श्रावण महिन्यात सण , उत्सव व दिवसांची भरपूर रेलचेल असते. श्रावणात मंगळवारी मंगळागौर पुजनाची परंपरा व प्रथा आहे. नवविवाहित तरूणींना सासरहून माहेरी आईकडे येण्यासाठी हा हक्काचा महिना असतो. माहेरी पहिला मंगळवार तर सासरी शेवटचा मंगळवार ' मंगळागौर करण्याची पध्दत आहे. माहेरी आलेल्या तरूणीचा आनंद मंगळागौरीच्या समारंभात प्रकर्षाने जाणवतो. कसलंही बंधन नाही , भरपूर मौजमजा , खेळ, गाणी, विविध पदार्थांचा आस्वाद आणि रात्री जागरण.. ........ मंगळागौर म्हणजे नुसती धमाल असते. नवविवाहित तरूणी लग्नानंतरची पाच वर्ष मंगळागौरीचं व्रत करतात. पहिल्या मंगळवारी मंगळागौर माहेरी व शेवटचा मंगळवारी सासरी ही रीत आहे. पाचव्या वर्षी आईला छानसे वाण देवून या व्रताचे उद्यापन केले जाते. मंगळागौरीचे पुजन हे पत्री , फुले, आघाडा , हळदी, कुंकू लावून, पंचामृत वाहून केले जाते. देवीच्या नैवेद्यासाठी पुरणाचा स्वयंपाक करतात. या व्रतासाठी आलेल्या सर्व सवाष्णींना देवीचा प्रसाद म्हणून जेवण असते. जेवताना मुकं राहून फक्त स्वयंपाक उत्कृष्ठ झालायं हे खुणवायचं असतं.. अशी रीत आहे. मग या सवाष्णींच्या भेटवस्तू देऊन ओटी भरतात. संध्याकाळी इतर बायकांना हळदीकुंकू साठी बोलवले जाते. आणि नंतर मनसोक्त खेळ, गाणी अशी रात्र असते. मंगळागौरची रात्र जागविण्यासाठी झिम्मा, फुगडीपासून गाठोडे , सून - सासू असे ऐंशी - नव्वद प्रकारचे खेळ आहेत. या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे घरामधलीच वस्तू लागते. उदा - लाटणं , तवा , नारळाच्या करवंटया इत्यादी.वापरल्या जातात. उत्तर रात्री गाणी म्हणणे , भेंड्या खेळणे.आणि नंतर नाव घेण्याचा , अर्थात उखाण्यांचा कार्यक्रम रंगतो. साधारण पहाटे उत्तरपुजा करुन दहीभाताचा नैवेद्य दाखवून , देवीला कवळतात ( हलवतात ).आणि मग तिचे विसर्जन करतात. हळदीकुंकूवाच्या वेळी स्त्रियांना खिरापत , ओटी , अत्तर गुलाब, एखादः फुल किंवा गजरा , पिण्याचस दुध , चहा किंवा सरबत दिले जाते. मंगळागौरीच्या फराळाला ' धान्य फराळ ' असेही म्हणतात. यासाठी सर्व वस्तू कच्चाच भाजून घेतल्या जातात. या फराळात मुख्यत्वे करून मसाले भात , लाडू , उसळ , भाजणीचे वडे , दही , चटणी, कोशिंबीर इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. पुऱ्या व पोळ्यांसाठी कणीक देखील भाजूनच घेतात.
सौ. स्नेहा मुकुंद शिंपी
नाशिक
|
मंगळागौरीची कथा - कुडीन गावात धर्मपाल आपल्या पत्नीसह राहत होता. त्यांच्याजवळ सर्व सुख होती पण संतती नव्हती, म्हणून ते अतिशय दु:खी होते. एक योगी पुरुष दररोज त्यांच्या दारासमोरून जात असे. मात्र निपुत्रिक असल्याने त्यांच्याकडून भिक्षा घेत नसे. या दोघांना याचे खूप वाईट वाटत असे. एके दिवशी त्यांनी लबाडीने भिक्षा दिली. हे कळल्यावर योगी पुरुष खूप रागवला . त्याने शाप दिला. " तुम्ही मला कपटाने भिक्षा घातली, आता तर तुम्हाला मुळीच संतती होणार नाही." हे ऐकताच त्या दोघांनी योगी पुरुषाचे पाय धरले , माफी मागितली आणि उ:शापाची याचना केली. योगी प्रसन्न झाले आणि म्हणाले. ' निळे वस्त्र नेसून, निळ्या घोड्यावर बसून जंगलात जा . ज्या दिवशी घोडा थांबेल , तिथे जमिन खण. तुला एक देवीची मूर्ती मिळेल. तिची तू सांग्रसंगीत पुजा अर्चना कर. ती प्रसन्न होईल. ' पती - पत्नीने तसेच केले. त्यांच्या आराधनेने देवी प्रसन्न झाली. तिने त्यांना पुत्रप्राप्तीचा वर दिला. मात्र, तो पुत्र अल्पयूषी असेल हेही सांगितले. त्यांना पुत्र होताच त्याचे नाव शिव ठेवले. पुढे त्याची मुंज केली. लग्न करण्यापुर्वी एकदा काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हे पिता - पुत्र तिथल्याच धर्मशाळेत उतरलेत. आवारात काही मुली खेळत होत्या. त्यांच्यात भांडण झाले. आणि एका मुलीने अपशब्द काढल्यावर , सुशीला नावाच्या मुलीने लगेच तिला उत्तर देत म्हणाली,'' कुणीही मला अपशब्द बोलू नये. माझी आई मंगळागौरीचे व्रत करते. त्यामुळे सौभाग्य अखंड राहते''. हा संवाद धर्मपालने ऐकला आणि याच मुलीला सून करायचे ठरवले. त्यानुसार सून करून घरीही घेऊन आला. एके दिवशी सुशीलाच्या स्वप्नात मंगळागौरी देवी आली आणि म्हणाली, '' तुझ्या पतीला दंश करण्यासाठी साप येत आहे. त्याला पिण्यासाठी थोड दुध ठेव. ते पिण्यासाठी गेल्यावर तू त्या घड्याचे तोंड कपड्याने बंद कर.आणि तो घडा सकाळी आईला वाण म्हणून दे. "" सुशीलाने देवीने सांगितल्या प्रमाणे तसेच केले. सकाळी घडा आईला दिला , त्यात रत्नाचा हार होता. काही दिवसांनी यमदूत शिवाचे प्राण घेण्यासाठी आल्यावर मंगळागौर देवीने युद्ध केले. यमदूत पराभूत होऊन माघारी परतला आणि शिवाचे प्राण वाचले व सुशीलाचे सौभाग्य अखंड राहिले. तेव्हा पासून मंगळागौरीचे व्रत स्त्रिया करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा