची मागणी केली.
टी वॉर्ड महानगर पालिका सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी भेटीस आलेल्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत आठवडा भरात योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी दिले. निवेदन देताना सुनिल गारे यांच्या सोबत फेरीवाले प्रतिनिधी म्हणून कोंडाजी जाधव, शांताराम चौधरी, तुषार शिंदे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा