भांडुप: (अविनाश हजारे)लॉकडाऊन च्या काळात गरीब- गरजूंना मुंबई महानगर पालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या अन्नाच्या दर्जावर भांडुपच्या एका नगरसेविकेने प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे अन्न नाशवंत आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला आहे.
भांडुपच्या प्रभाग ११६ च्या नगरसेविका जागृती पाटील यांनी पालिकेला पत्र लिहून या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
याबाबतचा सविस्तर प्रकार असा की, लॉकडाऊन जाहीर होऊन महिना उलटला असून, लोकांच्या हाताला काम नाही. त्यातल्या त्यात या काळामध्ये गरीब- कष्टकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने गरजूंना आधार म्हणून खिचडी बनवून ती वाटण्यासाठी एका कंत्राटदाराची रीतसर नेमणूक केली आहे.
परंतु, गरजूंना देण्यात येणारी खिचडी सुमार दर्जाची असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर देखरेख करण्यासाठी पालिकेचा संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आपल्या कर्तव्यात कसूर करत आहे. असे नगरसेविका पाटील यांचे म्हणणे आहे. त्यांनी तसे पत्र पालिका आयुक्तांना दिले असून, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना नगरसेविका जागृती पाटील म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून आपल्या प्रभागात येणारी खिचडी निकृष्ट दर्जाची असून, या खिचडी वाटपाच्या वेळेत नियोजन नसल्याने ती नाशवंत होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणून आपण एस विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या दालनात पाहणी करण्यासाठी गेले असता यावेळी एस आणि टी विभागाच्या समाजविकास अधिकारी ( नियोजन) वेदिका पाटील यांनी सदरची अन्नाची पाकिटे नाशवंत झाल्याचे कबूल केले.
आपण या गंभीर प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करत, नागरिकांच्या आरोग्यासाठी पालिकेने याचे योग्य ते नियोजन करण्याची मागणीही नगरसेविका जागृती पाटील यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा